गेल्या काही महिन्यांपासून लिखाणाला पूर्णविराम दिला होता. एखाद्या गडभ्रमंतीनंतर संपूर्ण प्रवासवर्णन लिहायचा असाच शिरस्ता ठेवला होता. कारण प्रवासवर्णन लिहिण्यामागे माझी स्वार्थबुद्धी लपली आहे एक तर जेव्हा पाय चालायचे थांबतील तेव्हा हेच प्रवासवर्णन पुन्हा वाचून काढायचे आणि आठवणी जागृत ठेवायच्या आणि दुसरे एखाद्या नवीन भटक्यास प्रवासवर्णनाद्वारे थोडीफार माहिती मिळेल किंवा ते देखील अशी प्रवासवर्णने लिहायला प्रेरित होतील. कारण मी देखील अशाच ब्लॉगरद्वारे प्रेरित झालो.
तीन दिवसांपूर्वी नुकतीच साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांस भेट देवून परतलो. गडवाट प्रवास सह्याद्रीचा संस्थेतर्फे गेली 5 वर्षे वर्षाखेरची भ्रमंती आयोजित करण्यात येते. आतापर्यंत गेल्या पाच वर्षात तब्बल ७० हुन अधिक गडभ्रमंती मार्फत नव्या तसेच जुन्या पिढीला महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास प्रत्यक्ष स्थळास भेट देवून अनुभवण्याचा प्रयत्न गडवाट संस्था करत आहे. किल्ल्यांवरील भ्रमंतीद्वारे नवनवीन मित्र तर भेटलेच परंतु त्यातून काहीतरी वेगळे करत गडकिल्ल्यांवरील स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा संस्थेने ठरविले. तसेच अनेक सामाजिक व सांस्कृतीक उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला आणि तो जपण्याचा प्रत्येक गडवाट सदस्य प्रयत्न करीत आहे.
यासोबतच 2012 पासून "सह्याद्री स्वच्छता अभियान" "निसर्गसंवर्धन मोहीम" या उपक्रमाद्वारे सह्याद्री व गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा यत्न गडवाट संस्थेने मांडला आहे.
गडवाट संस्थेच्या कार्याचा आलेख फेसबुकवरील पेजमार्फत आपणास पाहायला मिळेलच.
आता प्रवासवर्णनाकडे वळतो...
नोव्हेंबर मध्ये झालेल्या वासोटा मोहिमेनंतर शेवटचे वर्ष सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांच्या सानिध्यात जावे म्हणून दरवर्षीप्रमाणे सदस्यांचे फोन आले आणि नाशिकने कौल दिला. इगतपुरीच्या ईश्वराने हाक ऐकली आणि नियोजनास सुरुवात झाली..
बागलाण परिसर हा माझ्यासाठी नवाचं होता आणि मोहीम ठरली साल्हेर व मुल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांची.. नाशिकहुन तब्बल 130 किमी असलेल्या या निसर्गसंपन्न परिसराला मी आजवर फक्त मांगी तुंगी सोडून कोणत्याच किल्ल्यास भेट दिली नव्हती.
दुर्गवीर नितीनला मेसेज करताच त्याने तेथील दुर्गवीर रोहित यांचा संपर्क क्रमांक दिला आणि माझं पुढील नियोजन सोपं झालं. दुर्गवीर रोहित यांचं बागलाण भागातील कार्य खरंच नावाजण्यासारखं आहे. येथील तब्बल 16 किल्ल्यांवर त्यांनी दुर्गसंवर्धनाचा शिवधनुष्य हाती घेतला आहे..
साल्हेर व मुल्हेर किल्ल्यांवरील पाण्याची टाकी त्यात साचलेला गाळ काढून स्वच्छ करण्यात आला आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत संपणारे पाण्याचे स्रोत आता बारा महिने राहणार आहेत. त्यामुळे गडावर येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सना पाण्याचा तुटवडा भासणार नाही.
३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ हि मोहिमेची तारीख ठरली. येणाऱ्या प्रत्येकास थेट नाशकास भेटावयास सांगितले त्याप्रमाणे सर्व सदस्य ३० तारखेस रात्री १२ ते १ दरम्यान जमले अन तब्बल ६० गडवाटकऱ्यांची स्वारी साल्हेरकडे निघाली. नाशिक सदस्य उत्तमराव व अमित उर्फ मालक आम्हाला शुभेच्छा देण्यास आले होते. गाडी थोडी पुढे जाते तोच धुळेहुन येणारे सदस्यांचा फोन आला. गाडी बिटकोजवळ थांबवून उरली सुरली सगळी गाडीत बसली आणि नाशिकबाहेरच्या हायवेला गाडी लागली. जत्रा हॉटेल जवळ वैशाली आणि अंश हि मायलेकरं आले. थंडी वाजायला सुरुवात झाली ताशा गाडीच्या काचा बंद झाल्या करकरकर आवाज करता बंद झाल्या. घड्याळात २ वाजले होते. काहीजण झोपी गेली होती तर काहीजण चर्चा करण्यात मग्न होते, तोच ३ वाजता गाडी एका ढाब्यावर चहासाठी थांबली. चहापान उरकायला अर्धा तास गेला. पुन्हा मुलांना गाडीत बसवून गाडी बागलाणच्या मार्गाला लागली.
माझीही झोप लागते न लागते तोवर गाडी थांबली आणि मुलांची कुजबुज सुरु झाली. आबा, रुपेश, विक्रांत सारे महारथी गाढ झोपले होते. ड्रायव्हरला विचारताच रस्ता माहित नाही म्हणाला आणि नाशिकच्या पोरांनी गुगल मॅपवर इकडे चला तिकडे चला बोलायला सुरुवात केली आणि ज्या गोष्टीची चिंता होती तसेच झाले. थोड्यावेळासाठी वाट चुकलो. गाडीबाहेर उतरलो तशी हुडहुडी भरली.. थंडीत काकडत मी ,विक्रांत, bsf, ईश्वर दादा, ज्ञानेश, रविराज बाहेर पडलो. ड्रायव्हरने साल्हेर रस्त्याच्या अलिकडचा फाटा पकडून गाडी वळवली होती. चांदण्याच्या प्रकाशात दुरून साल्हेर सालोटा दिसत होता. जवळच्या गावातील काही लोकांनी बॅटरीचे प्रकाश आमच्या दिशेने फिरवायला सुरुवात केली व काही बायका आम्हाजवळ आल्या आणि अहिराणी शैलीत आम्हाला वाट दाखवली. गाडी वळवली तशी थोड्याच अंतरावर साल्हेरला जाणारा फाटा दिसला. अशी अलियाबाद वाघांबे मागे सारत मजल दरमजल करत आम्ही शेवटी साल्हेरवाडीत पोचलो. वनविभागाच्या प्रशस्त कार्यालयातील हॉलमध्ये सर्वांनी आपल्या बॅगा टाकल्या.
गुलाबी थंडीत असतानाच हळूहळू पूर्वेकडून तांबड फुटायला सुरुवात झाली. काही फोटोग्राफर मित्रांनी कॅमेरे बाहेर काढून सूर्यनारायणाचे फोटो काढण्यास सुरुवात केली तर काहीजण चादर ओढून गाढ झोपी गेले होते.
साल्हेर वनविभागचे वनपाल श्री. गायकवाड यांच्याशी थोडीशी चर्चा केली आणि सकाळची सांगोपंग कामे उरकून घेण्यास मुलांस सांगून साल्हेरवाडीतल्या सुनीलकडे गेलो. सुनील हा गावातील सुशिक्षित तरुण सध्या गावात हॉटेल चालवतो. त्याचबरोबर दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत तो कार्यरत आहे. मी त्याच्याकडेच सकाळचा नाश्ता आणि जेवणाची सोय करून ठेवली होती. हसतमुख चेहऱ्याने नमस्कार चमत्कार झाले आणि ७:३० ला नाश्ता घेऊन तो वनविभाग कार्यालयात आला.
इकडे सर्वांना एकत्र बसवून ओळखपरेड पार पाडली सर्वांना नियम व अटी सांगून चहा नाश्ता उरकला. सर्व कार्यभाग उरकायला आम्हास ८:३० वाजले. थोडी घाई करत सर्वाना गडवाटेवर घेऊन आलो नि चढाईस सुरुवात केली.
रमत गमत चालता चालता काहींच्या साल्हेर विषयीच्या गप्पा रंगल्या तर काहींनी हा किल्ला अमुक किल्ल्यासारखा दिसतो त्यावरून निष्कर्ष काढायला सुरुवात केली. गडावर जाणारी वाट मळलेली असल्याने कुठेही वाट चुकण्याची शक्यता नाही. पायथ्याला विरशिल्प आहे. तिथून एक वाट साल्हेरवासिनी गडकालिका माता मंदिराकडे जाते तर दुसरी वाट तुम्हाला गडाकडे घेऊन जाते. थोड्या वेळातच चढ लागला आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या.. पायऱ्यालगत असलेल्या बाजूस कातळ भिंतीवर गणपती बाप्पा विराजमान झालेलं पुराणिक शिल्प कोरल होत. जणू कितीक वर्षापूर्वीची साक्ष देणारं शिल्प असेल.
मी आणि आबा सर्वात मागे होतो मधील फळीत ईश्वरदादा, bsf व विलास दादा तर सुरज, विक्रांत व रुपेश लीड करत होते. थांबत थांबत विश्रांती घेत सर्वजण चालत होते. साल्हेरचा कडा जणू अंगावर येतो की काय असा भास येत होता.
कोण मोबाईलने तर कोण कॅमेऱ्याने किल्ल्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटो घेत होते. पाऊण तासात आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोचलो. किल्ल्याचा पहिला दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे तर बाजूचे बुरुज शिवपूर्वकाळाचे साक्ष देत उभे आहेत.
दरवाजातून आत आल्यावर पहिला सपाट भाग सुरु होतो. तर उजव्या बाजूस बालेकिल्ल्याचा कडा डोळ्यात भरतो.
डाव्या बाजूस अगदी कडेला एक समाधीवजा अवशेष आहेत.. येथून थोडस पुढे चालत गेल्यास हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती दिसते. या संपूर्ण किल्ल्यावर टोपली प्रकारच्या कारवीच्या झाडांचं साम्राज्य पसरले आहे. गेल्या ऑक्टोबर मध्ये इथले चित्र वेगळेच होते. ते मला फेसबुकवर पाहायला मिळाले. कारवीच्या फुलांनी संपूर्ण गड सजला नटला होता.
थोडे अंतर चालत गेल्यावर पुन्हा वरच्या पठारावर जाण्याकरिता चढ लागला व पुन्हा कातळात कोरलेल्या कोरीव पायऱ्या पार करत अजून एक दरवाजा पार करीत आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या पठारावर येऊन पोचलो. या पठारावर काही गुहा आहेत ज्या राहण्यायोग्य आहेत. गुहेसमोर गंगासागर तलाव आहे.
तलावात पाण्याची पातळी मोजण्यासाठी उभारलेला स्तंभ आहे. तलावाच्या बाजूस एक छोटेसे पुरातन मंदिर आहे.
पुरातनकाळी पृथ्वी निक्षत्रीय करण्यासाठी परशुरामाने होमयज्ञ केला होता अशी या किल्ल्यासंदर्भात आख्यायिका आहे. त्या होमाचे काही अवशेष येथे आपणास पाहायला मिळतील.
गुहेच्या वरच्या बाजूने आता आपणास किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. पायथ्यापासून आम्हाला इथे पोहोचण्यास अडीच तास लागले. यथोचित मंदिरातील परशुरामास नमस्कार चमत्कार करून झाला. मला तर अगदी जिंकल्यासारखं वाटत होत. इथपर्यंत येताना सर्वांचा थकवा संपूर्ण निघून गेला. चहूकडचा निसर्ग आजूबाजूचे किल्ले पाहन्यात जाणून घेण्यात सगळे दंग होते. प्रखर ऊन असताना देखील अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. किल्ल्याचा इतिहास व माहिती मुलांना दिली आणि विक्रांतने गगनभेदी गारद दिल्यानंतर किल्ला उतरण्यास सुरुवात केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या लक्षात राहील त्या गारदेची सुरुवात... महाराजsss..... सर्वांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला असणार यात मुळीच शंका नाही.
गुहेजवळ पोचताच उजवीकडे वळून सालोटा किल्ल्याकडे जाणारी वाट पकडली आणि कड्याच्या बाजूबाजूने साल्हेरच्या सालोटाकडील दरवाजाकडे आम्ही पोचते झालो.. कड्याच्या पोटात जवळपास 20 ते 20 टाकी खोदली आहेत. त्यातील 2 टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. समोरच सालोटा खुणावत होता व त्यावर जाणारी भेदक वाट डोळ्यात घर करून बसली. पुढच्या वेळेस लवकरच सालोट्याला भेट देण्याचा निर्धार करून आम्ही साधारण 2 वाजता परतीच्या मार्गाला लागलो.
आता सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. मलाही चांगलीच भूक लागली होती. गड चढताना झालेली दमछाक आता उतरताना होत नव्हती. दीड तासातच आम्ही पायथ्याजवळील साल्हेरनिवासिनी धारवासिनी गडकालिकामाता देवीच्या मंदिरात पोचलो. साल्हेरच्या रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या आनंदराव मकाजी आणि सूर्याजी काकडे यांच्या समाधीला मुजरा केला. मंदिरामागे संवर्धनात सापडलेले काही तोफेचे गोळे पाहिले. लांबून पुन्हा एकदा साल्हेर डोळ्यात साठवला आणि सुनीलच्या हॉटेलात पोचलो.
यथेच्छ जेवण करून आम्ही 5 वाजता साल्हेरवाडीला राम राम केला आणि मुल्हेरकडे मोर्चा वळवला. शेवटच्या वर्षीचा आमचा मुक्काम उद्धव महाराज यांच्या मठात केला होता. अर्ध्या तासातच आम्ही मुल्हेरला पोचलो. मठासमोरच आमची बस थांबली मठात प्रवेश करताच त्याच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जाणवत होत्या. औरस चौरस जागा असलेला हा मठ अतिशय पाहण्यासारखा आहे. उद्धव महाराजांची समाधी येथे आहे. दर १२ वर्षांनी या समाधीतून भागीरथी उगम पावते हा खरा इतिहास आहे. मठामागे असणाऱ्या यात्रेकरूंच्या खोल्यात आमची राहण्याची सोय उद्धव महाराज यांचे वंशज श्री किशोर महाराज यांनी केली होती. मुलांनी या खोल्यात आपापल्या बॅगा टाकल्या आणि सांगितल्या प्रमाणे समाधी मंदिराच्या बाजूला असलेल्या आवारात सगळेजण एकत्र बसले. मुलांचे अभिप्राय घेऊन आमच्यासोबत आलेले श्री. योगेश नागरे सरांनी आपल्या ओघवत्या वाणीतून व्याख्यानास सुरुवात केली
साल्हेरचा रणसंग्रामाबद्दल बोलताना जणू डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला होता. सकाळीच साल्हेरची भ्रमंती झाल्यामुळे गतकाळातच जाऊन आल्याचा अनुभव आला. दिवसभर एका शांत व मितभाषी असणाऱ्या श्री. योगेश सरांच्या सानिध्यात असलेल्या नव्या मुलांना त्यांचे करारी व्याख्यान ऐकताना आश्चर्याचा धक्काच बसला. परखड व करारी भाषाशैलीत त्यांनी इतिहासाची ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची बदनामी करणाऱ्यांवर टीका करताना आपण काय करू शकतो याबद्दल विवेचन दिले. तसेच गडाचे जतन व संवर्धन कशाप्रकारे करू शकतो याबद्दल मत व्यक्त केले. वेळेची मर्यादा असल्याने थोडक्यात पण सुंदर अशी माहिती श्री. योगेश सरांनी आम्हाला दिली.
त्यानंतर किशोर महाराजांच्या "देवघर" असे नाव असलेल्या तब्बल 450 वर्षांचा ऐतिहासिक वाडा आम्हाला पाहावयास मिळाला. सुंदर कोरीव लाकडांचे नक्षीकाम असणाऱ्या वाड्यात आमची जेवणाची व नाश्त्याची सोय झाली होती. मुल्हेर सोबतच पंचक्रोशीत हा वाडा प्रसिद्ध आहे. जेवण अगदी रुचकर जेवण असल्याने मुलांनी जेवणावर आडवा हात मारला आणि भरपेट जेवून एकदा मठात आलो नि हळूहळू सगळे झोपी गेलो कारण सर्वाना सकाळी ६ वाजता उठायची तंबी दिली होती.
झोपायला जागा नव्हती म्हणून मी आणि रुपेश मठातल्या आवारात अंथरून टाकून झोपी गेलो अन क्षणार्धात झोप लागली ती पहाटे साडे पाच वाजता जाग येईपर्यंत. सगळ्यांची आवरावर होईपर्यंत 7 वाजले. काल रात्री प्रमाणेच आजही देवघर वाड्यात ऐच्छिक नाश्ता झाला. किशोर महाराजांनी त्यांच पूजाअर्चा करण्याचं पुरातन देवघर आम्हासाठी उघडे केले नि देव्हाऱ्यात असलेल्या प्रत्येक मूर्तीमागील इतिहास त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या देवघरातील प्राचीन मुर्त्या जवळपास 450 वर्षांपूर्वीच्या आहेत खूप सुंदर व पाहण्यासारख्या आहेत.
7:30 वाजता आम्ही मुल्हेरच्या पायथ्याला निघालो व पायथ्याला पोहोचताच मुलांना सर्व माहिती देऊन गड चढायला सुरुवात केली. एका मागोमाग एक चालणारे असे सर्व गडवाटकरी कालच्या सारखेच ताजेतवाने दिसत होते.
आज आम्ही पश्चिमेकडील बाजूस असल्यामुळे आम्हाला दुपारी ११ वाजेपर्यंत उन्हाचा त्रास जाणवणार नव्हता. मुल्हेरगडाच्या सावलीत आम्ही चालत होतो. अर्ध्या तासातच आम्ही मुल्हेरच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो व पाच मिनिटात दुसरे प्रवेशद्वार पार करत शुद्ध पाण्याचा तलावाच्या ठिकाणी पोचलो. तलावाच्या ठिकाणी पुरातन कोरीव बांधकाम असलेले गणेश मंदिर आहे. या मंदिरामागून रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी व हरगड किल्ल्याकडे जाण्यासाठी मळलेली वाट आहे. गणेश मंदिर पाहून आम्ही वळलो बालेकिल्ल्याकडे नेणाऱ्या वाटेकडे.
किल्ल्यावर जास्तीत जास्त घाणेरीच्या झुडुपांची दाटीवाटी आहे. त्यातून जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यास समोरचं महिषासूरमर्दिनी देवीची दगडात कोरलेली सुंदर मूर्ती नजरेत भरते. या वाटेवरून 3 वाटा फुटतात उजवीकडील वाट सोमेश्वर मंदिराकडे व तेथून मोरा किल्ल्याकडे जाते, दुसरी वाट रामेश्वर मंदिराकडे व तेथून हरगड किल्ल्याकडे जाते, तर तिसरी वाट उजवीकडे थोडे अंतर चालून गेल्यास हत्ती तलाव व मोती टाके या स्थळाकडे जाते. येथूनच तुम्हाला मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट लागते. या वाटेने चालत गेल्यास अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या मध्ये असलेल्या घळीपर्यंत पोचतो. येथेच तुम्हाला बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो आणि 10 मिनिटात आम्ही गडमाथ्यावर पोचलो. घळीत असलेल्या भिंतींचे बांधकाम थोडेफार शाबूत आहे. किल्ल्यावर जवळपास १० ते १२ पाण्याची टाकी आहेत.
माथ्यावरून हरगड किल्ला, मोरा किल्ला, मांगी तुंगी, साल्हेर, सालोटा, न्हावीगड तसेच सभोवतालचा सुपीक प्रदेश नजरेत भरतो. गडमाथ्यावर 3 तलाव आहेत. प्रवेशद्वारासमोर असलेल्या पाण्याच्या एका टाकीत एक गाय मरून पडली होती. पाण्याच्या शोधात गडावर आलेली ती गाय अंदाज न आल्याने झुकता क्षणीच पडली असावी. आजही काही लोकांस पाण्याचे महत्व अजून समजले नसावे पण लवकरच अनुभव येईल यात शंका नाही. असो...
बालेकिल्ल्यावर खूप अवशेष आहेत. त्यात भडंगनाथ मंदिराच्या एका कातळ दगडावर एक शिलालेख कोरलेला आहे. भडंगनाथांचे छोटेसे मंदिर औंदुंबर झाडाच्या कुशीत विसावले आहे. इथेच आम्ही सर्वांनी पथारी पसरली. आणलेली शिदोरी उघडून पोटोबा केला. डॉ. भोजराज, विक्रांत आणि अनुराधा यांनी मोठ्या आवाजात आज्ञापत्र वाचन केले. ईश्वरदादा यांनी आभारप्रदर्शन, bsf ने मुल्हेरबद्दल माहिती आणि आबासाहेबाने गडवाटबद्दल माहिती दिली. विक्रांतच्या पहाडी आवाजाने पुन्हा एकदा गारद देऊन महाराजांस मानवंदना दिली. सर्वांचे मुजरे झडले... "जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव" चा आवाज दाही दिशेत दुमदुमला..
एका तासाच्या चर्चेनंतर १२:३० वाजता आम्ही बालेकिल्ला उतरून किल्ल्यावरील सोमेश्वर मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिराकडे जाणाऱ्या वाटा अनेक ठिकाणी ढोरवाटांमुळे फुटल्यामुळे थोडीफार तारांबळ उडाली. मातीत बुजून जायच्या तयारीत असलेली बांधीव अशी सुंदर चंदन विहीर आम्ही पाहिली आणि सोमेश्वर मंदिरात पोचलो. हजारो वर्षांच्या राजवटीचा इतिहास सांगत उभे असलेले हे देखणे शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याखाली महादेव विराजमान झाले आहेत. खोलवर कातळात खोदून छोट्याशा अरुंद अंधाऱ्या वाटेने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आतमध्ये १५ ते २० जण शिवलिंगाभोवती बसू शकतील अशी जागा आहे. एकेक करून आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. मंदिरासमोर असलेला मोरा किल्ल्याचा दरवाजा मला खुणावत होता. आम्हाला इथे २ वाजले होते भूकसुद्धा लागली होती. पण कोणासही सांगायची गरज लागली नाही हळूहळू आम्ही सगळेजण परतीच्या वाटेला लागलो. गडावर अनेक ठिकाणी घरांच्या जोत्यांचे अवशेष राहिले आहेत जे घाणेरीच्या झुडुपात लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. येथील दुर्गवीर व बागलाण प्रतिष्ठाण अशा संस्थांची गडसंवर्धनाकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे या किल्ल्याचं थोडंफार का होईना पण वैभव टिकून राहील. मयूरध्वज राजाची नगरी किती सुसंपन्न असावी याची अनुभूती पावलोपावली येते.
कालच्या आणि आजच्या मोहिमेतील साऱ्या आठवणी डोळ्यात आणि मनात साठवत किशोर महाराजांच्या वाड्यात आलो. जेवण कालसारखच चवदार व चविष्ट होतं. महाराजांनी पुन्हा एकदा काही मुलांना किल्ल्याबद्दल व वाड्याच्या बांधणी संदर्भात माहिती दिली.
आता २ दिवसीय मोहीम संपन्न झाली होती. अनेकांच्या झोळीत या दोन दिवसांच्या खूप आठवणी नक्कीच स्मरणात राहतील.
नाशिककडे परतताना श्री. रोहित जाधव यांची सटाणा मध्ये भेट झाली. त्यांनी बागलाण तालुक्यातील सुरु असलेल्या गडसंवर्धन कार्याची मुलांस माहिती दिली. माझ्याबरोबरच सर्वांची घराकडे परतायची ओढ लागली होती. काल सूर्योदय होताना जी वेगळीच चमक सगळ्यांच्या तोंडी दिसत होती त्याउलट आता सूर्यास्त होताना सर्वांचे चेहरे चांगलेच थकले होते.
पुन्हा बागलाणमधील उरले सुरले सर्व किल्ले पाहायला नक्कीच येणार असं मनोमन ठरवून नवीन वर्षाचा पहिल्या दिवशीचा संकल्प केला. वाट पाहतोय तो पूर्णरूप होतोय का याची..!!!
या प्रवासवर्णनात मी मुद्दामहुन किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली नाही. वाचकांनी स्वतः ती माहिती इंटरनेट वरून, पुस्तकातून किंवा संदर्भग्रंथातून गोळा करून वाचावी हीच माफक अपेक्षा. बागलाण तालुक्यातील किल्ले नक्कीच आकर्षक व भेट देण्यासारखे आहेत त्यामुळे आवर्जून या भागातील एखादा तरी किल्ला पाहून या..
सह्याद्रीबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल, दुर्गम भागातील लोकजीवनाबद्दल प्रत्येकात विशिष्ट आदर निर्माण व्हावा यासाठीच हा लेखनप्रपंच..
- जातिवंत भटका
तीन दिवसांपूर्वी नुकतीच साल्हेर व मुल्हेर या किल्ल्यांस भेट देवून परतलो. गडवाट प्रवास सह्याद्रीचा संस्थेतर्फे गेली 5 वर्षे वर्षाखेरची भ्रमंती आयोजित करण्यात येते. आतापर्यंत गेल्या पाच वर्षात तब्बल ७० हुन अधिक गडभ्रमंती मार्फत नव्या तसेच जुन्या पिढीला महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास प्रत्यक्ष स्थळास भेट देवून अनुभवण्याचा प्रयत्न गडवाट संस्था करत आहे. किल्ल्यांवरील भ्रमंतीद्वारे नवनवीन मित्र तर भेटलेच परंतु त्यातून काहीतरी वेगळे करत गडकिल्ल्यांवरील स्मृती जागृत ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा संस्थेने ठरविले. तसेच अनेक सामाजिक व सांस्कृतीक उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला आणि तो जपण्याचा प्रत्येक गडवाट सदस्य प्रयत्न करीत आहे.
यासोबतच 2012 पासून "सह्याद्री स्वच्छता अभियान" "निसर्गसंवर्धन मोहीम" या उपक्रमाद्वारे सह्याद्री व गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा यत्न गडवाट संस्थेने मांडला आहे.
गडवाट संस्थेच्या कार्याचा आलेख फेसबुकवरील पेजमार्फत आपणास पाहायला मिळेलच.
आता प्रवासवर्णनाकडे वळतो...
नोव्हेंबर मध्ये झालेल्या वासोटा मोहिमेनंतर शेवटचे वर्ष सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांच्या सानिध्यात जावे म्हणून दरवर्षीप्रमाणे सदस्यांचे फोन आले आणि नाशिकने कौल दिला. इगतपुरीच्या ईश्वराने हाक ऐकली आणि नियोजनास सुरुवात झाली..
बागलाण परिसर हा माझ्यासाठी नवाचं होता आणि मोहीम ठरली साल्हेर व मुल्हेर या ऐतिहासिक किल्ल्यांची.. नाशिकहुन तब्बल 130 किमी असलेल्या या निसर्गसंपन्न परिसराला मी आजवर फक्त मांगी तुंगी सोडून कोणत्याच किल्ल्यास भेट दिली नव्हती.
दुर्गवीर नितीनला मेसेज करताच त्याने तेथील दुर्गवीर रोहित यांचा संपर्क क्रमांक दिला आणि माझं पुढील नियोजन सोपं झालं. दुर्गवीर रोहित यांचं बागलाण भागातील कार्य खरंच नावाजण्यासारखं आहे. येथील तब्बल 16 किल्ल्यांवर त्यांनी दुर्गसंवर्धनाचा शिवधनुष्य हाती घेतला आहे..
साल्हेर व मुल्हेर किल्ल्यांवरील पाण्याची टाकी त्यात साचलेला गाळ काढून स्वच्छ करण्यात आला आहे त्यामुळे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत संपणारे पाण्याचे स्रोत आता बारा महिने राहणार आहेत. त्यामुळे गडावर येणाऱ्या प्रत्येक ट्रेकर्सना पाण्याचा तुटवडा भासणार नाही.
३१ डिसेंबर २०१६ व १ जानेवारी २०१७ हि मोहिमेची तारीख ठरली. येणाऱ्या प्रत्येकास थेट नाशकास भेटावयास सांगितले त्याप्रमाणे सर्व सदस्य ३० तारखेस रात्री १२ ते १ दरम्यान जमले अन तब्बल ६० गडवाटकऱ्यांची स्वारी साल्हेरकडे निघाली. नाशिक सदस्य उत्तमराव व अमित उर्फ मालक आम्हाला शुभेच्छा देण्यास आले होते. गाडी थोडी पुढे जाते तोच धुळेहुन येणारे सदस्यांचा फोन आला. गाडी बिटकोजवळ थांबवून उरली सुरली सगळी गाडीत बसली आणि नाशिकबाहेरच्या हायवेला गाडी लागली. जत्रा हॉटेल जवळ वैशाली आणि अंश हि मायलेकरं आले. थंडी वाजायला सुरुवात झाली ताशा गाडीच्या काचा बंद झाल्या करकरकर आवाज करता बंद झाल्या. घड्याळात २ वाजले होते. काहीजण झोपी गेली होती तर काहीजण चर्चा करण्यात मग्न होते, तोच ३ वाजता गाडी एका ढाब्यावर चहासाठी थांबली. चहापान उरकायला अर्धा तास गेला. पुन्हा मुलांना गाडीत बसवून गाडी बागलाणच्या मार्गाला लागली.
माझीही झोप लागते न लागते तोवर गाडी थांबली आणि मुलांची कुजबुज सुरु झाली. आबा, रुपेश, विक्रांत सारे महारथी गाढ झोपले होते. ड्रायव्हरला विचारताच रस्ता माहित नाही म्हणाला आणि नाशिकच्या पोरांनी गुगल मॅपवर इकडे चला तिकडे चला बोलायला सुरुवात केली आणि ज्या गोष्टीची चिंता होती तसेच झाले. थोड्यावेळासाठी वाट चुकलो. गाडीबाहेर उतरलो तशी हुडहुडी भरली.. थंडीत काकडत मी ,विक्रांत, bsf, ईश्वर दादा, ज्ञानेश, रविराज बाहेर पडलो. ड्रायव्हरने साल्हेर रस्त्याच्या अलिकडचा फाटा पकडून गाडी वळवली होती. चांदण्याच्या प्रकाशात दुरून साल्हेर सालोटा दिसत होता. जवळच्या गावातील काही लोकांनी बॅटरीचे प्रकाश आमच्या दिशेने फिरवायला सुरुवात केली व काही बायका आम्हाजवळ आल्या आणि अहिराणी शैलीत आम्हाला वाट दाखवली. गाडी वळवली तशी थोड्याच अंतरावर साल्हेरला जाणारा फाटा दिसला. अशी अलियाबाद वाघांबे मागे सारत मजल दरमजल करत आम्ही शेवटी साल्हेरवाडीत पोचलो. वनविभागाच्या प्रशस्त कार्यालयातील हॉलमध्ये सर्वांनी आपल्या बॅगा टाकल्या.
गुलाबी थंडीत असतानाच हळूहळू पूर्वेकडून तांबड फुटायला सुरुवात झाली. काही फोटोग्राफर मित्रांनी कॅमेरे बाहेर काढून सूर्यनारायणाचे फोटो काढण्यास सुरुवात केली तर काहीजण चादर ओढून गाढ झोपी गेले होते.
साल्हेर वनविभागचे वनपाल श्री. गायकवाड यांच्याशी थोडीशी चर्चा केली आणि सकाळची सांगोपंग कामे उरकून घेण्यास मुलांस सांगून साल्हेरवाडीतल्या सुनीलकडे गेलो. सुनील हा गावातील सुशिक्षित तरुण सध्या गावात हॉटेल चालवतो. त्याचबरोबर दुर्गवीर प्रतिष्ठान सोबत तो कार्यरत आहे. मी त्याच्याकडेच सकाळचा नाश्ता आणि जेवणाची सोय करून ठेवली होती. हसतमुख चेहऱ्याने नमस्कार चमत्कार झाले आणि ७:३० ला नाश्ता घेऊन तो वनविभाग कार्यालयात आला.
इकडे सर्वांना एकत्र बसवून ओळखपरेड पार पाडली सर्वांना नियम व अटी सांगून चहा नाश्ता उरकला. सर्व कार्यभाग उरकायला आम्हास ८:३० वाजले. थोडी घाई करत सर्वाना गडवाटेवर घेऊन आलो नि चढाईस सुरुवात केली.
रमत गमत चालता चालता काहींच्या साल्हेर विषयीच्या गप्पा रंगल्या तर काहींनी हा किल्ला अमुक किल्ल्यासारखा दिसतो त्यावरून निष्कर्ष काढायला सुरुवात केली. गडावर जाणारी वाट मळलेली असल्याने कुठेही वाट चुकण्याची शक्यता नाही. पायथ्याला विरशिल्प आहे. तिथून एक वाट साल्हेरवासिनी गडकालिका माता मंदिराकडे जाते तर दुसरी वाट तुम्हाला गडाकडे घेऊन जाते. थोड्या वेळातच चढ लागला आणि कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या.. पायऱ्यालगत असलेल्या बाजूस कातळ भिंतीवर गणपती बाप्पा विराजमान झालेलं पुराणिक शिल्प कोरल होत. जणू कितीक वर्षापूर्वीची साक्ष देणारं शिल्प असेल.
मी आणि आबा सर्वात मागे होतो मधील फळीत ईश्वरदादा, bsf व विलास दादा तर सुरज, विक्रांत व रुपेश लीड करत होते. थांबत थांबत विश्रांती घेत सर्वजण चालत होते. साल्हेरचा कडा जणू अंगावर येतो की काय असा भास येत होता.
कोण मोबाईलने तर कोण कॅमेऱ्याने किल्ल्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे फोटो घेत होते. पाऊण तासात आम्ही गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोचलो. किल्ल्याचा पहिला दरवाजा बऱ्यापैकी शाबूत आहे तर बाजूचे बुरुज शिवपूर्वकाळाचे साक्ष देत उभे आहेत.
दरवाजातून आत आल्यावर पहिला सपाट भाग सुरु होतो. तर उजव्या बाजूस बालेकिल्ल्याचा कडा डोळ्यात भरतो.
डाव्या बाजूस अगदी कडेला एक समाधीवजा अवशेष आहेत.. येथून थोडस पुढे चालत गेल्यास हनुमानाची दगडात कोरलेली मूर्ती दिसते. या संपूर्ण किल्ल्यावर टोपली प्रकारच्या कारवीच्या झाडांचं साम्राज्य पसरले आहे. गेल्या ऑक्टोबर मध्ये इथले चित्र वेगळेच होते. ते मला फेसबुकवर पाहायला मिळाले. कारवीच्या फुलांनी संपूर्ण गड सजला नटला होता.
थोडे अंतर चालत गेल्यावर पुन्हा वरच्या पठारावर जाण्याकरिता चढ लागला व पुन्हा कातळात कोरलेल्या कोरीव पायऱ्या पार करत अजून एक दरवाजा पार करीत आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या पठारावर येऊन पोचलो. या पठारावर काही गुहा आहेत ज्या राहण्यायोग्य आहेत. गुहेसमोर गंगासागर तलाव आहे.
तलावात पाण्याची पातळी मोजण्यासाठी उभारलेला स्तंभ आहे. तलावाच्या बाजूस एक छोटेसे पुरातन मंदिर आहे.
पुरातनकाळी पृथ्वी निक्षत्रीय करण्यासाठी परशुरामाने होमयज्ञ केला होता अशी या किल्ल्यासंदर्भात आख्यायिका आहे. त्या होमाचे काही अवशेष येथे आपणास पाहायला मिळतील.
गुहेच्या वरच्या बाजूने आता आपणास किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजेच परशुराम मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. पायथ्यापासून आम्हाला इथे पोहोचण्यास अडीच तास लागले. यथोचित मंदिरातील परशुरामास नमस्कार चमत्कार करून झाला. मला तर अगदी जिंकल्यासारखं वाटत होत. इथपर्यंत येताना सर्वांचा थकवा संपूर्ण निघून गेला. चहूकडचा निसर्ग आजूबाजूचे किल्ले पाहन्यात जाणून घेण्यात सगळे दंग होते. प्रखर ऊन असताना देखील अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. किल्ल्याचा इतिहास व माहिती मुलांना दिली आणि विक्रांतने गगनभेदी गारद दिल्यानंतर किल्ला उतरण्यास सुरुवात केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या लक्षात राहील त्या गारदेची सुरुवात... महाराजsss..... सर्वांच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला असणार यात मुळीच शंका नाही.
गुहेजवळ पोचताच उजवीकडे वळून सालोटा किल्ल्याकडे जाणारी वाट पकडली आणि कड्याच्या बाजूबाजूने साल्हेरच्या सालोटाकडील दरवाजाकडे आम्ही पोचते झालो.. कड्याच्या पोटात जवळपास 20 ते 20 टाकी खोदली आहेत. त्यातील 2 टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. समोरच सालोटा खुणावत होता व त्यावर जाणारी भेदक वाट डोळ्यात घर करून बसली. पुढच्या वेळेस लवकरच सालोट्याला भेट देण्याचा निर्धार करून आम्ही साधारण 2 वाजता परतीच्या मार्गाला लागलो.
आता सर्वांच्या पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. मलाही चांगलीच भूक लागली होती. गड चढताना झालेली दमछाक आता उतरताना होत नव्हती. दीड तासातच आम्ही पायथ्याजवळील साल्हेरनिवासिनी धारवासिनी गडकालिकामाता देवीच्या मंदिरात पोचलो. साल्हेरच्या रणसंग्रामात धारातीर्थी पडलेल्या आनंदराव मकाजी आणि सूर्याजी काकडे यांच्या समाधीला मुजरा केला. मंदिरामागे संवर्धनात सापडलेले काही तोफेचे गोळे पाहिले. लांबून पुन्हा एकदा साल्हेर डोळ्यात साठवला आणि सुनीलच्या हॉटेलात पोचलो.
यथेच्छ जेवण करून आम्ही 5 वाजता साल्हेरवाडीला राम राम केला आणि मुल्हेरकडे मोर्चा वळवला. शेवटच्या वर्षीचा आमचा मुक्काम उद्धव महाराज यांच्या मठात केला होता. अर्ध्या तासातच आम्ही मुल्हेरला पोचलो. मठासमोरच आमची बस थांबली मठात प्रवेश करताच त्याच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जाणवत होत्या. औरस चौरस जागा असलेला हा मठ अतिशय पाहण्यासारखा आहे. उद्धव महाराजांची समाधी येथे आहे. दर १२ वर्षांनी या समाधीतून भागीरथी उगम पावते हा खरा इतिहास आहे. मठामागे असणाऱ्या यात्रेकरूंच्या खोल्यात आमची राहण्याची सोय उद्धव महाराज यांचे वंशज श्री किशोर महाराज यांनी केली होती. मुलांनी या खोल्यात आपापल्या बॅगा टाकल्या आणि सांगितल्या प्रमाणे समाधी मंदिराच्या बाजूला असलेल्या आवारात सगळेजण एकत्र बसले. मुलांचे अभिप्राय घेऊन आमच्यासोबत आलेले श्री. योगेश नागरे सरांनी आपल्या ओघवत्या वाणीतून व्याख्यानास सुरुवात केली
साल्हेरचा रणसंग्रामाबद्दल बोलताना जणू डोळ्यासमोर इतिहास उभा राहिला होता. सकाळीच साल्हेरची भ्रमंती झाल्यामुळे गतकाळातच जाऊन आल्याचा अनुभव आला. दिवसभर एका शांत व मितभाषी असणाऱ्या श्री. योगेश सरांच्या सानिध्यात असलेल्या नव्या मुलांना त्यांचे करारी व्याख्यान ऐकताना आश्चर्याचा धक्काच बसला. परखड व करारी भाषाशैलीत त्यांनी इतिहासाची ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची बदनामी करणाऱ्यांवर टीका करताना आपण काय करू शकतो याबद्दल विवेचन दिले. तसेच गडाचे जतन व संवर्धन कशाप्रकारे करू शकतो याबद्दल मत व्यक्त केले. वेळेची मर्यादा असल्याने थोडक्यात पण सुंदर अशी माहिती श्री. योगेश सरांनी आम्हाला दिली.
त्यानंतर किशोर महाराजांच्या "देवघर" असे नाव असलेल्या तब्बल 450 वर्षांचा ऐतिहासिक वाडा आम्हाला पाहावयास मिळाला. सुंदर कोरीव लाकडांचे नक्षीकाम असणाऱ्या वाड्यात आमची जेवणाची व नाश्त्याची सोय झाली होती. मुल्हेर सोबतच पंचक्रोशीत हा वाडा प्रसिद्ध आहे. जेवण अगदी रुचकर जेवण असल्याने मुलांनी जेवणावर आडवा हात मारला आणि भरपेट जेवून एकदा मठात आलो नि हळूहळू सगळे झोपी गेलो कारण सर्वाना सकाळी ६ वाजता उठायची तंबी दिली होती.
झोपायला जागा नव्हती म्हणून मी आणि रुपेश मठातल्या आवारात अंथरून टाकून झोपी गेलो अन क्षणार्धात झोप लागली ती पहाटे साडे पाच वाजता जाग येईपर्यंत. सगळ्यांची आवरावर होईपर्यंत 7 वाजले. काल रात्री प्रमाणेच आजही देवघर वाड्यात ऐच्छिक नाश्ता झाला. किशोर महाराजांनी त्यांच पूजाअर्चा करण्याचं पुरातन देवघर आम्हासाठी उघडे केले नि देव्हाऱ्यात असलेल्या प्रत्येक मूर्तीमागील इतिहास त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्या देवघरातील प्राचीन मुर्त्या जवळपास 450 वर्षांपूर्वीच्या आहेत खूप सुंदर व पाहण्यासारख्या आहेत.
7:30 वाजता आम्ही मुल्हेरच्या पायथ्याला निघालो व पायथ्याला पोहोचताच मुलांना सर्व माहिती देऊन गड चढायला सुरुवात केली. एका मागोमाग एक चालणारे असे सर्व गडवाटकरी कालच्या सारखेच ताजेतवाने दिसत होते.
आज आम्ही पश्चिमेकडील बाजूस असल्यामुळे आम्हाला दुपारी ११ वाजेपर्यंत उन्हाचा त्रास जाणवणार नव्हता. मुल्हेरगडाच्या सावलीत आम्ही चालत होतो. अर्ध्या तासातच आम्ही मुल्हेरच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो व पाच मिनिटात दुसरे प्रवेशद्वार पार करत शुद्ध पाण्याचा तलावाच्या ठिकाणी पोचलो. तलावाच्या ठिकाणी पुरातन कोरीव बांधकाम असलेले गणेश मंदिर आहे. या मंदिरामागून रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी व हरगड किल्ल्याकडे जाण्यासाठी मळलेली वाट आहे. गणेश मंदिर पाहून आम्ही वळलो बालेकिल्ल्याकडे नेणाऱ्या वाटेकडे.
किल्ल्यावर जास्तीत जास्त घाणेरीच्या झुडुपांची दाटीवाटी आहे. त्यातून जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यास समोरचं महिषासूरमर्दिनी देवीची दगडात कोरलेली सुंदर मूर्ती नजरेत भरते. या वाटेवरून 3 वाटा फुटतात उजवीकडील वाट सोमेश्वर मंदिराकडे व तेथून मोरा किल्ल्याकडे जाते, दुसरी वाट रामेश्वर मंदिराकडे व तेथून हरगड किल्ल्याकडे जाते, तर तिसरी वाट उजवीकडे थोडे अंतर चालून गेल्यास हत्ती तलाव व मोती टाके या स्थळाकडे जाते. येथूनच तुम्हाला मुल्हेरच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट लागते. या वाटेने चालत गेल्यास अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या मध्ये असलेल्या घळीपर्यंत पोचतो. येथेच तुम्हाला बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो आणि 10 मिनिटात आम्ही गडमाथ्यावर पोचलो. घळीत असलेल्या भिंतींचे बांधकाम थोडेफार शाबूत आहे. किल्ल्यावर जवळपास १० ते १२ पाण्याची टाकी आहेत.
माथ्यावरून हरगड किल्ला, मोरा किल्ला, मांगी तुंगी, साल्हेर, सालोटा, न्हावीगड तसेच सभोवतालचा सुपीक प्रदेश नजरेत भरतो. गडमाथ्यावर 3 तलाव आहेत. प्रवेशद्वारासमोर असलेल्या पाण्याच्या एका टाकीत एक गाय मरून पडली होती. पाण्याच्या शोधात गडावर आलेली ती गाय अंदाज न आल्याने झुकता क्षणीच पडली असावी. आजही काही लोकांस पाण्याचे महत्व अजून समजले नसावे पण लवकरच अनुभव येईल यात शंका नाही. असो...
बालेकिल्ल्यावर खूप अवशेष आहेत. त्यात भडंगनाथ मंदिराच्या एका कातळ दगडावर एक शिलालेख कोरलेला आहे. भडंगनाथांचे छोटेसे मंदिर औंदुंबर झाडाच्या कुशीत विसावले आहे. इथेच आम्ही सर्वांनी पथारी पसरली. आणलेली शिदोरी उघडून पोटोबा केला. डॉ. भोजराज, विक्रांत आणि अनुराधा यांनी मोठ्या आवाजात आज्ञापत्र वाचन केले. ईश्वरदादा यांनी आभारप्रदर्शन, bsf ने मुल्हेरबद्दल माहिती आणि आबासाहेबाने गडवाटबद्दल माहिती दिली. विक्रांतच्या पहाडी आवाजाने पुन्हा एकदा गारद देऊन महाराजांस मानवंदना दिली. सर्वांचे मुजरे झडले... "जय जिजाऊ जय शिवराय हर हर महादेव" चा आवाज दाही दिशेत दुमदुमला..
एका तासाच्या चर्चेनंतर १२:३० वाजता आम्ही बालेकिल्ला उतरून किल्ल्यावरील सोमेश्वर मंदिराकडे मोर्चा वळवला. मंदिराकडे जाणाऱ्या वाटा अनेक ठिकाणी ढोरवाटांमुळे फुटल्यामुळे थोडीफार तारांबळ उडाली. मातीत बुजून जायच्या तयारीत असलेली बांधीव अशी सुंदर चंदन विहीर आम्ही पाहिली आणि सोमेश्वर मंदिरात पोचलो. हजारो वर्षांच्या राजवटीचा इतिहास सांगत उभे असलेले हे देखणे शिवमंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्याखाली महादेव विराजमान झाले आहेत. खोलवर कातळात खोदून छोट्याशा अरुंद अंधाऱ्या वाटेने खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. आतमध्ये १५ ते २० जण शिवलिंगाभोवती बसू शकतील अशी जागा आहे. एकेक करून आम्ही सर्वांनी दर्शन घेतले. मंदिरासमोर असलेला मोरा किल्ल्याचा दरवाजा मला खुणावत होता. आम्हाला इथे २ वाजले होते भूकसुद्धा लागली होती. पण कोणासही सांगायची गरज लागली नाही हळूहळू आम्ही सगळेजण परतीच्या वाटेला लागलो. गडावर अनेक ठिकाणी घरांच्या जोत्यांचे अवशेष राहिले आहेत जे घाणेरीच्या झुडुपात लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. येथील दुर्गवीर व बागलाण प्रतिष्ठाण अशा संस्थांची गडसंवर्धनाकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे या किल्ल्याचं थोडंफार का होईना पण वैभव टिकून राहील. मयूरध्वज राजाची नगरी किती सुसंपन्न असावी याची अनुभूती पावलोपावली येते.
कालच्या आणि आजच्या मोहिमेतील साऱ्या आठवणी डोळ्यात आणि मनात साठवत किशोर महाराजांच्या वाड्यात आलो. जेवण कालसारखच चवदार व चविष्ट होतं. महाराजांनी पुन्हा एकदा काही मुलांना किल्ल्याबद्दल व वाड्याच्या बांधणी संदर्भात माहिती दिली.
आता २ दिवसीय मोहीम संपन्न झाली होती. अनेकांच्या झोळीत या दोन दिवसांच्या खूप आठवणी नक्कीच स्मरणात राहतील.
नाशिककडे परतताना श्री. रोहित जाधव यांची सटाणा मध्ये भेट झाली. त्यांनी बागलाण तालुक्यातील सुरु असलेल्या गडसंवर्धन कार्याची मुलांस माहिती दिली. माझ्याबरोबरच सर्वांची घराकडे परतायची ओढ लागली होती. काल सूर्योदय होताना जी वेगळीच चमक सगळ्यांच्या तोंडी दिसत होती त्याउलट आता सूर्यास्त होताना सर्वांचे चेहरे चांगलेच थकले होते.
पुन्हा बागलाणमधील उरले सुरले सर्व किल्ले पाहायला नक्कीच येणार असं मनोमन ठरवून नवीन वर्षाचा पहिल्या दिवशीचा संकल्प केला. वाट पाहतोय तो पूर्णरूप होतोय का याची..!!!
या प्रवासवर्णनात मी मुद्दामहुन किल्ल्याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली नाही. वाचकांनी स्वतः ती माहिती इंटरनेट वरून, पुस्तकातून किंवा संदर्भग्रंथातून गोळा करून वाचावी हीच माफक अपेक्षा. बागलाण तालुक्यातील किल्ले नक्कीच आकर्षक व भेट देण्यासारखे आहेत त्यामुळे आवर्जून या भागातील एखादा तरी किल्ला पाहून या..
सह्याद्रीबद्दल, गडकिल्ल्यांबद्दल, दुर्गम भागातील लोकजीवनाबद्दल प्रत्येकात विशिष्ट आदर निर्माण व्हावा यासाठीच हा लेखनप्रपंच..
- जातिवंत भटका
खुपच सुंदर वर्णन केले आहे
ReplyDeleteपायथ्याच्या गावातला कुणाचा संपर्क क्रमांक लिहिला असता तर आमच्या सारख्या प्रथमच जाणाऱ्यांची सोय योग्य झाली असती