ट्रेकिंग... हा रेहमानी किडा खूप वर्षापासून अंगात वळवळतोय.. नाद, व्यसन आणि माझ्या भाषेत सांगायचे
झाल्यास खाज यालाच म्हणतात... हाफिसला सुट्टी असली कि हा किडा वळवळू लागतो. मग जमेल तसा
वेळात वेळ काढून शहरालगत जवळपास कोणत्याही गडकिल्ल्यावर किंवा एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी
जावून ट्रेक करू लागलो... जुन्या नव्या मित्रांना फोनाफोनी, फेसबुक Whats App वर चाटाचाटी करायची,
प्लान ठरवायचे नि सुमडीत जावून यायचे माझे उद्योग काही महिने बंद झाले होते... पण त्याचा जास्त काळ निभाव लागला नाही...
गेल्या वर्षी विक्रांतसोबत दोन-चाकीवरून उत्तर कोकणातील सात सागरी किल्ले फिरून आलो... पण इथल्या
डोंगरी किल्ल्यांची सफर या ना त्या कारणाने हुकली... शेवटी मुहूर्त भेटला... आजकाल माझी सुट्टी
weekdays मध्ये येत असल्याने कोणीतरी रिकामटेकडा शॊधत होतो आणि तो सापडला... किल्ला ठरला तो "अशेरीगड".
भर पहाटे उठून आवरावर केली... आई-बाबांना कुठे चाललोय याची माहिती रात्रीच दिली होती... ५ वाजता
घर सोडले... दादरहून पालघरला जाणारी डहाणू लोकल ५:४१ ची आहे... ती सुटली... माझ्याआधी येवून
वाट पाहणाऱ्या मित्राचा सकाळ सकाळ शिव्यांचा नाश्ता केला नि विरार लोकल पकडली... विरारहून
आम्हाला ७:०४ ची बोइसर मेमो होती... ती पकडायची ठरले... विरार उतरलो तसा एक मैतर भेटला...
आमच्या सोबत यायचा प्रस्ताव मांडला त्याने हो नाही करता करता आमची ७;०४ ची बोइसर सुद्धा गेली...
पुन्हा ०७:४० ची विरार शटल पकडून ८:४५ ला पालघर स्थानकात दाखल झालो... सपाटून भूक लागली
होती... त्याआधी अशेरीला जाण्यासाठी गाड्यांची चौकशी केली नि मस्त मिसळपाव हाणला... विरारला हो
नाही करणारा मित्र आता तयार झाला होता... त्यालाही लहर आली होती... मग त्याची वाट पाहत १०
वाजले.... पालघरहून मस्तान नाक्यापर्यंत म्हणजेच मुंबई-अहमदाबाद हायवेवर टमटमने आलो व तेथून
खोडकोना गावच्या फाट्यापर्यंत रिक्षाने आलो...
इथूनच आमची रपेट सुरु झाली.... नदीचा पूल ओलांडत गावच्या वेशीजवळ असलेल्या मंदिराजवळ थोडावेळ विसावलो... मंदिरात सागाच्या लाकडात कोरलेली वाघाची मूर्ती आहे तसेच त्याच्या आजूबाजूला शेन्दुर
फासलेले छोटेमोठे देव आहेत..
इथूनच अशेरी सर आमच्याकडे आ वासून पाहत होते... Weekdays मुळे ट्रेकर्स लोकांची इथे वर्दळ कमी होती
बहुतांशी कमीच असते... २०- २५ घरांचा उंबरा असलेले हे गाव वनराईने वेढलेले आहे... गावात रोजची
नित्याची कामे सुरु होती... ग्रामसडक योजनेचा लाभ या गावाला खूप लवकर मिळाला म्हणून कि काय गावच्या वाटेत असलेले एक भले ओठे चिंचेचे झाड गावकरी मंडळी तोडत होती... एका घरात पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. त्यातल्या त्यात एका गावकर्याने त्या पाडलेल्या झाडाला लागलेल्या चिंचा आणून दिल्या आणि गडाकडे जाणारी वाट दाखवली...
जंगलवाट असल्याने थकवा जाणवत नव्हता... चालता चालता १-२ सापांची भेट झाली.. गडाच्या पायथ्याशी पडक्या वाड्याचे किंवा मंदिराचे अवशेष आहेत... पायथ्यापासून १५-२० मिनिटांच्या चढाईनंतर उघड्यावर असलेली लाकडातच कोरलेली वाघाची मूर्ती दिसते... अजून पुढे वर चढल्यावर कातळात खोदलेल्या पायऱ्या व बाजूला एक गुहेचा मार्ग दिसतो..
या पायऱ्या चढल्यानंतर आपण एका मोठ्या कातळाला वळसा घेत खिंडीजवळ पोचतो.. या कातळावर गणेशाची मूर्ती कोरलेली आहे.. कदाचित हेच गडाचे प्रवेशद्वार असावे.. हि गणेशखिंड अरुंद आहे... पूर्वी हि खिंड चढण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागायचे परंतु कोण्यातरी दुर्गप्रेमी संस्थेने इथे लोखंडाची शिडी लावून हा मार्ग सुकर केला आहे...
खिंड चढून वर आल्यावर समोरच "राजाची टोपी" दिसते... हि टोपी म्हणजे पोर्तुगीज राजसत्तेचे राजचिन्ह आहे...
सध्या या राजचिन्हावर कोण्यातरी महाभागांनी सोनेरी रंग देवून टोपी सजवली आहे आणि त्यावर आपली नावे लिहून मोठा पराक्रम केला आहे... डाव्या बाजूला बुरुजाचे व तटबंदीचे अवशेष पहावयास मिळतात...
राजचिन्हापासून अरुंद व कोरीव पायऱ्या चढत वर आल्यावर आपण गडाच्या भग्न प्रवेशद्वाराजवळ येतो... भग्न प्रवेशद्वाराच्या खांबावरील दगडावर थोडेसे नक्षीकाम केलेले आढळते व पोर्तुगीज बांधकाम शैलीतील तटबंदी दिसते...
डाव्या बाजूला जवळच पाण्याची २ टाकी आहेत.. या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही... प्रवेशद्वाराच्या
उजव्या बाजूस असलेल्या ४-५ टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरू शकतो... परंतु या टाक्यांपर्यंत जाणारी
वाट हि निसरडी असल्याने काळजी घ्यावी..
गडाचा घेर फार मोठा आहे... तसेच नैसर्गिक कातळकड्यांमुळे गडावर तटबंदीचे अवशेष फार कमी पाहायला
मिळतात... उजव्या बाजूने चालत गेल्यास आपणास मुंबई-अहमदाबाद हायवे दिसतो... डाव्या बाजूला
जवळच पाण्याची २ टाकी आहेत.. या टाक्यातले पाणी पिण्यायोग्य नाही... प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस
असलेल्या ४-५ टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरू शकतो... परंतु या टाक्यांपर्यंत जाणारी वाट हि निसरडी
असल्याने काळजी घ्यावी.. गडाचा घेर फार मोठा आहे... तसेच नैसर्गिक कातळकड्यांमुळे गडावर तटबंदीचे
अवशेष फार कमी पाहायला मिळतात... उजव्या बाजूने चालत गेल्यास आपणास मुंबई-अहमदाबाद हायवे
दिसतो... ज्या गावातून गडावर आलो ते खोडकोना गाव दिसत. उजव्या बाजूने पुढे चालत आल्यास आपण
एका खिंडीत पोहोचतो... येथून गडावर येण्यासाठी वाट असावी असा अंदाज आहे... येथूनच समोर दिसणारी
डोंगररांग आपणास खुणावते...
डावीकडे जाणारी वाट आपणास थेट गुहेपर्यंत घेवून जाते... १५-२० जणांची राहण्याची आरामात सोय होईल
अशी गुहा आहे... गावातील लोकांचे ग्रामदैवत असलेल्या देवीचा तांदळा म्हणजेच मुखवटा आहे... गुहेची
संरचना पाहण्यासारखी आहे... गुहेतील थंडगार वातावरण गडावर येईपर्यंत झालेला सारा थकवा दूर करते...
नैसर्गिक AC यालाच म्हणावे लागेल... गुहेच्या बाहेर एक तोफ ठेवलेली दिसते.. संपूर्ण गुहेला कोण्यातरी
आजूबाजूच्या मंडळाने Oilpaint मारून आपली नवे लिहून घाण करून ठेवली आहे... गुहेच्या उंबऱ्यात
बसण्यासाठी एक कठडा बनवला आहे.. इथले थंडगार वातावरण मला सोडवत नव्हते... सगळ्यांना जोरात
भूक लागली होती... घरून आणलेले लाडू आणि माझ्या दोस्तांनी आणलेले ब्रेड-जाम, सॉस, चिवड्यावर
आडवा हात मारून कठड्यावर थोडी विश्रांती घेतली...
पायथ्यापासून इथे येण्यासाठी आम्हास दीड दोन तास लागले... गुहेच्या वरच्या बाजूस पाण्याचे तळे आहे...
सुकलेल्या तळ्याच्या बाजूलाच एक बांधीव तळे आहे.... हे तळे कमळफुलांनी बहरून गेलेले आहे... मी
पाहिल्याप्रमाणे एवढ्या उंच किल्ल्यावर कमळपुष्प असणारे हे एकमेव तळे असावे...खूप उशीर आम्ही येथेच
घुटमळत बसलो..... यापुढच्या तळ्यात आमच्या संपलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या... आणि
गडाला निरोप द्यायचा ठरला...
गडाचा घेर मोठा असून कारवीच्या झाडांनी गडावर रान माजवले आहे... त्यामुळे संपूर्ण गड फिरता येत
नाही... किल्ल्यावरून कोहोजगड, असावा, महालक्ष्मीगड आपणास दिसतात... ट्रेकर्स मंडळींचा या ठिकाणी
कमी राबता असल्याने किल्ला स्वच्छ आहे.. मुळात उत्तर कोकणातील किल्ल्यांची पुरेशी माहिती आणि
प्रसार कमी असल्याने हे किल्ले उपेक्षित आहेत... येथून दिसणारी उत्तर कोकणाची डोंगररांग व त्यात
आपला डौल दाखवणारे किल्ले आपल्या भेटीसाठी दिमाखात उभे आहेत... ठाणे जिल्ह्यातील वाडा, पालघर,
डहाणू तालुक्यात जवळपास १० ते १५ किल्ले आहेत.. येथील किल्ल्यांच्या पुरेशा ऐतिहासिक माहिती अभावी
पर्यटक आणि लोकांचा कल कमी दिसतोय..
या लेखाद्वारे येथील या अपरिचित गडकिल्ल्यांवर ट्रेकर्स, इतिहासप्रेमी आणि पर्यटक यांस चालना मिळून
किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, इतिहासप्रेमी मार्फत
किल्ल्याच्या इतिहासावर नवे शोध उपलब्ध होतील.... यासाठीच हा लेखनप्रपंच..
इतिहास :-
अशेरी म्हणजे शिलाहारवंशीय भोजराजाने बांधलेला म्हणजे सुमारे ८०० वर्षे जुना समुद्रसपाटीपासून १६८०
फूट उंचीवर असलेला एक गिरीदुर्ग.आपल्या समुद्रावरील किनारपट्टीवर बर्याच काळ राज्य करणाऱ्या
पोर्तुगीजांनी ह्या गडाचे महत्व लक्षात घेऊन इ. स. १५५६ ते इ. स. १६८३ अशी १३० वर्षे हा गड स्वत:च्या
ताब्यात ठेवला.पुढे संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला.पण ४
वर्षातच म्हणजे इ. स. १६८७ ला पोर्तुगीजांनी हा गड परत आपल्या ताब्यात घेतला.त्यानंतर बरोबर ५०
वर्षांनी चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेच्या वेळी मराठ्यांनी इथे भगवा फडकावला.पुढे ८१ वर्ष मराठ्यांनी
हा गड आपल्याकडे राखण्यात यश मिळवले पण ब्रिटिशांनी भारत गिळंकृत करताना १८१८ ला हा गड
आपल्या ताब्यात घेतला.
Comments
Post a Comment