अप्पर सीटवर जागा मिळाली रुप्याचा MP3 घेऊन गाणी ऐकत कधी झोप लागली अन कधी सोलापूर आले कळलंच नाही. स्टेशनबाहेर असलेल्या प्रसिद्ध "अमृततुल्य" चा चहा पियालो. आज दसरा होता गडवाट परिवाराकडून परांडा किल्ल्यावर आज तोरण बांधले जाणार होते... जुना गडवाटकरी मित्र सुदर्शन हारफूले घेऊन हजर झाला बऱ्याच वर्षांनी गळाभेट झाली. दोन्ही गाड्या आल्या.. बॅगा ठेवून जागा पकडल्या.. तिथूनच पुढे एका उडप्याच्या हॉटेलात आमचा पोटभर नाश्ता झाला.
 |
सुदर्शनला निरोप देताना काढलेला ग्रुप फोटो |
सोलापूर येथील संभाजी महाराज चौकात सुदर्शनला निरोप दिला आणि भटक्यांच्या दसऱ्याला इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. गाडी हायवेला लागली तशी पोर रानवारा पिऊन तरतरीत झाली होती. आमच्या गाडीत मी, मोठा अमर, सुबोध, रुपेश, सुरज, जयेश आणि किशोर अशी टीम होती तर बाकीची दुसऱ्या गाडीत. दोन्ही गाडीत धमाल मस्ती सुरु झाली. वैराग येथे दोन मित्रांची सोबत झाली आणि इथला फक्कड चहा झाला. आता पुढील लक्ष होते बार्शीतील प्राचीन भगवंत मंदिर.. सोलापूर ते बार्शी ७० किमी असे दीड तासाचे अंतर आहे. १०:३० वाजता आम्ही भगवंत मंदिरात पोचलो. विष्णूदेवाचे मनोभावे दर्शन झाले. इतिहास अभ्यासक मित्र राज जाधव यांची स्नेहभेट तसेच खास रे TV या युट्युब चॅनेलच्या टीमची खासम खास भेट झाली.
या मंदिराबद्दल मिळालेली माहिती अशी कि, भगवंत मंदिर हे विष्णु देवाचे मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे भारतातील एकमेव विष्णु मंदिर आहे. इ.स. १२४५ साली हेमाडपंथी शैलीने हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिरास प्रत्येक दिशेने प्रवेशद्वार आहे, मुख्य द्वार पूर्वमुखी आहे. गाभाऱ्यात गरुड़खांब आहे. चैत्र, मार्गशीष, आषाढी व कार्तिकी एकादशीस भक्तगण दर्शनासाठी येतात. आषाढी व कार्तिकी एकादशीस गरुडस्वार भगवंताची मिरवणुक शहरातुन काढली जाते. प्रत्येक पुर्णिमेस छबीना बाहेर नेह्ण्यात येतो. पुराणात इथे अंबरीश राजा राज्य करत असल्याचे उल्लेख इथे सापडतात. "दहा खंड पृथ्वी, अठरा खंड काशी, बार्शीत नांदतो अंबऋषी.." तसेच पुराणातील आणखी एक उल्लेख म्हणजे भगवान विष्णूच श्री भगवंत या अवतारातलं मंदिर फक्त बार्शीतच आहे इतर कुठेही नाही. पंढरपूरला जाऊन केलेला एकादशीचा उपवास बार्शीत येऊनच सोडावा लागतो असे येथील लोक मानतात. म्हणून बरीच भाविक लोक पंढरपूरच्या वारीनंतर बार्शीत येऊन द्वादशी दिवशी उपवास सोडतात.
 |
भगवंत मंदिर |
 |
भगवंत मंदिर |
या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य असे कि. भगवंत देवाची मूर्ती हि शाळीग्राम च्या दगडात घडवलेली आहे. भगवंत देवाच्या पाठीमागे लक्ष्मीदेवीची मूर्ती आहे जी सहसा लगेच नजरेत पाहता येत नाही. भाविकांना देवीचे दर्शन व्हावे म्हणून उजव्या बाजूस आरसा लावलेला आहे त्यामुळे आरशातूनच दर्शन घेता येते. मंदिरांच्या आतील बाजूस, गाभाऱ्यात बरीच अप्रतिम नक्षीकाम व विविध शिल्प आपणास पाहायला मिळतात. पुरातन दगडी बांधकाम केलेली मंदिराभोवतालची भिंत तसेच मंदिरातील लाकडी बांधकाम शैलीमुळे हे देवस्थळं लक्ष वेधून घेते व मन प्रसन्न करते. मंदिराच्या जवळ असलेली सुदर्शन विहीर आम्हाला काही कारणास्तव पाहता आली नाही.
 |
मंदीरात असलेले नागशिल्प |
 |
एक राजा महादेवाची पूजाअर्चा करतानाचे शिल्प |
 |
गणपती बाप्पा |
 |
खांबावर असलेलं हत्तीचं कोरीव शिल्प |
 |
समोर दिसतेय ती भगवंताची मूर्ती व आरशात दिसणारी लक्ष्मी देवीची मूर्ती |
 |
मुरली वाजवणारा कृष्ण, घागर घेतलेली गवळण व गाई |
 |
मंदिराबाहेरील सुंदर नक्षीकाम |
 |
भगवान विष्णूची शेषशायी मूर्ती |
 |
मंदिराबाहेरून काढलेलं छायाचित्र |
 |
कोरिव नक्षीकाम केलेले दगडी खांब |
बार्शीतील या अप्रतिम मंदिरास व येथील मित्रांना निरोप देत आम्ही निघालो परांडयाकडे....
बार्शीतील या अप्रतिम मंदिरास व येथील मित्रांना निरोप देत आम्ही निघालो परांडयाकडे.... आबाच्या कुलदैवत असलेलं ठिकाण परांडा रस्त्यावर होत. रस्त्यावरच असणाऱ्या श्री क्षेत्र सोनारीच्या काळभैरवनाथ जोगेश्वरीचे दर्शन घेतले. मंदिर फार पुरातन असले तरी अलीकडे जीर्णोद्धार केला गेला असावा. मंदिरातील काळ्या पाषाणातील मूर्ती महाराष्ट्रातील सर्व "कुलदैवत" म्हणजेच खंडोबा, जोतिबा, सिदोबा, नाईकबा वैगेरे देवांच्या साजेशी मिळतीजूळतीच अशी आहे. मंदिराबाहेर देवाचा पुरातन लाकडी रथ आहे. ज्याचा वापर अजूनही रथोत्सव दरम्यान होतो. वेळेचं नियोजन पाहता दर्शन घेऊन ताबडतोब तिथून निघालो आणि परांडा एसटी स्थानकासमोर गाड्या लावून किल्ल्याकडे मोर्चा वळवला. किल्ला अगदी गावाच्या मधोमध बांधला गेलेला आहे. १२:३० वाजले होते दुपारचे कडकडीत ऊन पडले होते अन त्यात अंगाची लाही लाही झाली होती. लगोलग फोटो काढत आम्ही सगळे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. चारही बाजूने भल्या मोठ्या खंदकाने हा किल्ला वेढलेला आहे.
या किल्ल्याबद्दल मी अभिजित बेल्हेकर यांच्या लेखातून वाचले होते. त्यामुळे या किल्ल्याचे माझ्या लेखी थोडेफार वर्णन व अभिजित सरांनी परांड्यावर लिहिलेल्या लेखाचे उतारे इथे देतो आहे.
मूळची ही प्रत्यंडक नगरी! काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांचीच ही दुर्गनिर्मिती, ज्याला पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केले. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ातील हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे, ज्यामध्ये या पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चार हजार गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख! हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला!
 |
परांडा |
 |
किल्ल्याबाहेरील खंदक |
 |
राजहंसाची नक्षी असलेला दगड |
 |
मारगिरीच्या छिद्रातून डोकावणारी तोफ |
कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. आत यावे तो सर्व बाजूने तट-बुरुजांचे बांधकाम अंगावर येते. वर निमुळते होत गेलेले ते अर्धगोल-अष्टकोनी बुरूज, त्याच्या टोकाकडील ते गवाक्ष, तोफांच्या खिडक्या, अंगावर बाण सुटावेत त्याप्रमाणे त्या तटातून विविध कोनांतून बाहेर येणाऱ्या जंग्या (मारगिरीची छिद्रे), संपूर्ण तटातून जागोजागी डोकावणाऱ्या तोफा.. हे सारेच दृश्य एका बुलंद वास्तुची दहशत निर्माण करते. या दहशतीच्या छायेखालीच पुढे दुसऱ्या दरवाजाची कडी वाजवावी. याचाही दरवाजा अद्याप शाबूत. त्याला ओलांडून पुन्हा एक वळण घेत तिसऱ्याच्या दारात उभे ठाकावे. या दरवाजाच्या दारात एक चौकोनी आकाराची छोटीशी विहीर आहे. या विहिरीला आजही पाणी आहे. जणू हे पाणी पायांवर घेतच प्रवेश करायचा. या दरवाजाच्या लाकडी फळय़ा, त्यावरील पोलादी सुळे, साखळदंड अद्याप शाबूत आहेत. याच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक फारसी लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. याचे वाचन झाले नसल्याने त्याचा अर्थ लागत नाही, पण बहुधा या परांडय़ाला हे बुलंद रूप देणाऱ्या कुठल्यातरी शाही राजवटीचाच यावर उल्लेख असणार! हा गड मूळचा हिंदू राजवटीचा! त्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. त्याची पुनर्उभारणी केली बहमनी सत्तेचा प्रधान महमद गवान याने. पुढे निजामशाही, मुघल, आदिलशाही आणि पुन्हा मुघल असा या गडाने बराच काळ मुस्लीम राजवटींचाच अनुभव घेतला. यामुळे इथल्या स्थापत्यशैलीवरही त्यांचाच प्रभाव जाणवतो.
 |
तटबंदीतुन चालताना संरक्षक पाकळी भिंती व त्यातून मारगिरीची छिद्रे |
 |
पंचधातूची तोफ |
 |
खंदक व आतील संरक्षक अभेद्य बुरुज |
 |
फांजी व त्याखाली असलेल्या सैनिकांच्या देवड्या |
 |
सैनिकांच्या देवड्या |
 |
तोफेवर असलेल्या सिंहाचे शीर पळवून नेल आहे |
 |
ढालकाठी बुरुजावरील तोफ |
 |
विरगळीचे दगडाचा वापर तटबंदीत केलेला दिसतो |
 |
पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम |
 |
पुरातत्व खात्याची सुरू असलेली काम |
|
 |
डागडुजी केलेली तटबंदी व सावलीत निवांत बसलेले कामगार |
हा सारा इतिहास लक्षात ठेवत आम्ही दुर्गदर्शनाला सुरुवात केली. आज दसरा असल्याने तिथल्या पुरातत्व खात्याच्या कर्मचाऱ्याची परवानगी घेतली आणि दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावर तोरण बांधून आकाश ने गारद देऊन परिसर प्रफुल्लित केला आणि मन अधिक प्रसन्न झाले. किल्ल्यावर आम्हा १७ जनांशिवाय कोणीच नसल्याने किल्ला व्यवस्थित पाहता आला. सर्वात आधी तटबंदीच्या बेचक्यातून तटाबाहेरील मंहादेव मंदिराकडे गेलो जवळपास ४० ते ५० फूट उंच अशा तटबंदीच्या मधून आम्ही जात होतो.
 |
महादेव मंदिर |
उत्तराभिमुख दरवाजा पाहून तटबंदीवर आलो आणि उजव्या बाजूला वळत महाकाय तोफा पाहत हवामहाल पाहून फांजीवरून खाली उतरलो व गणपती मंदिर पाहून या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीरकडे आलो. एका कमानीखालील भुयारी मार्गातूनच या विहिरीत आपण उतरतो. प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली आहे. या जिन्यांनी या मजल्यावर आलो, की अष्टकोनातील प्रत्येक भागातील कमानींच्या त्या रचनेतून विहिरींचे सौंदर्य निराळे भासू लागते. आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे. असे म्हणतात, या विहिरीचे पाणी हत्तीद्वारे उपसले जाई. कमानींची रचना, बांधकामातील जिने, खोल्या, गच्ची, गवाक्ष या साऱ्यांमुळे गुजरातमधील शिल्पजडित विहिरींची आठवण होते. विहीरीत बऱ्यापैकी पाणी असल्याने आम्हाला खाली उतरता आले नाही. गडाचा आतील भाग पाहून मग त्याच्या तटावर चढलो. परांडय़ाचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील त्या प्रचंड तोफांमध्ये! गडाला २६ बुरूज आणि या प्रत्येक बुरुजावर धडकी भरवणाऱ्या २६ मोठाल्या तोफा ! यातील सहा तर पंचधातूच्या, उर्वरित पोलादी! यांची नावेही दहशत बसवणारी- मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणी, अझदहपैकर ऊर्फ सर्परूप, लांडा कासम, खडक अशी एकापेक्षा एक! निजामशाहीची शान असलेली ‘मलिका-ए-मैदान’ (जिचा आपण सारे ‘मुलूख-ए-मैदान’ असा चुकीचा उल्लेख करतो.) ही तोफ या गडावर काही काळ होती. इथून ती मुरार जगदेव याने आदिलशाहीच्या संरक्षणासाठी विजापूरला नेली. गडावरील या तोफांवर ती ओतणाऱ्या, घडवणाऱ्यांचे लेखही आहेत. दरवाजाशेजारील ढालकाठीच्या बुरुजावरील पंचधातूची तोफ अशीच बलदंड, आक्रमक! सारा बुरूज तिने व्यापलेला आहे, जिच्यावर तीन ठिकाणी लेख कोरलेले आहेत. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची सिंहांची एक जोडीही विसावलेली आहे. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या त्या अक्राळविक्राळ जबडय़ात तो तोफेचा गोळाही दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. यातील उत्तरेकडील बुरुजांवरील दोन अजस्र पोलादी तोफा पाहूनच दडपण यायला होते. त्यांचा आवाज, विध्वंस वृत्ती याची कल्पनाही करवत नाही. परांडय़ाचा हा बुलंद दुर्ग पाहताना त्याच्या या धडकी भरवणाऱ्या तोफा कायमच्याच लक्षात राहतात. परतीच्या वाटेत उजव्या हाताला दारूगोळा आणि तोफांनी भरलेले एक कोठार होते. हे दारुकोठार सध्या वटवाघळांच्या राहण्याचे ठिकाण झाले आहे. प्रचंड कुबट वास. छोट्या उखळी तोफा आणि दारुगोळ्यांवर त्यांची विष्टा पडून पडून दुर्दशा तर झालीच आहे आणि उंदरांनी ठिकठिकाणी उकरल्याने बरेच तोफगोळे ढिगाखाली बुजत आहेत. याकडे तेथील पुरातत्व खात नक्कीच लक्ष देईल हि इच्छा..
 |
|
 |
|
परांडय़ातील या तोफा, तोफगोळे, हिंदू देवतांची शिल्पे, प्राचीन शिलालेख या साऱ्या ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाच्या वस्तू आहेत. पण हा सारा ऐवज आज ऊन-वारा-पावसात धूळ खात पडून आहे. चोरा-लुटारूंचे त्याला भय आहे. यातील काही तोफांच्या कडय़ा, छोटेमोठे भाग कापून चोरल्याचेही दिसते. परांडय़ाच्या तटावरून फिरताना गडाच्या अन्य स्थापत्याकडेही लक्ष जाते. भल्या जाडजूड रुंदीच्या या तटावरून खालीवर करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. या गडाच्या प्रत्येक बुरुजापुढे अन्य एका बुरुजाचे चिलखत घातलेले आहे. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर लावलेली आहे. ही खास मुस्लीम स्थापत्यशैली. या तटावरून फिरत असतानाच त्याच्या लगतच्या खंदकाकडेही आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते. परांडय़ाला असा हा संपूर्ण किल्ल्याभोवतीने भला लांब-रुंद खंदक आहे. पण तिथे आज गावभराचे गटार सोडले आहे. उकिरडा आणि वेडय़ा बाभळीच्या झाडांचे जंगल माजलेले आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे पुरातत्व खात्याचं या किल्ल्यावर युद्धपातळीवर संवर्धन व नव्याने बांधकाम चालू आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही हा किल्ला सरस ठरेल.(काही भिंतीवर कोरलेली नावे सोडून) किल्ल्यावर सुरु असलेल्या कामामुळे ३६ खांब असलेले पूर्वीचे माणकेश्वर मंदिर म्हणजेच आताची मशीद आणि हमामखाण्यातील पुरातन मूर्ती व शिल्पे पाहता आली नाहीत.
पुरातत्व विभागाच्या कामामुळे २ ठिकाणे सोडून संपूर्ण किल्ला पाहायला २ तास लागला. पोटात कावळे ओरडत होते आणि आजच्या जेवणाची उपासमार होणार हे पाहता आम्ही प्रत्येकी २ केळी खात आता पुढील किल्ल्याकडे मार्गस्थ झालो होतो.
 |
साभार:- सह्याद्री ट्रेकर ब्लॉगर |
कोट-परकोट आणि त्याभोवती खंदक अशी या भुईकोटाची रचना! एका मागे एक तीन दरवाजे. या नागमोडी मार्गातील पहिला दरवाजा त्याच्या त्या तुटलेल्या दरवाजांसह आपले स्वागत करतो.
ReplyDeletemastach parat ekda javun alyasarakh vatal