घाटवाटांची चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण.
दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्यक्रमादरम्याची. मला काही फारसा वेळ मिळत नाही म्हणजे वर्षातील ८-९ महिने मी देशापासून पोटापाण्यासाठी लांबच असतो. पण जेंव्हा सुट्टीत वेळ मिळतो तेंव्हा सह्याद्रीच्या कडे कपारीत पाय चालतात ते आपसूक...!
दिपक चा कॉल शुक्रवारी आला आणि पाचटाकी, ठाकरवाडी आणि फल्याण गाव असा काहीसा प्लॅन त्याने सांगितला. मी लगेच inn म्हणून सांगितलं. आणि रविवारी सकाळी तुला घ्यायला येतो असं सांगून फोन ठेऊन दिला. रविवारी ठरल्याप्रमाणे सकाळी ५:३० ला गाडीची लगाम खेचून श्री गणेश केला आणि अंधेरी ला दीपक ला पिकअप करून सरळ पनवेल गाठलं. सकाळी घरातून एक केळं आणि एक कप दूध असा आहार घेऊन गेलेल्या माझ्या भल्या शरीराला पनवेल ला जाई पर्यंत भुकेने व्याकुळ केलं. अजून विश्राम यायचं होता म्हणून मग आम्ही भटक्यांचे श्रद्धास्थान आणि पनवेल मधील हॉटेल विसावा ला मिसळ चहा असा पोटभर आहार केला. विश्राम येताच लागलीच चहा टाकून आम्ही लोणावळा ला जुन्या महामार्गाने गाड्या पळवल्या. उन्हाच्या आधी सुरवातीच्या गावी पोहोचावं असा कायास बांधून न थांबता आम्ही ड्यूक नोज च्या वरच्या पायथ्याच्या गावी चावणी ला पोहोचलो. तिथे लोकल ओळखीच्या माणसांशी बोलून मग आम्ही वाटेला लागलो. आधी आमचा प्लॅन होता ठाकरवाडी वगैरे करून पाचटाकी वरून खाली पाली भागात फल्याण गावात उतरायचं मग तिकडून पुन्हा वरती चढून यायचं. त्याप्रमाणे आम्ही वाट धरली आणि ड्यूक नोज ला उजव्या हाताला ठेऊन पहिलं गाडी वाटेने आणि मग गॅस पाईप च्या वाटेवरून २-३ घरांची वस्ती असलेल्या आंबेनाळ च्या पायथ्याला आलो. हा महिना म्हणजे ऑक्टोबर चा उन्ह आणि दमट हवा त्यात गवत उंच वाढून वाटा बुजलेल्या. ढोरांनी गवत आडवं करून केलेल्या वाटा म्हणजे भरोश्याच्या नाहीत म्हणून शेवटी वाट निश्चित करण्यासाठी त्याच ववस्तीवरील घरात चौकशी केली. त्यांनी सांगितलेल्या वाटा घेऊन आम्ही चालू लागलो. मध्ये मध्ये दिपक गुगल मॅप वर वाटेचा वेध घेत होता. वस्तीवरील लोकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही ठरविलेल्या वाटेवर झाड उन्मळून पडल्यामुळे ती वाट अवघड झाली होती शिवाय त्या वाटेला रहदारी नव्हती. शोधत शोधत शेवटी आम्ही एका सपाट पठारावर आलो. पठारावर आल्यावर आम्हाला वाटांचा आणि ठिकाणांचा उलगडा झाला आणि त्या गडबडीत आम्ही प्लॅन B च्या वाटेवर आलो म्हणजे ' सावर दांड ' घाट वाटेवर. मग उन्हाच्या तापाने गरम झाल्याने पाण्याच्या बाटल्या रिचवल्या आणि शेवटी त्याच वाटेला धरली आणि सावरदांड ने उतरून कुरवंडा घाटाने वर यायचं असा प्लॅन B चाललो. शेवटी निसरडत्या वाटेने खाली उंबरखिंडीचे स्मारक असलेल्या नदी पाशी आलो डबे उघडले आणि पुन्हा कुरवंडा घाटाच्या वाटेने वर चावणी गावात आलो.
हा प्रवास खूप रोमहर्षक आणि थकायला लावणारा होता. खाली नदी पासून ते कुरवंडा घाट संपतो त्या ठिकाणापर्यंत पाणी नसल्यानं पाणी वाचवून चालाव लागलं आणि त्यात उन्हाने चांगलीच उघडीक केली होती त्यामुळे जास्तच दमछाक झाली. अश्या या आताच्या ऑक्टोबर महिन्याच्या भटकंती मध्ये त्रास खूप होतो. पाऊस नुकताच गेलेला असतो आणि उन्हाने कहर करायला सुरवात केलेली असते. हिरव्या गवतावर ऊन पडलं कि एक घुसमट होणार वातावरण तयार होत आणि घसा सुकत जातो. डिहायड्रेशन चा सगळ्यात जास्त त्रास याच महिन्यात होतो. पाणी आणि पोषक खाद्यपदार्थ मुबलक जवळ ठेवणे हाच एक यावरील मार्ग आहे.
ब्लॉग शब्दां शब्द लिहला नाही कारण छायाचित्रांच्या खाली त्यांचं वर्णन आणि वाटेच्या खुणा देणार आहे.
धन्यवाद.
१. चावणी गावातून नागफणी सुळका डाव्याबाजूला सोडून गाडी वाटेने पुढे आलं कि डाव्याबाजूला खाली दिसणारे गाव, नदी. इथे खुणा म्हणून गॅस पाईप लाईन चे पोस्ट आहेत. शिवाय उजव्या हाताला सरकारी मालमत्तेचं तारेचं कुंपण घातलेलं आहे.
२. त्याच ठिकाणावरून मागे दिसणारा फणा काढून उभा असलेला नागफणी सुळक्याचा टोक.
३. पुढे थोडं खाली उतरून डोंगर डाव्या हाताला ठेऊन मळलेल्या वाटेने सरळ चालत आलं कि आंबेनाळ दिसते.
४. डाव्या कोपऱ्यात दिसते ती वाट आणि समोर दिसणारी आंबेनाळ.
५. आंबेनळी च्या वाटेला असलेली २-४ घरांची वस्ती. यांनीच पुढच्या वाटेची कल्पना आणि अपडेट दिल्या.
६. वस्तीवरील घरात आजी सोबत माहिती घेताना आमचा वाटाड्या दिपक आणि त्याच्या मागे विश्राम
७. वस्तीवरून खाली उजव्या हाताने चालत आलं कि अशी गर्द झाडी लागते आणि मळलेली पायवाट.
८. पुढे सपाटीवर आलं कि समोर दिसणारा टॉवर
९. पुढे सपाटी वर आल्यावर उजव्या बाजूने खाली उच्च दाबाच्या विजेच्या टॉवर खालून चालत राहील कि मध्ये पाण्याचं मोठं डबकं लागत. याच्या उजव्या बाजूने टॉवर च्या दिशेने जावं. इथे ढोरवाटा असल्याने चुकण्याची शक्यता आहे. टॉवर हेच दिशादर्शक आम्हाला कामी आलं.
१०.टॉवर खालून चालत आलं कि मध्ये वाडा लागतो. इथून टॉवर क्रॉस करून उजव्या वाटेवर ओढा लागतो त्या दिशेने चालत राहावं. ओढा ओलांडला कि मळक्या वाटेने करावी च्या जंगलातून वाट उतरत राहायचं. हा ओढा पाण्याचा शेवटचा पर्याय आहे पुढे खाली नदी आली कि पाणी. पण ओढा बारमाही नाही.
शेवटी खाली उतरून नदी पर्यंत आलं कि हातपाय-तोंडावर पाणी मारून घ्यावं आणि मग नदीला पाठीवर ठेऊन पुन्हा चढायला सुरवात करायची. गॅस ची पाईप लाईन धरूनच कुरवंडा घाट चढवा लागतो.
११. कुरवंडा घाट चढताना थोडी सपाटी लागते तेंव्हा तुम्हाला वरती नागफणी चे दर्शन होईल. ते आपलं शेवट च ठिकाण आहे.
१२. सपाटी वरून दिसणारा सह्याद्री भार. हा डोंगर अजून चढायचा आहे.
१३. कुरवंडा घाट चढून येण्यासाठी गॅस पाईप लाईन उत्तम दिशादर्शक आहे. मागे डाव्याबाजूला त्याचे पाईप लाईन चे पोस्ट दिसतात.
१४. ट्रेक पूर्ण झाल्याच्या आनंदात आमच त्रिकुट.
कोणत्याही ट्रेक दरम्यान आणि शक्यतो घाटवाटा करताना आपल्याला शक्य वाटत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढावे. पायवाट, त्यांच्यावरील खूणा, झाड, दगड इ दिशादर्शक खुणा म्हणून कामी येतात. माझ्या कडे बॅटरी बॅकअप नसल्याने मी जास्त फोटो काढू शकलो नाही. पण महत्वाचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्या आठवणी राहतात आणि नंतर कोणी जाणार असेल तर त्याच्यासाठी त्या उपयुक्त ठरतात.
ऐतिहासिक कुरवंडा घाट आणि उंबरखिडीचा इतिहास ब्लॉग वर लिहलेला आहे.
- जातिवंत भटके.
भारी
ReplyDeleteमस्त ❤️
ReplyDelete👌👌👌😍❤ भटकंती
ReplyDelete