परवा दिवशी विक्रांतसोबत नुकताच पनवेल जवळील माझ्या आवडत्या गाढेश्वराच्या दर्शनासाठी गेलो होतो. खारघरमधून गाडी जशी मोठ्या रस्त्याला लागली तसा वारा पिल्यासारख भन्नाट सुटलो. जशी गाडी धोदाणी रोडला लागली तसा 10 वर्ष मागे गेलो.. 2004 ते 2007 अशी तीन वर्षे मी या भागात कुठे कुठे फिरलो याची माहिती देत आजूबाजूला विकसित होणाऱ्या गावांना मागे टाकत पुढे जात होतो. विक्रांतने गाडीचा वेग देखील मर्यादित केला होता. संध्याकाळचे 7 वाजले होते. तापलेली धरणी शांत होत होती.. सूर्य मावळला होता.. आकाशात पश्चिमेला पुसटशी भगवी लकीर उमटली होती. मंद वारा वाहायला सुरुवात झाली होती. नेरे गावाला मागे टाकले. शांतिवन , सांगटोली मागे टाकत बोलता बोलता गाढेश्वराच्या मंदिरापाशी पोचलो. मंदिराचा जिर्णोद्धार होऊन तीन चार वर्षे झाली असतील. पायरीजवळ खाली झुकून नमस्कार केला अन गाभाऱ्यात शिरलो. साडे सात वाजले असतील. पिंडीसमोरील घंटा वाजवला अन शंभो महादेव म्हणत दोघेही नतमस्तक झालो. देवळात आल्या पावली मागे फिरायचं नसतं असं जुनी माणस सांगतात. म्हणून थोडा विसावा घ्यावा असा निर्णय घेऊन गाभाऱ्यात असणाऱ्या ओट्यावर बसलो.
घड्याळात 8 वाजले होते. अशीच प्राचीन जुन्या शिवमंदिरांवर चर्चा करता करता एकमेकांनी पाहिलेल्या शिवमंदिरांची उजळणी झाली. ट्रस्ट, मंडळ व इतर लोकांनी कसे करीत भविष्यातील पैसा पाहत या वैरागी महादेवाचा पैसेवाला देव कसा केला यावर चांगलीच चर्चा झडली. निर्मनुष्य ठिकाणी, डोंगरावर, नदीकाठी स्मशानभूमी शेजारी असलेली अनेक शिवमंदिरे इथेच का बांधण्यात आली असावीत ? स्वयंभू शिवमंदिरांची वैशिष्ठे कशी होती यावर गाढेश्वर मंदिराबद्दलची माहिती विक्रांतला दिली. तर विक्रांत ने देखील संगमेश्वर व देवरुख नजीकच्या महादेव मंदिरांची माहिती दिली.
या गाढेश्वर मंदिराबद्दल एक माहिती देऊ इच्छितो.. गाढेश्वराचे जिर्णोद्धार झालेल्या जागी पूर्वी छोटेसे जुने हेमाडपंथी मंदिर होते. पनवेल तालुक्यात पंचक्रोशीत गाढेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे. शिवरात्रीला मोठी जत्रा आजही येथे भरते. श्रावण सोमवारी दर्शनासाठी येथे रांगा लागतात. २००४ ते २००७ मध्ये मी या भागात आठवड्यातून 2 दिवस सामाजिक कार्यासाठी यायचो. इथूनच पुढे सावंत सरांचा फार्म हाऊस आहे. सरांनी शांतीवन गोशाळेतून बऱ्याच गायी येथे संगोपनासाठी आणल्या होत्या. त्यावेळेस माथेरान पायथ्याचे जंगल सुजलाम होते. जंगली जनावरांचा कमी वावर असल्याने मी या जंगलात गुरांच्या मागे यथेच्छ फिरलो. गाढेश्वर धरण, चंदेरी, विकटगड, माथेरान या परिसरात चांगलेच फिरणे झाले. बरेचसे आदिवासी पाडे खूप मागासलेले होते. पनवेल पासून 20 किमी वर असलेला हा भाग दुर्गम होता. शाळेची उत्तम सोय पनवेल आणि शांतीवन आश्रमाशिवाय कुठेच नव्हती आणि आजही नाही. शांतीवन येथे असलेल्या कुष्ठरोगी आश्रमात सदस्य म्हणून काम करायचो. तसेच येथील गोशाळेत अधून मधून काम करत असायचो. सावंत सरांमुळे या संस्थेचा सदस्य म्हणून ५ वर्षे निस्वार्थ कार्य करता आले. त्यामुळे इथे येता जाताना वाटेत असलेल्या गाढेश्वर मंदिराचे दर्शन नित्याचे झाले होते. २६ जुलै २००५ साली झालेल्या अतिवृष्टीत गाढी नदीला महाभयंकर पूर आला होता. कितीक नदीकाठी असलेली घरे वाहून गेली. गाड्या, जनावरे वाहून गेली. नदीच्या आजूबाजूच्या परिसरात गाळाचे चिखलाचे साम्राज्य पसरले होते. पनवेल शहरात पुराचे पाणी शिरून हाहाकार झाला होता. प्रचंड जीवितहानी व वित्तहानी झाली होती. न भूतो न भविष्यती अशा प्रलयात त्याच नदीकाठचा गाढेश्वर मात्र पैलवानासारखा शड्डू ठोकून स्तब्ध उभा होता. पेबगड व माथेरानच्या अंगावरून आलेला पुराचा लोंढा त्यासोबत मुळासकट उन्मळून आलेली असंख्य झाडे, लाकडे, मोठंमोठाले दगडं याचा काहीच परिणाम या वैराग्याला झाला नव्हता. मंदिराचा कळस शाबूत होता मंदिराच्या एका दगडालाही इजा झाली नव्हती. कोणे काळी बांधलेल्या या मंदिराच्या स्थापत्यकाराच्या या अविष्काराचे चीज झाले होते. स्वर्गातून तो मोठ्या कुतूहलाने या मंदिराकडे हसतमुख पाहत असेल अगदी डोळ्यात आनंदाश्रू तरळले असतील त्या विश्वकर्माच्या.
या अतिवृष्टीनंतर तब्बल एक महिन्याने मी शांतीवन आणि सावंत सरांच्या फार्म हाऊसला भेट दिली होती. सरांची तीन जनावरे या प्रवाहासोबत वाहून गेली होती. त्यादिवशी ती नदी काठावर चरत होती. फार्म हाऊसच रूप अगदीच पालटून गेलं होतं. शेताशेजारी असलेल्या ओढ्याने माथेरानवरील झाडा-लाकडांचा ढीग खाली आणला होता. वित्तहानी झाली असली तरी घरातील नोकर व सावंत सर सुखरूप होते यामुळे अगदीच निराश झालो नव्हतो.
पनवेलकडे परतताना गाढेश्वरला उतरलो. मंदिराच्या आसपास स्मशानशांतता होती. गाढी नदीच्या खळाळत्या पाण्याचा आवाज निनादत होता. गाभाऱ्यात शिरलो अन महादेवापुढे मनापासून नतमस्तक झालो.. काही दिवसांपूर्वी कैलासाच्या या शंभूने त्याचा रौद्ररूप दाखवले होते. आता तो शांत आणि भोळ्यासारखा भासत होता. वयाच्या सतराव्या वर्षी निसर्गाने त्याचे अदभुत दर्शन घडविले होते. अविस्मरणीय अनुभूती मला मिळाली होती. तरुणाईत नास्तिकतेकडे झुकत चाललेल्या माझ्यासारख्याला अस्तिकतेचीही कास धरायला या सह्याद्रीच्या कुशीतल्या महादेवाने शिकविले होते.
जेव्हा जेव्हा इथे येण्याची ओढ लागते तेव्हा तेव्हा कोणाला तरी सोबत घेऊनच येतो. दसऱ्या दिवशी पूनमला सोबत आणले होते. तिला हा परिसर खूप आवडला. इथल्या देहरंग धरणात चंदेरीच पडलेलं प्रतिबिंब मन प्रफुल्लित करते. तर माथेरानच्या डोंगरातून नागमोडी वळणे घेत माथ्यावर जाणारी मिनी रेल्वे तिच्या कर्णकर्कश आवाजाने लक्ष वेधून घेते अन त्या मोठ्याला डोंगरात तिचा ठाव घ्यायला भाग पाडते. माथेरानच्या शेजारी प्राचीन इतिहास सामावून असलेला पेब किल्ला व किल्ल्याच्या माथ्यावरील नव्याने बांधलेले दत्त मंदिराचा कळस आकर्षित करतो.
आजवर पाहिलेल्या अनेक ठिकाणांना परत परत भेटी देवूनही काहीतरी नवे गवसत असते. ओढ मात्र सुटता सुटत नाही. रोजच्या धावपळीत क्षणिक का होईना पण मला काही वेळ इथे व्यतित करण्याची आतुरता कायम असते आणि मी तिला सोडत नाही.
"जरी असलो नसलो तरी इथेच मी राहीन
तुझ्याच कुशीत सारे जग मी पाहीन...."
बरेच दिवस फिरण्याला "किंचित"सा स्वल्पविराम दिला आहे. पण नसानसात वाहणाऱ्या रक्तात कुठेतरी फिरण्याची नवीन काहीसं पाहण्याची कितिक नवीन गोष्टी अनुभवण्याची सवय मात्र गेलेली नाही. रॉकस्टार चित्रपटातल माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक मस्त गाणं आहे.
फिर से उड़ चला
उड़ के छोड़ा है जहां नीचे
मैं तुम्हारे अब हूँ हवाले हवा
दूर-दूर लोग-बाग़ मीलों दूर ये वादियाँ
कर धुंआ धुंआ तन हर बदली चली आती है छूने
और कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये है भी ना हो
किसी मंज़र पर मैं रुका नहीं
कभी खुद से भी मैं मिला नहीं
ये गिला तो है मैं खफ़ा नहीं
शहर एक से, गाँव एक से
लोग एक से, नाम एक
फिर से उड़ चला
मिट्टी जैसे सपने ये कित्ता भी
पलकों से झाड़ो फिर आ जाते हैं
इत्ते सारे सपने क्या कहूँ
किस तरह से मैंने तोड़े हैं छोड़े हैं क्यूँ
फिर साथ चले, मुझे ले के उड़े, ये क्यूँ
कभी डाल-डाल, कभी पात-पात
मेरे साथ-साथ, फिरे दर-दर ये
कभी सहरा, कभी सावन
बनूँ रावण क्यूँ मर-मर के
कभी डाल-डाल, कभी पात-पात
कभी दिन है रात, कभी दिन-दिन है
क्या सच है, क्या माया है दाता
इधर-उधर तितर-बितर
क्या है पता हवा लिए जाए तेरी ओर
खींचे तेरी यादें तेरी ओर
रंग बिरंगे वहमों में मैं उड़ता फिरूं
सिमेंटच जंगल सोडून निसर्गाच्या कुशीत शिरताना या गाण्याचा आस्वाद मी नेहमी घेत असतो. त्यात महादेवाचं मंदिर असल्यावर गाभाऱ्यात मिळणारी ऊर्जा शरीरात वेगळेच चैतन्य निर्माण करते. डोक्यावरल विचारांचं ओझं हलकं होऊन जातं. सुखद शांतता मिळते.
शिव-शिवराय-सह्याद्री या त्रिमूर्तीशी माझं जन्मजन्मांतरीच नातं आहे.
- जातिवंत भटका
Superbbbb .... God bless u ��
ReplyDelete