एक रात्र..तीन मित्र आणि सह्याद्रीची कूस..
इरशाळगड ते प्रबळगड..
एखादा रविवार सुटला कि आठवडाभर मन लागत नाही. अचानक भटकंती वाली मेंबर फोन करून सांगतात उद्या निघायचं. बर आमची bag काय तय्यार असतेच. तर ठरल्याप्रमाणे मी आणि माझे भटके जिवलग सुहास आणि विठ्ठल ६ वाजता संध्याकाळी पनवेल डेपोत आलो. तिथे कडकडून भूक लागली म्हणून पनवेल प्रसिद्ध ' वाघेज ' ची पावभाजी वो भी मस्का डालके..!! हादडली आणि इरशाळगड कडे S.T प्रवास सुरु केला . रात्री गावातून जाताना ' एवढ्या रात्री जाणार..?? ' या गावकर्यांच्या प्रश्नांनी मात्र कंटाळा आणला राव. शेवटी गाव ओलांडून आणि इरशाळवाडी च्या थोड मागे एका टेकडीवर आम्ही आमचा पहिला पडाव टाकला. एक झकास दगड...तीन जन आरामात झोपू शकतो असा natural bed होता. तिथून आकाशात दिसणारा चंद्र (नुकतीच पौर्णिमा झाली होती) आणि खाली तुडूंब भरलेल मोरबे धरण आहा काय नजारा होता... तिथे आम्ही खूपच आराम केला म्हणजे गप्पाच तश्या रंगल्या.. अगदी बालपणापासून ते महाविद्यालयीन जीवनावर आणि मित्रांपासून शत्रुंपर्यंत सगळ...
शेवटी ४ च्या सुमारास पावलं पुन्हा हलली आणि इरशाळवाडी कडे प्रस्थान केले. गडाची वाट शोधताना एक तास वाया गेला कारण गवतच एवढ होते कि मागच-पुढच काही कळत नव्हत. शेवटी ते पायथ्याच मंदिर भेटलं आणि त्याच्या आधारे वाट काढत गडाच्या सरळ कड्याला भिडलो.." आत्ता इथून कस जायचं..?? "... एक शब्द आहे ' खाज ' ते काय असत न ते अनुभवाच एकदा मग कळेल. शेवटी विठठल ने कड्याला पाय लावला अन वाट काढत काढत मध्यावर जाउन पोहोचला. मग मी आणि माझ्या मागे सुहास अस करत आम्ही अर्ध्यावर जावून पोहोचलो. पुढे तीव्र चढण होती पण दगडी नव्हत्या . गवतावरून पाय घसरणार हे नक्कीच. पण ' तिरपी चाल ' हा सगळ्यात उत्तम पर्याय मग मीच पुढे मार्ग काढत काढत मुख्य वाटेवर पोहोचलो आणि मग दोघांना आवाज देऊन वर बोलवून घेतले. तोवर सूर्य डोंगराआडून डोकवायला सुरवात झाली होती.
सूर्योदय नेढ्यातूनच पहायचा अस ठरलं होत. मग काय भिगी-भिगी चालत पाण्याच्या टाकीच्या इथे गेलो पटापट तोंडावर पाणी मारून नेढ्यात सूर्याच्या दर्शनासाठी हजर..
समोरून येणारा सूर्य आणि नेढ्यातील वाहणारी गार हवा...!! रात्रीची केलेली पायपीट कुठेच गेली. नंतर all time बेस्ट पार्ले-जी आणि बनपाव वर ताव मारला. भूक तर सपाटून लागली होती आणि मग नेढ्यातच पाय लांब केले. गार वार्यावर स्वर्ग सुखीची झोप कधी लागली कळलेच नाही. २ तास फक्कड झोप झाली मग सुहास नी गडबड सुरु केली ' चलो ...अब इधरसे प्रबळगड ' ...लगेच सटासट आम्ही उठलो. वरूनच वाटा हेरल्या.."हा ती वाट..तिथून तिकडे..आणि तिकडून पठारावर..झाल ३-३.३० तासात प्रबळगड" वरून दिसणारा ३ तासांचा प्रवास कसा होणार या विचाराने तिघांच्या मनात मुंग्या धावत होत्या. पाणी भरून आम्ही इरशाळगड उतरला आणि उजव्या बाजूला ढोरवाटेने चालत चालत काटे-कुटे तुडवत आणि इरशाळगडाचा डोंगर उतरून प्रबळगड आणि इरशाळगड यांना जोडणाऱ्या टेकडीवरून पायपीट सुरु झाली.आधीच उन चांगलच डोक्यावर आल होत आणि डोक्यापेक्षा उंच गवत आणि ती काटेरी झाड... आणि आमच नशीब कि दुर्दैव पावसाळा संपल्यावर त्या रानवाटा तुडवणारे आम्हीच पहिले.पायपीट..ती गवताची लागणारी खाज...रान गोचडी..डास..आणि त्या गतिरोधक सारखे किडे (मला नाव नाही माहित)... एक घोट पाणी आणि थोडा सावलीत आराम आसा करत करत आम्ही शेवटी प्रबळगडाच्या मुख्य डोंगराला येवून भिडलो.. आत्ता समजल जे वरून ' झुपकेदार आणि छोट वाटणार ते जंगल भयान किरर्र भासत होत '.. जंगल घनदाट म्हणजे हवा सुद्धा लागत नव्हती अंगाला. त्यात वाट शोधन म्हणजे ' गंजलेल्या तारेवरची कसरत..'
सूर्य डोक्यावर आला होता. आम्ही बरोबर प्रबळगडाच्या पाठीमागे होतो. कारण इरशाळगड, कर्नाळा रांगेवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला काळ्या बुरुज जसा बांधला तसा दिसत होता. आत्ता जी वाट चालू होते ती एकदम प्रबळगडच्या कड्यांना घासून जाते म्हणजे एका बाजूला खोल दरी तीही काळ्या कातळाची न मध्ये झाड ना गवत.. आणि वरच्या बाजूला उंच कडा... बाकी किर्रर्र जंगल.
उन्हाचे चटके आणि गवताची खाज यांनी अंग चांगलच भजल होत. चालत चालत आम्ही एका घळीवर आलो तिथे रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या भरून पुढे चाल केली. पावसाळयानंतर आम्हीच पहिले ती वाट तुडवणारे. उंच वाढलेलं गवत पार भरकटवत होत. त्यात विठ्ठल चे इंग्लिश मार्गदर्शन... सुहास चे अनुभव आणि माझी बडबड... सुहास पुढे...मी आणि मागे विठ्ठल... त्यात पाण्याच्या बाटल्या संपलेल्या. वाटेत मिळालेल्या कातळावरून वाहत येणाऱ्या पाण्यान त्या भरल्या. बर त्या पाण्यात किडे वळवळ करत होते त्याच पाण्यान तो दगड साफ करून मग स्वतःची तहान भागवली...
अस सगळ संपल्यावर शेवटच्या घळीवर वाटेने दगा दिला.. जंगल संपून वाट एका छोट्या सपाटीवर येते. गवताच्या वाढीमुळे वाट हमखास चुकणार हे निश्चित. पण आलेल्या वाटेचा अंदाज घेता आम्ही एका छोट्या ओढ्यात पोहोचलो.. आणीसमोर वाटच लागली..म्हणजे वाटच नाही..मग काय तिघे तीन दिशेला गेलो...परत आल्या पावली मागे गेलो..परत आलो..थांबा..विचार करा यात तासभर गेला. शेवटी डोक्यात विचार येवून गेला कि रहायची तय्यारी करायला काही हरकत नाही.. पण हार मानली तर जातिवंत भटके म्हणवून घ्यायचा हक्क तो काय...शेवटी पुन्हा वणव्यासारखे उठून झाडीत घुसलो आणि आमचीच वाट काढत काढत मूळ वाटेवर आलो.(एवढ्या शब्दात हे नाही संपत कारण तिथला तो अनुभव शब्दात मांडण कठीण आहे.)
मूळ वाटेवर आल्यावर मग थोडी शिदोरी काढली...वाहत्या झर्यावर मनसोक्त पाणी प्यालो. एक भांड्यात पारले-जी टाकून त्याच गरगरीत मांडग बनवल तिघांनी जस जमेल तसा ताव मारला आणि चालती वाट धरली. पुढे अजून एक शेवटची घळ पार केल्यावर महादेवाचं मंदिर लागत याचा अर्थ तुम्ही गावात आलात.. पुढे सपाटीवर जावून एकदा उजवीकडे नजर झुकवून गडाला डोळ्यात भरवून घ्या ' खरच...नावाप्रमाणे प्रबळ आणि भव्य गड ..समोर दिमाखात उभा असलेला कलावंतीण चा बुरुज. पुसत दिसणारा महादरवाजा..आणि कातीव कडा..' नतमस्तक सह्याद्रीच्या विशालकाय रूपापुढे...
गावातून मग आम्ही प्रबळगडाच्या मुख्यवाटेने परतीचा प्रवास केला.
या अखंड रोमांचकारी प्रवासात खूप अडचणी आल्या ज्या वर्णन करणे कठीण आहे. घनदाट जंगलात एकही सरपटणारा प्राणी दिसला नाही कि कोणी हिंस्र श्वापद. आपण साफ दिलान सह्याद्रीची सैर केलीत तर तो सुद्धा तुमची काळजी घेतो. प्रसंगी रौद्र पण झर्याचे पाणी पाजून आईच्या मायेचा हात सुद्धा तो माझा सह्याद्रीच फिरवतो. हि आमची वेडी श्रद्धा समजा किंवा आमची भावना. पण सह्याद्रीन ३ तासांचा प्रवास ७ तासांचा करून आम्हाला खूप काही शिकवलं... खूप आठवणी , लाखमोलाचा अनुभव आणि जंगली भागात जगायचं कस हे एका दिवसात शिकवलं. काही झाल तरी मागे हटायचं नाही. वेळ आली तर मरणाशीही कडवी झुंज द्यायची. कसे राहत असतील ते आदिवासी आणि कसा असतो त्यांचा जीवनाचा खडतर प्रवास हे हा सह्यादीच जाणो...
आठवणीत तर खूप राहील....मोरबे ची शूटिंग....दगडावरील गप्पा....सापाने पकडलेल भक्ष आणि त्याचा आवाज...इरशाळगडची खडतर वाट...मित्राने दिलेला हात...घनदाट जंगल..चुकलेला रस्ता...माडग...किडेवाल पाणी...प्रबळगड चा प्रबळ इतिहास आणि पुन्हा प्रबळगड भेटीचा अट्टाहास ... हीच खरी भटकंती आणि आम्हीचे ते भटके ज्यांना या सह्यादिन वेड लावलं...
Comments
Post a Comment