दिवसागणिक दिवस जात असतात. काम, घराच्या जबाबदाऱ्या आणि काही कर्तव्य यातून फारसा वेळ मिळतच नसतो. त्यात सगळच वेळेवर होत अस नाही म्हणजे आमच्या आयुष्यात कधी झालच नाही. पण म्हणून निराश होण हे शेवटच कारण नाही. निराश कधी झालोच नाही. कधी थांबलोच नाही. कधी मागे फिरुन पाहिलच नाही. जे आहे त्यांना घेऊन चालत राहिलो, पडत राहिलो, धडपडत राहिलो, प्रसिद्ध नाही झालो, पण सिद्ध झालो. तो या भटकंती मुळेच.
निसर्गाशी असलेला रुणानुबंध आणि रक्तातील तेज जागवुन ठेवण्यासाठी भटकंती शिवाय दूसरा पर्यायच असू शकत नाही. स्वावलंबन, आत्मविश्वास, साहस, जिद्द, बंधुभाव, समजुतदारपणा, तडजोड, ध्येयासक्ती, निसर्गप्रेम, प्रसंगावधान, संकटांशी मुकाबला एवढं सगळ कमवल ते या सारासार प्रपंचातुन. कधी स्पर्धा केली नाही पण म्हणून आव्हान उडवली सुद्धा नाहीत. ती पुरेपूर पेलुन धरली. वेळेच बंधन तर नव्हतच आणि आर्थिक अडचण ही भासली नाही, तशी भासूच दिली नाही कारण ' शेजाऱ्याच पोर पाजाऱ्याकड़े ठेऊन शौक करण ' आमच्या हिशोबात नसत.
या निसर्गान अर्थात सह्याद्रीन त्याच्या अष्टपैलू सौंदर्यान मोह घातला आहे तो सुटने शक्य नाही. निसर्गाच रौद्ररूप, अक्राळविक्राळपणा, कधी भीषण वादळवाऱ्यांची व धुंवादार पावसाची गाज, वैराण भगभगित उन्हाचे चटके, कातळ-दऱ्या-सुळक्यांमधून आपल पिळदार, राकट पुरुषी सौंदर्य दाखवतो तर दुसरीकडे सूर्यास्ताच्या रंगबिरंगी छटांच मनोहरी दर्शन, मोकळ्या पाठीवर सोडलेल्या लता-वेली-झऱ्यांमधून जंगली हिरवाईच तारुण्य दाखवतो.
या छंदामुळे निसर्गाच्या निकोप निरोगी, विराट-बेलाग रुपाच एवढं दर्शन घडत की सगळा अहंकार, आढ़यता सार काही त्याच्या समोर गळून पडत. अस म्हणतात की या उत्तुंग आणि ऊंची पुढे आपल खुजेपण दिसत. ही ऊँची दाखवून देते. पण तरीही कौतुक याच आहे की या सर्वांवर मात करण्याची ईर्षा...!! आणि याच इर्शेतुनच जन्माला आला आहे हां भटकंतीचा-गिरीभ्रमणाचा छंद. आणि याच आता व्यसन लागलय आणि आई म्हणायची, " घेतलेला श्वास आणि लागलेल व्यसन मेल्याशिवाय सुटत नाही आणि जे सुटत ते व्यसन नाही...!!!"
Comments
Post a Comment