Skip to main content

ऐतिहासिक कुरवंडा घाटाची चढाई

 घाटवाटांची  चढाई उतराई हा एक सह्याद्रीच्या ऍडव्हेंचर मधील खास प्रकार आहे. घाटवाटांवर आपल्याला किल्यांसारखे अवशेष, प्राचीन स्मारक वगैरे पाहायला मिळतीलच असं नाही. त्यामुळे बरेच ट्रेकर्स आणि भटके अश्या वाटांवर यायला थोडं नाक मुरडतात. घाट वाट चालताना तुमच्याकडे ठरलेला उद्देश पूर्ण होईल याची खात्री नसते. शिवाय गड किल्ल्यांच्या भटकंती सारखं आपलं शेवटचं ठिकाण हे दिसत नाही, उदा. गड कितीही अवघड असला तरी आपल्याला कुठे जायचं आहे म्हणजे किल्ल्याचं टोक आपलं टार्गेट हे व्हिसिबल असत. यावरून आपल्याला आपली दिशा ठरवता येते. सह्याद्रीच्या कठीण वाटांवर अपवाद किल्ले आहेत ज्यावर आपण चुकू शकतो. घाट वाटंच तसं नसत. आपल्याला चालताना एकतर गाईड हवा जो वाटा ओळखू शकेल, स्थानिक वाटाडया, आधी त्या घाटवाटा फिरलेले ट्रेकर्स आणि त्यांनी लिहलेले साहित्य, ब्लॉग इ गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. दिशांचं आणि डोंगररांगेचं प्राथमिक ज्ञान आपल्याला हवं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत असण. 

दिपक चव्हाण आणि विश्राम लोहार या अवलिया जोडगोळीची जुनीच ओळख गडवाट संस्थेच्या ट्रेक आणि कार्यक्रमादरम्याची. मला काही फारसा वेळ मिळत नाही म्हणजे वर्षातील ८-९ महिने मी देशापासून पोटापाण्यासाठी लांबच असतो. पण जेंव्हा सुट्टीत वेळ मिळतो तेंव्हा सह्याद्रीच्या कडे कपारीत पाय चालतात ते आपसूक...! 

दिपक चा कॉल शुक्रवारी आला आणि पाचटाकी, ठाकरवाडी आणि फल्याण गाव असा काहीसा प्लॅन त्याने सांगितला. मी लगेच inn म्हणून सांगितलं. आणि रविवारी सकाळी तुला घ्यायला येतो असं सांगून फोन ठेऊन दिला. रविवारी ठरल्याप्रमाणे सकाळी ५:३० ला गाडीची लगाम खेचून श्री गणेश केला आणि अंधेरी ला दीपक ला पिकअप करून सरळ पनवेल गाठलं. सकाळी घरातून एक केळं आणि एक कप दूध असा आहार घेऊन गेलेल्या माझ्या भल्या शरीराला पनवेल ला जाई पर्यंत भुकेने व्याकुळ केलं. अजून विश्राम यायचं होता म्हणून मग आम्ही भटक्यांचे श्रद्धास्थान आणि पनवेल मधील हॉटेल विसावा ला मिसळ चहा असा पोटभर आहार केला. विश्राम येताच लागलीच चहा टाकून आम्ही लोणावळा ला जुन्या महामार्गाने गाड्या पळवल्या. उन्हाच्या आधी सुरवातीच्या गावी पोहोचावं असा कायास बांधून न थांबता आम्ही ड्यूक नोज च्या वरच्या पायथ्याच्या गावी चावणी ला पोहोचलो.  तिथे लोकल ओळखीच्या माणसांशी बोलून मग आम्ही वाटेला लागलो. आधी आमचा प्लॅन होता ठाकरवाडी वगैरे करून पाचटाकी वरून खाली पाली भागात फल्याण गावात उतरायचं मग तिकडून पुन्हा वरती चढून यायचं. त्याप्रमाणे आम्ही वाट धरली आणि ड्यूक नोज ला उजव्या हाताला ठेऊन पहिलं गाडी वाटेने आणि मग गॅस पाईप च्या वाटेवरून २-३ घरांची वस्ती असलेल्या आंबेनाळ च्या पायथ्याला आलो. हा महिना म्हणजे ऑक्टोबर चा उन्ह आणि दमट हवा त्यात गवत उंच वाढून वाटा बुजलेल्या. ढोरांनी गवत आडवं करून केलेल्या वाटा म्हणजे भरोश्याच्या नाहीत म्हणून शेवटी वाट निश्चित करण्यासाठी त्याच ववस्तीवरील घरात चौकशी केली. त्यांनी सांगितलेल्या वाटा घेऊन आम्ही चालू लागलो. मध्ये मध्ये दिपक गुगल मॅप वर वाटेचा वेध घेत होता. वस्तीवरील लोकांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही ठरविलेल्या वाटेवर झाड उन्मळून पडल्यामुळे ती वाट अवघड झाली होती शिवाय त्या वाटेला रहदारी नव्हती. शोधत शोधत शेवटी आम्ही एका सपाट पठारावर आलो. पठारावर आल्यावर आम्हाला वाटांचा आणि ठिकाणांचा उलगडा झाला आणि त्या गडबडीत आम्ही प्लॅन B च्या वाटेवर आलो म्हणजे ' सावर दांड ' घाट वाटेवर. मग उन्हाच्या तापाने गरम झाल्याने पाण्याच्या बाटल्या रिचवल्या आणि शेवटी त्याच वाटेला धरली आणि सावरदांड ने उतरून कुरवंडा घाटाने वर यायचं असा प्लॅन B चाललो. शेवटी निसरडत्या वाटेने खाली उंबरखिंडीचे स्मारक असलेल्या नदी पाशी आलो डबे उघडले आणि पुन्हा कुरवंडा घाटाच्या वाटेने वर चावणी गावात आलो. 

हा प्रवास खूप रोमहर्षक आणि थकायला लावणारा होता. खाली नदी पासून ते कुरवंडा घाट संपतो त्या ठिकाणापर्यंत पाणी नसल्यानं पाणी वाचवून चालाव लागलं आणि त्यात उन्हाने चांगलीच उघडीक केली होती त्यामुळे जास्तच दमछाक झाली. अश्या या आताच्या ऑक्टोबर महिन्याच्या भटकंती मध्ये त्रास खूप होतो. पाऊस नुकताच गेलेला असतो आणि उन्हाने कहर करायला सुरवात केलेली असते. हिरव्या गवतावर ऊन पडलं कि एक घुसमट होणार वातावरण तयार होत आणि घसा सुकत जातो. डिहायड्रेशन चा सगळ्यात जास्त त्रास याच महिन्यात होतो. पाणी आणि पोषक खाद्यपदार्थ मुबलक जवळ ठेवणे हाच एक यावरील मार्ग आहे. 

ब्लॉग शब्दां शब्द लिहला नाही कारण छायाचित्रांच्या खाली त्यांचं वर्णन आणि वाटेच्या खुणा देणार आहे. 


धन्यवाद. 




१. चावणी गावातून नागफणी सुळका डाव्याबाजूला सोडून गाडी वाटेने पुढे आलं कि डाव्याबाजूला खाली दिसणारे गाव, नदी. इथे खुणा म्हणून गॅस पाईप लाईन चे पोस्ट आहेत. शिवाय उजव्या हाताला सरकारी मालमत्तेचं तारेचं कुंपण घातलेलं आहे. 


२. त्याच ठिकाणावरून मागे दिसणारा फणा काढून उभा असलेला नागफणी सुळक्याचा टोक. 


३. पुढे थोडं खाली उतरून डोंगर डाव्या हाताला ठेऊन मळलेल्या वाटेने सरळ चालत आलं कि आंबेनाळ दिसते. 


४. डाव्या कोपऱ्यात दिसते ती वाट आणि समोर दिसणारी आंबेनाळ. 


५. आंबेनळी च्या वाटेला असलेली २-४ घरांची वस्ती. यांनीच पुढच्या वाटेची कल्पना आणि अपडेट दिल्या. 


६. वस्तीवरील घरात आजी सोबत माहिती घेताना आमचा वाटाड्या दिपक आणि त्याच्या मागे विश्राम 


७. वस्तीवरून खाली उजव्या हाताने चालत आलं कि अशी गर्द झाडी लागते आणि मळलेली पायवाट. 


८. पुढे सपाटीवर आलं कि समोर दिसणारा टॉवर 


९. पुढे सपाटी वर आल्यावर उजव्या बाजूने खाली उच्च दाबाच्या विजेच्या टॉवर खालून चालत राहील कि मध्ये पाण्याचं मोठं डबकं लागत. याच्या उजव्या बाजूने टॉवर च्या दिशेने जावं. इथे ढोरवाटा असल्याने चुकण्याची शक्यता आहे. टॉवर हेच दिशादर्शक आम्हाला कामी आलं. 


१०.टॉवर खालून चालत आलं कि मध्ये वाडा लागतो. इथून टॉवर क्रॉस करून उजव्या वाटेवर ओढा लागतो त्या दिशेने चालत राहावं. ओढा ओलांडला कि मळक्या वाटेने करावी च्या जंगलातून वाट उतरत राहायचं. हा ओढा पाण्याचा शेवटचा पर्याय आहे पुढे खाली नदी आली कि पाणी. पण ओढा बारमाही नाही. 

शेवटी खाली उतरून नदी पर्यंत आलं कि हातपाय-तोंडावर पाणी मारून घ्यावं आणि मग नदीला पाठीवर ठेऊन पुन्हा चढायला सुरवात करायची. गॅस ची पाईप लाईन धरूनच कुरवंडा घाट चढवा लागतो. 


११. कुरवंडा घाट चढताना थोडी सपाटी लागते तेंव्हा तुम्हाला वरती नागफणी चे दर्शन होईल. ते आपलं शेवट च ठिकाण आहे. 


१२. सपाटी वरून दिसणारा सह्याद्री भार. हा डोंगर अजून चढायचा आहे. 


१३. कुरवंडा घाट चढून येण्यासाठी गॅस पाईप लाईन उत्तम दिशादर्शक आहे. मागे डाव्याबाजूला त्याचे पाईप लाईन चे पोस्ट दिसतात. 


१४. ट्रेक पूर्ण झाल्याच्या आनंदात आमच त्रिकुट. 


कोणत्याही ट्रेक दरम्यान आणि शक्यतो घाटवाटा करताना आपल्याला शक्य वाटत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढावे. पायवाट, त्यांच्यावरील खूणा, झाड, दगड इ दिशादर्शक खुणा म्हणून कामी येतात. माझ्या कडे बॅटरी बॅकअप नसल्याने मी जास्त फोटो काढू शकलो नाही. पण महत्वाचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्या आठवणी राहतात आणि नंतर कोणी जाणार असेल तर त्याच्यासाठी त्या उपयुक्त ठरतात. 

ऐतिहासिक कुरवंडा घाट आणि उंबरखिडीचा इतिहास ब्लॉग वर लिहलेला आहे. 


- जातिवंत भटके. 



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...