१२ वाजता झोपलो खरे पण कसय की २ वाजल्याशिवाय माझ्या डोळ्यांच्या पापण्या काही मिटल्या जात नाहीत. थोडा वेळ तसाच पडून राहिलो. मग मात्र तडक उठलो, सोबत सूर्यकांतही उठला. रायलिंगाच्या छाताडावर सह्याद्रीतल्या त्या बेभान वार्याने भयाण शांततेला चिरून आपल्या आवाजाचे खेळ चालू केले होते. चंद्राचा पुरेसा उजेड समोर असणार्या अर्दांडासारख्या लिंगाण्याची एखाद्या काळ्या कुट्ट रामोश्याप्रमाणे भासणारी काया अगदी स्पष्टपणे दाखवत होता. दूरवर तिकडे उजव्या हाताला समाधिस्त महाराजांच्या बाजूला असणारा सौरदिवा लकलकत होता. तर सिंगापूर गावातून काही श्वानांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. जेवण बनविण्यासाठी बनविलेल्या चुलीपाशी आधीच दोघं तिघं आडवे झाले होते. मी आणि सुर्यकांतने मग समोरच्या मैदानातच पडी घेण्याचा निर्णय घेतला. गप्पा-टप्पा संपवून मग २च्या सुमारास आम्ही कसेबसे झोपी गेलो.
सकाळ झाली. तांबडं कवाच फुटलं होतं. तसं आम्हाला उठायला थोडा उशीरच झाला होता. सगळं काही आवरतं घेऊन harness बांधूनच मग आम्ही बोराट्याच्या नाळीतून रायलिंग उतरू लागलो. मनात एकच विचार घेऊन सारी मंडळी लिंगाण्याच्या सुळक्याला गवसणी घालायला सज्ज झाली होती. बोराट्याच्या नाळीत मध्यावर आल्यावर मग उजव्या बाजूला आपल्याला वळसा घालून लिंगाणा व रायलिंगाच्या मध्यात असणार्या जागेवर पोहोचावे लागते. हा वळसा घालताना आपल्याला जेमतेम एक पाय ठेवता येण्याइतपत जागा असते. अशा जागेतून काही ठिकाणी तर निव्वळ पाय सरकवत जावे लागते. तर शेवटच्या ठिकाणी पोहोचलो की एक १५-२० फुटांचा घसरडीचा टप्पा पार करावा लागतो. तासा दिड तासाचा प्रवास करून सगळे वीर आता खिंडिंत येऊन ठाकले.पोटात काहीतरी ढकलून मगच पुढे वाटचाल करण्याचा निर्णय झाला. अगदी नावापुरतं खाऊन मुबलक पाणी सोबत घेऊन जावळीकर सरांनी सगळ्यांना महत्वाच्या सुचना दिल्या. सुरक्षिततेच्या द्रुष्टीने अगदी महत्वाच्या अशा सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळण्यात आल्या. "हर हर महादेव" एकच आवाज घुमला आणि मुख्य चढाईला सुरवात झाली. चंदू काका सर्वात पुढे मागोमाग मी मग विक्रांत - सुर्यकांत - सुमित - सुरज - रूपेश व जावळीकर सर अशा क्रमाने अगदी शिस्तीत सर्वजण लिंगाणा चढू लागले. पहिल्या टप्पयात असणारी घसरड, बारीक मुरूम अडचणी निर्माण करत होता. पहिला टप्पा आरामात पार केल्यानंतर मग दुसर्या टप्प्यापासूनच खड्या चढाईला आरंभ झाला. दगडांच्या विचित्र रचनेतील उणीवा शोधत त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करत चंदू काकांना follow करत सर्वजण हुशारीने पाऊल पुढे टाकत एक-एक टप्पा पार करू लागले होते. तिसर्या पट्टयापाशी एका दगडाने आपले तोंड हळूच उतर दगडांपेक्षा वर काढलेले होते. तिथे मग चंदू काकांनी आधी वर जाऊन दोर बांधला. त्याच्या साह्हायाने आम्ही सर्व भराभर वर चढून गेलो. काही ठिकाणी अगदी घसरडी माकडवाट लागत होती. तीदेखील अगदी सावकाश आणि सुरक्षिततेने सर्व पार करत होते. एकमेकांना लागेल ती मदत करत, चंदू काका व जावळीकर सरांच्या सूचनांकडे लक्ष देत सर्वजण व्यवस्थितपणे चढाई करत होते. मध्ये जिथे जागा मिळेल तिथे मीदेखील छायाचित्रे टिपत होतो. रायलिंगचे अगदीच भव्य भासणारे रूपडे डोळ्यासमोर येत होते. काल संध्याकाळी रायलिंगवरून दिसणार्या गुहेपर्यंतची चढाई आता आम्ही सर्वांनी पार पाडली होती. सर्वांनी एकमेकांकडे काही प्रमाणात सुखावलेल्या नजरेने कटाक्ष टाकला. लिंगाण्याच्या मध्यापर्यंत आम्ही यशस्वीरित्या पोहोचलो होतो. उजव्या बाजूला गुहा तर डाव्या बाजूला थोड्या दूरवर थंड पाण्याच्या टाक्या होत्या. सर्वजण गुहेत जाऊन विसावले. आजूबाजूचा परिसर न्याहाळला गेला, विचारपूस झाली, छायाचित्रोग्राफी झाली, तर्क-वितर्क लावून झाले. एकंदरित सर्व बाबींचा विचार करून गुहा पाहून झाली. डाव्या बाजूला एक पायवाट रायगडाच्या दिशेने सरळ रेषेत जाते. या वाटेवर पिण्याच्या पाण्याची ४-५ टाकं आहेत, पैकी एकाच टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. यथेच्छ पाणी प्यायल्यानंतर मग उर्वरित सुळक्याच्या चढाईकरिता सर्व सज्ज झाले.
आतापर्यंतच्या चढाईपेक्षा कठिण अशा चढाईला प्रारंभ होणार होता. चंदू काकांकडून एक दोर(rope) मुक्त प्रस्तरारोहण करून आधी वर बांधला गेला. मग आम्ही सर्वांनी त्याच्या साहाय्यानेच पुढील प्रस्तरारोहण चालू ठेवले. गुहेच्या वरचा टप्पा चांगलाच दम काढणारा आहे. ९० अंशाच्या कोनात उभा ठाकलेला सह्याद्रीचा कातळकडा आमची चांगलीच परिक्षा घेत होता. त्याचा शेवटचा टप्पा तर अगदीच जीवघेणा, डाव्या बाजूने चढत असताना शेवटाला मात्र अचानक उजवीकडे वळसा घालून वर जाणारा. डाव्या बाजूच्या कातळात पाय फसवून मग उजवीकडच्या कातळातील खाचेचा आधार घेत शरिराचा पूर्ण भार सावरत वर चढावे लागले. एका मागे एक सारे शिस्तीत चढाई करत होते. ज्या ठिकाणी उभं राहण्यास पुरेशी जागा मिळत असे त्याठिकाणी पुरेशी छायाचित्रोग्राफीदेखील चालत असे. एका टप्प्याचे वैशिष्ठ्य म्हणजे, टप्प्याच्या मध्यावर असलेले झाड. टप्पा तसा ४०-४५ फुटांचा अगदी सरळसोट. पण त्यात पडलेल्या भेगेमुळे त्याचे २ भाग झालेले होते. मध्यावर असणार्या त्या झाडामुळे दोर बांधायची सोय झाली होती. हा टप्पादेखील सर्वांनी पार केला. चंदू काका, मी, सुर्यकांत, सुमित व सुरज व रूपेश, विक्रांत आणि जावळीकर सर असे दोन गट पडले होते.
सह्याद्री
शेवटचा तो छोटासा चढ पार करून मी व मागोमाग सुर्यकांत, सुरज, सुमित, चंदू काका असे ५जण शिखरावर पोहोचलो. आता रूपेश, विक्रांत आणि जावळीकरांची वाट बघत आम्ही आजूबाजूचा परिसर डोळ्यांत साठवून घेत होतो. काही वेळातच तिघेही वर आले आणि एकच जल्लोश झाला. पुन्हा एकदा एकमेकांचे अभिनंदन करून छायाचित्रोग्राफी सूरू झाली. काही वेळ तिथे थांबून मग परतीच्या प्रवासाला सुरवात झाली. लिंगाणा सर केल्यावर समोर दुर्गराज रायगडचे झालेले दर्शन त्याच्या अभेद्यची प्रचिती देत होता. विक्रांत ने पहाड़ी आवाजात दिलेली गारद आणि दुर्गराज रायगडला पर्यायाने महाराजांना तीन हात लवून केलेला मुजरा...
दुरवर दिसणार कोकणदिवा,खानुचा डिगा,सांदोशी, छत्री निजामपूर आणि पाने गाव, सह्यकड्यावरून कोकणात ऊतरणारी निसणीची वाट,बोराट्याची नाळ,सिंगापूरची नाळ या घाटवाटा, त्यातून वेगळे अस्तित्व टिकवून ठेवलेले रायलिंग पठार, मागे दुरवर दिसणारा अभेद्य तोरणा आणि राजबिंडा राजगड सहयाद्रीच्या राकटपणाची पदोपदी जाणीव करून देत होते. गडमाथा छोटा असल्या कारणाने गडफेरी आटपून परतीचा सर्व सुरक्षिततेच्या साहित्यांनिशी चालू केला. उतरणीच्या पहिल्या टप्पावर पायरया लागतात त्या उतरताना काळजी घ्यावी लागते जरा तरी तोल गेला की कडेलोट निश्चित. पहिला टप्पा पार करून थोड्या सपाटि वजा उतारावर येतो त्यानंतर अजुन एक २५ फुटाचा कातळकडा rappelling करून सर करावा लागतो. Rappelling करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी ती म्हणजे पूर्ण शरीराचा तोल तुमच्या पायावर असतो त्यामुळे एक एक पाऊल जपून टाकाव लागत. तिसरा टप्पा पार करून मग लिंगाण्यावर पाण्यचा एकमेव स्त्रोत म्हणजे पाण्याची टाकं. त्यांच्या शेवटाला जाऊन येईपर्यंत माझ्या जीवाला काही आराम पडणार नव्हता.त्याचा शेवट गाठून मग पुन्हा गुहेजवळच्या जागेपाशी आलो. उन्हाचा चटका लागणार लक्षात घेवुन लगेच rappelling ला परत सुरवात केली, १५ आणि २० फुटाचे कधी कातळ आणि घसारे टप्पे पार करत त्याच बरोबर मागुन येणारया साथीदाराला परिस्थीचा अंदाज देत सरते शेवटी रायलिंगाच्या आणि लिंगाण्याच्या मधील दरीत सुखरूप दाखल झालो,अंगात त्राण राहिले नहव्ते पण आजुन पूर्ण नाळ चढून जाणे बाकी होते ते ही सुरक्षेसाठी लागणारे रोप आणि इतर साहित्या घेवुन मुक्काम असलेल रायलिंग पठार गाठण हेच डोक्यात होते. सोबत आणलेला ३०० फुटाच्या दोराचं वजन आता जणू १०० किलो असल्याप्रमाणे भासू लागलं होतं.
सरते शेवटी रायलिंग पठारावर दाखल झालो लगोलग पोटास आधार म्हणुन थोडेफार खावुन घेतले आणि फोटोग्राफीची राहिलेली इच्छा पूर्ण केली.
अलंग, मदन, कुलंग भटकंतीनंतर केली गेलेली लिंगाणा भटकंती या सह्याद्रीतल्या दोन अवाढव्य, अवघड, कठिण अशा भटकंती पूर्ण झाल्याचं समाधान शब्दात काय ते सांगणार. एखाद्या भगताला देव भेटावा किंवा मग दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत एखाद्याचा पहिला क्रमांक यावा वा एखाद्या प्रेमवीराला त्याच्या आवडत्या व्यक्तीचा होकार मिळावा, या सगळ्या गोष्टींतून जेवढा आनंद मिळत असेल कदाचित त्यापेक्षा जास्त आनंद माझ्या मनाला झाला होता. कित्येक वर्षांची लिंगाण्याला गवसणी घालण्याची माझी ईच्छा पूर्णत्वाला गेली होती. मन अगदी भारावून गेलं होतं. लिंगाण्याच्या सर्वोच्च भागावर चढून आल्याच समाधान डोळ्यात आपोआपच दिसत होतं. जातिवंत भटकी २माणसं(सुहास व बापू) राहून राहून आठवत होती. त्यांच्या परीनंदेखील त्या क्षणाचा आनंद मी उपभोगत होतो. सोबत असलेल्या सार्यांच्याच डोळ्यात लिंगाणा सर केल्याच एक वेगळचं समाधान दिसून येत होतं. आता मात्र राहावत नव्हतं. सर्वात पहिले रायगडावरच्या महाराजांच्या समाधीला अभिवादन केले आणि मग त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. सर्वाचा अंगात एक वेगळ्या प्रकारची उर्जा निर्माण झाली होती. चेहर्यावरचे हावभाव पार बदलून गेले होते. सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते.
मावळतीला जाणारा सुर्य दुर्गराज रायगडावर रंगांची मुक्त उधळण करत होते. पक्ष्यांच्या आवाजाने वातावरणात एक वेगळाच बदल जाणवत होता. रायगडाचे ते रूप डोळ्यात साठवून लिंगाण्याला अखेरचा निरोप देत जड पावलांनी मग आम्ही परतीचा मार्ग धरला आणि वेल्हेला गावाकडे मार्गस्थ झालो वेल्ह्यात चाय पे चर्चा करून हातात २ दिवस बाकी असल्याचे लक्षात आले. भटकंतीचा किडा पुन्हा वळवळला तो थेट राजांच्या गडाच्या पायथ्याशी मुक्कामाला गेल्यावरच शांत झाला. रात्र फार झाली होती. पाली गावात एकाच्या घरी आसरा घेताना जेवण करून पडी घेतली. मागचे २ दिवसाच्या आठवणी मात्र जशाच्या तश्या डोळ्याच्या पडद्यासमोर तरळू लागल्या.


छान! छानपैकी अनुभव विदित केलास!! मला माझ्या लिंगाणा भटकंतीची आठवणच झाली. वाचताना पुन्हा एकदा लिंगाणा सफर घडल्यासारखे वाटले. मजा आली.
ReplyDeleteछान! छानपैकी अनुभव विदित केलास!! मला माझ्या लिंगाणा भटकंतीची आठवणच झाली. वाचताना पुन्हा एकदा लिंगाणा सफर घडल्यासारखे वाटले. मजा आली.
ReplyDeleteछान वर्णन लिहीलेस फक्त विक्रांत ची पहाडी गारद मल व्हिडीओ शुट करायची राहुन गेली परत योग आल्यास बघु
ReplyDeleteखरंच खूप धन्यवाद आपल्या सारख्या blog मुळे आताच्या तरुणाईला इतिहासाची जाणीव होते आता खरंच म्हणायला हरकत नाही "महाराष्ट्राचे वैभव" पुन्हा एकदा परत येतोय जय भवानी जय शिवराय ��������
ReplyDeleteखरंच खूप धन्यवाद आपल्या सारख्या blog मुळे आताच्या तरुणाईला इतिहासाची जाणीव होते आता खरंच म्हणायला हरकत नाही "महाराष्ट्राचे वैभव" पुन्हा एकदा परत येतोय जय भवानी जय शिवराय ��������
ReplyDelete