Skip to main content

रंग दक्षिण दौलतीचे, रुबाब नव्या भटकंतीचे...

सुट्टीवर आल्यावर किरकोळ भटकंती चालूच होती. काहीतरी मोठा प्लॅन माझ्या डोक्यात चालूच होता. दरवर्षी एक राज्य फिरायचं असा प्लॅन सध्या माझा ठरला आहे. मग यावेळी राजस्थान आणि चेन्नई हे दोन प्लॅन डोक्यात होते. त्यात आमच्या साधे-सुधे ट्रेकर्स ग्रुप ने आधीच जिंजी चा प्लॅन ठरवला होता.मग त्यांच्याबरोबर जायचं पक्कं झालं आणि तयारीला सुरवात झाली. खरेदी-आवश्यक रूट, खर्च आणि कोणकोण येणार याबद्दल चर्चेला उधाण आलं. व्हाटसअँप्स ला ग्रुप होऊ लागले. रोज नवे-नवे आराखडे तयार होऊ लागले. दुचाकी वरून भ्रमंती म्हटल्यावर बाईक ची सर्व्हिसिंग, छोटा-मोठं काम करून घेतलं, विमानाच्या तिकिटाचे बुकिंग वगैरे होऊन ९ जाने २०१७ ला बाईक ट्रान्सपोर्ट ला दिली आणि मग उत्सुकता लागली ती १४ जानेवारीच्या रात्रीची.
शेवटी उत्सुकता संपली आणि दिवस उजाडला. नवी-मुंबई हुन मी अन सूरज सकपाळ होतो, ओला करून आम्ही विमानतळावर पोहोचलो. त्यात नवीन आणि पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणारे सगळेच म्हणजे मी आणि विलासदादा सोडून. तर सगळा विमानतळावरील लगेज-सेल्फीचाळे सर्वांचे आटपल्यावर आमचं चेन्नई एक्सप्रेस च विमान ९.४० ला उडालं आणि आमची भ्रमंती हवाई मार्गाने सुरु झाली. मुंबई ते चेन्नई दीड तासाच्या प्रवासात एवढा गडबड-गोंधळ होता कि बस्स ते सगळं गुदस्त्यात राहिलेलं बर.
शेवटी चेन्नई विमानतळावरून बाहेर येऊन आमच्या बॅगा घेऊन आधीच पोहोचलेल्या बाईकचा ताबा घेतला आणि त्या रात्री सुशांत गुंड भाऊंच्या मदतीने झालेल्या राहायच्या ठिकाणी मुक्कामी गेलो. जेवण-खान करून पडी मारली याच स्वप्नात कि उद्याचा दिवस आयुष्यातील एकमेव दिवस व्हावा.


सकाळी उठल्याच्या नंतर आपले सगळे विधी-चहा आटपून सर्व गाड्या जिंजी च्या दिशेने रवाना झाल्या. रयतेचं राज्य-स्वराज्य महाराष्ट्रभर डौलानं नांदल्यावर आत्ता मराठ्यांच्या राजाला त्याच्या सीमा उत्तुंग करायच्या होत्या. थोरले महाराज छत्रपती झाल्यावर १९७६-७८ सालात दक्षिण मोहीम हाती घेतली. आणि मराठ्यांचे वारू तुंगभद्रा ओलांडून नव्या आव्हानांसाठी दक्षिणेत उतरले. मोठा प्रदेश घोड्यांच्या टापांखाली आला आणि मराठ्यांचा भगवा दक्षिण भारतात डौलानं फडकू लागला.

 जिंजी ची निर्मिती नक्की सांगता येणार नाही पण चौल राजाच्या काळात ९व्या शतकात इथे छोटा कोट होता. कुरुंभर नावाच्या राजाने त्याच बांधकाम १३ व्या शतकात केलं. नंतर १४-१५ व्या शतकात  विजयनगरच्या समृद्ध राजवटी मध्ये या कोटाला किल्ल्याचे स्वरूप आले आणि तिथे नायक नावाचा राजा राज्य करत होता. विजयनगरच्या ऱ्हासानंतर इथे स्वतंत्र राज्य मोगलांच्या आधिपत्याखाली कार्यान्वित होती. १९७७ मध्ये शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पुढे तो जवळजवळ येऊन जाऊन १६९८ पर्यंत मराठ्यांकडे राहिला. तिथे छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्य केले आणि या किल्ल्याला राजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत महाराष्ट्र्र झुंजत ठेवण्याचं महान कार्य जिंजीच्या बुरुजांनी लीलया पेलेल. पुढे इंग्रजांच्या हाती जाण्याच्या आधी फ्रेंच, कर्नाटकी नवाब, हैदर अली यांच्या ताब्यात थोड्या थोड्या काळासाठी राहिला. १८ व्य शतकात इथे राजा Desinghu राज्य करत असल्याची माहिती मिळते.


जिंजी ला आम्ही सकाळी नऊ-साडे नऊ वाजता पोहोचलो. गाड्या पार्क करून जवळच्या ज्यूस वाल्याकडे सामानाच्या बॅगा ठेऊन मोजकं सामान-पाण्याच्या बाटल्या आणि कॅमेरे घेऊन  जिंजीच्या प्रवेश दारात पोहोचलो. खार तर जिंजी हा ५ ते सहा किल्ल्यांचा आणि टेकड्यांचा समूह आहे. एकाच तटबंदीत असलेल्या एकापेक्षा जास्त किल्ल्यांची रचना आणि भोवतालची तटबंदी आणि त्याची प्रवेश दार हे बांधकामाचं एक अतुलनीय उदाहरण आहे. जिंजीच्या पहिल्या गेट मध्ये भारतीय पुरातत्व खात्याचे प्रवेश द्वार आहे. तिथे १५ रु मूल्य देऊन आत प्रवेश होतो. सगळेच एकत्र आलेले पाहून आबासाहेब यांनी सगळ्यांची तिकीट काढली आणि पुढील किल्ला पाहण्याच्या सूचना दिल्या. किल्ल्यावर काय काय पाहण्यासारखं आहे याच वेळो-वेळी मार्गदर्शन अमर साळुंखे आणि अनिकेत वाघ या मित्रांनी केले होते. आबासाहेब या दोघांच्या संपर्कात घडीघडीला होते. त्यात अनिकेत तर दुबई मधून कॉल वर होता. आत्ता किल्ल्यात प्रवेश केल्यावर साहजिकच दोन गट झाले. एक म्हणजे फोटो काढणाऱ्यांचा गट आणि दुसरा किल्ला फिरणाऱ्यांचा गट. आम्ही ज्या गटात होतो त्यामध्ये सुधीर, आबासाहेब, सुरज, उर्जित, जितू, विलास दादा आणि सुबोध असे होतो. किल्ला पाहत आणि फोटो काढत आम्ही किल्ल्याच्या अनेक अंगांचा नव्याने विचार करत होतो. महाराष्ट्रातील किल्ले खूप वेगळ्या शैलीचे आहेत ते पाहण्याची सवय झाल्यामुळे असं बांधकाम आणि एवढी ऐसपैस पाहून थोडं भांबावून गेलो. किल्ल्यावर खूप अद्यावत सुविधा त्याकाळात होत्या याची प्रचिती पावला-पावला वर येत होती. जिंजी मधील पहिल्या ' king fort ' किंवा ' राजा कोट ' किंवा ' राजगिरी ' या स्वतः राजाच निवास असलेल्या किल्ल्यावर दरवाजातून आत शिरताच भगवान विष्णू आणि इतर देवांची शिल्प आहेत. थोडं पुढं आलं कि उजव्या हाताला कल्याण महल आहे जो विजयनगरच्या राजवटीमध्ये बांधला गेलाय. डाव्या हाताला एक मोठा तलाव आहे. तलावाच्या भोवती छोट्या छोट्या खोल्या वजा सलग बांधकाम आहे. तलावात उतरण्यासाठी अगदी खालपर्यंत पायऱ्या आहेत. तिथे अजून काही इमारती आणि छोटी मंदिर आहेत. या दोन वस्तूंच्या मधून एक रस्ता जातो तो पुढे एका भव्य मैदानात संपतो. मैदान खप सुंदर आहे. त्यात पुरातत्व खात्याने हिरवाई आणि सुंदर बगीचा केला आहे. मध्ये वडाची मोठी झाड आहेत. ती झाड सोडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला भव्य दालन आहे. नक्की ते काय आहे हे कळत नाही. त्याची रचना पहिली तर तिथे एखादी राजकारभाराची इमारत असावी असं वाटत. आणि डाव्याबाजूला धान्यकोठार आहे. विशेष म्हणजे धान्य कोठाराला वातानुकूलित करण्यासाठी विशिष्ठ रचना त्या कोठाराच्या छपरावर केलेली दिसते. आत्ता तीच नूतनीकरण थोडं केले आहे. धान्यकोठाराच्या थोडं मुख्य रस्ता सोडून अजून थोडं डाव्या बाजूला गेलं कि प्राचीन शंकराची मंदिर आहेत. त्याच बाजूने मग रस्ता धरून वर आलं कि उजव्या अंगाला राजगिरी च्या पायऱ्या चालू होतात. आणि मुख्य कोटला सुरवात होते.


मुख्य कोटाला सुरवात एका दरवाज्याने होते. दरवाजा महाराष्ट्रातील प्रवेशांसारखाच आहे पण थोडा छोटा आहे. प्रवेशद्वाराजवळ देवड्या आणि चौकीदारांसाठी पहारे आहेत. उजवीकडे वळत पायऱ्या चालू होतात त्या सरळ बालेकिल्यावर घेऊन जातात. अर्धा एक तास चालल्यावर सपाट जागा लागते तिथे शंकराचं मंदिर आहे आणि डाव्या बाजूला एक पडकी ' चंदन ' विहीर आहे. खूप भल्या मोठ्या दगडी आणि त्यावर ठावरणारी तटबंदी हे एक विचित्र पण देखणे चित्र आहे. इतक्या तोटक्या जागेवर सुबक बांधणी करणारे हात म्हणजे प्रत्यक्षात मयसभा बांधणाऱ्याचे असावे. वाटेवर माकड तुम्हाला त्रास द्यायला असतातच. वाटेत चढ-उतार करत आणि 2-4 दरवाजे पार करत बालेकिल्ल्यावर जाणारा चढ लागतो. हा पूर्ण बांधीव पायऱ्यांचा असून उत्तम स्थिती मध्ये आहे. या चढाच्या सुरवातीला आमचा पडावं पडला. दक्षिण च्या उन्हाने पार रया केली होतीच त्यात पाणी संपलं म्हणून बाकीचे गडबड करत होते. काहीजण तर तिथेच पांगले. पाच-सहा स्थानिक मुलं आली तेंव्हा त्यांच्या जवळच पाणी पिऊन तिथंच 20 मिनट विश्रांती घेतली. नंतर त्या मुलांना माझ्या सहकाऱ्यांनी खालून पाणी आणून दिलं. सगळी गडबड संपली आणि मग पुन्हा दुर्ग दर्शनाला चाल केली. पायऱ्यांचा चढ चढून एका छोट्या पुलावरून वाट डाव्याबाजूला वाकडी होत बालेकिल्यात येते. आता बालेकिल्ल्यावर अनेक वास्तू आहेत. कोठार वजा इमारती, वॉच टॉवर, छोट्या छोट्या राहुट्या, एक सुंदर मंदिर आणि मंदिरापासून उजव्या बाजूला खाली थोडं सैनिकी ठिकाण आहे. तिथे एक जुनी तोफ आहे. त्याठिकाणी सर्वांनी मिळून चर्चा केली. माहिती सांगितली, ग्रुप फोटो वगेरे काढून आम्ही एका मोठ्या इमारतीच्या वरती आलो. तिथे शिवरायांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. आधीच भूक लागली होती आणि त्यात सगळं वेळेत झाल्याने समोर दिसणारा कृष्णगिरी खुणावत होता. मग एक रफ्तार पकडून सगळे तासाभरात खाली आलो. पायथ्याच्या ज्यूस वाल्याकडे ज्यूस आणि थोडं खाऊन आम्ही म्हणजे मी आणि सचिन काकडे कृष्णगिरीच्या पायथ्याला गेलो. तिथे खरतर आम्ही चौकशी करायला गेलो होतो. मग समजलं की सायं ५ पर्यँत वरती जाण्याचे पास देतात मग लगोलग फोन फिरवून सर्वांना बोलवून घेतलं आणि कृष्णगिरी सायं ४ ला चढायला सुरुवात केली. किल्ला छोटा आहे. चढण ३० मिनिटांची आहे. संपुर्ण पायऱ्या असल्यामुळे ३० चे ४०-५० होतात. वरती किल्यावर सुंदर मंदिरे आहेत. दरबाराचे अवशेष आहेत. घुमटी वास्तू आणि चौक्या आहेत. वर गेल्यावर पूर्ण किल्याची तटबंदी आणि मध्ये मध्ये असणारे बुरुज दिसतात. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने स्वच्छता आणि व्यवस्था चांगली आहे. बांधकाम खुपच सुंदर आणि आखीव आहे. वरती पाण्याची व्यवस्था आणि इमारती छोट्या जागेत नीटनेटक्या आहेत. असा हा किल्ला पाहायला तासभर पुरेसा आहे. फोटो वगैरे काढून आम्ही लगोलग खाली उतरलो. आम्ही खाली उतरलो तेंव्हा जवळ जवळ ६:३० ते ६:४५ सायं चे झाले होते आणि दिवस हि होता अजून म्हणून सर्वांच्या संगनमताने आम्ही समोर दिसणारा छोटा भुईकोट करायचं ठरवलं आणि गाड्या त्या दिशेने फिरवल्या. भुईकोट तसा थोडा उंचावर आहे. मुख्य तटबंदी वरून चालत त्यावर जाता येते. त्याआधी त्या भुईकोटाच्या दगडात म्हणजे किल्ल्याच्या पोटात एक शिवमंदिर आहे. खूप सुंदर आणि प्राचीन आहे. ते पाहून आम्ही भुईकोट पाहून घेतला. त्या भुईकोटावर चौकी पाहऱ्याच्या पडक्या इमारती, एक मंदिर आणि भग्नावशेष आहेत. असा आमचा पहिल्या दिवसाचा जिंजी मधील राजगिरी, कृष्णगिरी आणि भुईकोट अशी भटकंती आटपली आणि आम्ही शहराकडे येऊन एका हॉटेल वर रात्र काढायची व्यवस्था केली. जेवण अर्थातच जिंजी ची स्पेशल बिर्याणी होती. पोटभर जेवून, दिवसाच्या भटकंती च्या गप्पा हाणून आणि उद्याच नियोजन करून सर्व पहिल्या दिवसाला सलाम करून गाढ झोपी गेले. 
( पहिला दिवस समाप्त..) 

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...