तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग-२
आमच्या तीन गाड्या वेल्हे गावाकडे भरधाव सुटल्या होत्या. पुण्यात कडाक्याची थंडी होती पण गाडीत आम्ही कोंबून बसल्याने लागणाऱ्या उबेने थंडी जाणवत नव्हती. अर्ध्या तासातच आम्ही नसरापूर फाट्याजवळ आलो आणि गाडीने वळसा घेतला. सकाळी ७.३० मिनिटांनी सुद्धा जाम धुके असल्यामुळे गड नीटसा दिसत नव्हता. मार्गासनी आल्यावर हळू हळू तोरणा आणि राजगड दिसू लागला. गाडीत पोरांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. सुशांत गुंडांनी तर एक छानस गण गावून धमाल उडवून दिली होती. गप्पा रंगात आल्या होत्या तोच वेल्हे गावाची शीव आली. वेल्हे गावातली शिवरायांची एक दिमाखदार मूर्ती पाहून सगळ्या गाड्या तिथे थांबल्या. तसे सगळी जन गाडीतून उतरली महाराजांना मुजरा केला. व्यंक्या , राहुल , राजेश , राम , मंगेश आणि इतरांनी पटापट कॅमेरे काढून आपली फोटोग्राफी सुरु केली.
ह्या मूर्तीचे रूप वेगळे आहे ती कोणी घडवली माहित नाही पण त्या व्यक्तीला ह्या पामराचा मुजरा. हि मूर्ती तोरणागडाच्या दिशेला तोंड करून उभी आहे. शिवरायांची तलवार गडाच्या दिशेने रोखली आहे. ह्या मूर्तीचे अजून उद्घाटन झाले नाही अशी माहिती गावकर्यांकडून कानावर आली. राजकारणी मंडळीनी इथेही आपली काशी केली आहे. असो.
सकाळचे ८.३० वाजले होते आणि तोरणा विहार मध्ये नाश्ता करून गड चढायला सुरुवात करायची होती. तसेच सगळ्यांनाच भूक लागली होती. काही पुढे काही मागे असे करत आम्ही हॉटेल मध्ये आलो. सर्वांनी पोटभरून नाश्ता केला. हॉटेल बाहेर येवून सर्वांचा परिचय सुद्धा झाला. त्यात आशिष वाडकर बंधू (स्वारगेट स्थानकात ७ ला येवून आम्ही नसरापूर फाट्यावर असताना फोन करतात कि मी आता स्वारगेटला आहे तुम्ही कुठे थांबलात ? ) तेही आले. सर्वाना instruction देण्यात आले. राहुल आपल्या करारी आवाजात शिवगर्जना केली व तोरणा कडे आमची जवळपास ४४ जनाची फौज चालू लागली (वेळ ९:४५ मिनिटे )
ताज्या दमाची फौज आवेशात सगळ्यांच्या पुढे होती मध्ये थोडे थकलेले आणि मागे आमची फोटोग्राफर मंडळी . आता उन्हाचा तडाखा लागायला लागला होता. चांगलीच झळ अंगावर लागत होती तर हळुवार एखादी वाऱ्याची झुळूक येवून जायची. थोड्या निरीक्षणावरून असे दिसले कि तोरणा गडाच्या आजूबाजूच्या परिसरात झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असावी. गडावर चालताना एकही मोठे झाड लागले नाही. कारवीच्या झाडे मात्र बर्याच प्रमाणात होती. मजल दर मजल करत, विसावा घेत , सह्याद्रीच्या रौद्र डोंगररांगाचे क्षणचित्र काढत सगळी निवांत चालत होती तर काहीजण इतिहासावर चर्चा करत चालली होती. मला मात्र चांगलाच थकवा जाणवू लागला होता. सर्दी आणि खोकल्याने भेडसावून सोडले होते. त्यात दोनदा ओषध घेतल्याने डोळ्यावर धुंदी येवू लागली होती. हळूच सगळ्यांच्या पुढे जावून एखाद्या कारवीच्या झाडाच्या सावलीत डोक ठेवून आराम करायचो आणि मागे राहिलेले तिथे आले कि पुन्हा पुढे जायचो असा माझा ससा आणि कासवाचा खेळ चालू झाला होता. २ तासांच्या प्रवासानंतर आता बिनीचा दरवाजा दिसू लागला होता तसे हायसे वाटू लागले. दरवाजाजवळ येवून एका ताकवाल्या पोराकडून २ ग्लास ताक प्यायलो. आणि गडावर अर्धवट बांधकाम असलेल्या धर्मशाळेजवळ आम्ही १५-२० जन इतरांची वाट पाहत विसावलो. आमच्या बाजूलाच एक ग्रुप जेवण करायच्या तयारीत होता. त्यात नंद्याचा भावाकडून त्या ग्रुपमधील दोघांचा दारू पिण्याचा कार्यक्रम चालू आहे अस कळल. तसे आमच्यात चर्चा सुरु झाली कि आता ह्यांना चांगलाच चोप द्यायचा. माझा रागहि अनावर झाला. तडक उठलो आणि दोन शिव्या हासडल्या तसे बाकीच्यांनी बोलायला सुरुवात केली. डॉक्टर झुंझारराव सुद्धा बोलू लागले. त्या ग्रुप मधील काहीजण हातापाया पडू लागले. माफ करा खूप मोठी चुकी झाली ह्याव त्याव.. काहीतरी बरळू लागले. त्यांना चांगलाच समज दिल्यानंतर दारू पिउन मटणाचा कार्यक्रम करणाऱ्या त्या भडव्यांना तिथल्या तिथे गड सोडायला लावले.( त्यांच्या ढुंगणावर कारवीच्या काठीचे चांगलेच फटके लगावले असते पण त्यात काही व्यक्ती वयाने मोठ्या होत्या म्हणून समज देवून सोडले )
तो ग्रुप निघून गेला तोच सगळेजण यायला सुरुवात झाली. आता मेंगाई देवीच्या मंदिरात sack टाकायच्या आणि थोडेसे खावून गडफेरीला सुरुवात करायची असे ठरले. मंदिरात पोचतोच तोवर तिथे अजय आठवले बंधू ११ वाजल्यापासून आमची वाट पाहत बसलेले. त्यांचाशी गाठभेट झाली. तसे हळूहळू एकेकाने घरून आणलेली शिदोरी बाहेर काढायला सुरुवात झाली. त्यात आम्ही राक्षसासारखे त्यावर तुटून पडलो. (वेळ २ ते २:४० मिनिटे दरम्यान )
सर्वांचे जेवण झाले. थोडी विश्रांती झाली. बरोबर ४ वाजता आमची गडफेरी ला सुरुवात झाली. आमची फौज चांगलीच थकली होती पण गडफेरी महत्वाची होती. सगळ्यांनी एकामागोमाग एक मेंगाई देवीच्या समोरून गड पाहायला सुरुवात केली. कल्याण दरवाजा , लक्कडखाना , बिनी दरवाजा , हनुमान बुरुज करून झाले. आता लक्ष होत झुंजार माचीचे. गडाच्या तटबंदीलाच चिकटून एक शिडी लावली होती व खाली जायचा रस्ता थोडा कठीण असल्याने मी आणि शंकर बापू पहिले खाली उतरलो व ज्यांना शक्य होईल त्यांनीच यावे याची खबर दिली. तसे काहीजण वरच थांबले व काहीजण आमच्या मागे माचीकडे उतरू लागले. थोडेसे अवघड प्रस्तरारोहण केल्यानंतर सर्वजन माचीपर्यंत सुखरूप पोहोचले . (वेळ ५:३० मिनिटे)
आता सर्वाना सूर्यास्त पाहायचा होता म्हणून पटापट सगळ्यांना तिथून पळायला भाग पाडले. कारण माचीपासून पुन्हा चढायला अर्धा तास लागणार होता. सूर्य हळू हळू मावळतीला निघायला लागला होता. माची चढून वरती यायलाच ६ वाजले. तसे सगळ्यांची कल्याण दरवाज्याच्या दिशेने पळापळ सुरु झाली. सगळी गडवाट करी आता निश्चिंत झाले होते. प्रत्येकातला फोटोग्राफर जागा झाला होता. मावळतीला निघालेल्या त्या सूर्यराजाचे छायाचित्र प्रत्येक जन आपल्या कॅमेर्यात टिपत होता. दिवस सरला आता रात्र झाली होती. सगळेजण आता एकत्र मेंगाईदेवीच्या मंदिरात आले होते. ७.३० मिनिटांनी वेल्हे गावातून जेवण आले. सगळी पोटभर जेवली. आता मंदिरापुढे सर्वांच्या गप्पा रंगणार होत्या. माझ अंग चांगलच फनफनायाला लागल होत. ६ वाजता क्रोसिन ची एक गोळी, खोकल्यावरचे औषध घेतले होते तरीही फरक पडला नव्हता. डॉक्टर झुंझाररावांच्या सल्ल्याने जेवण झाल्यानंतर कॉम्बिफ्लेम घेतली आणि रवींद्र बंधूनी खोकाल्यावरील एक जहाल औषध दिले. सगळी फौज मंदिरापुढे शेकोटीच्या बाजूने गप्पा मारत बसली होती नि माझ्या डोळ्यावर गुंगी यायला सुरुवात झाली होती. रात्री ९ वाजताच मला छानशी झोप लागली तरीही बाहेर चाललेल्या चर्चेचा आवाज सतत कानी पडत होता.
कसलं भूत आणि कसलं काय नुसती अफवाच.. आज रात्रभर आई भवानीची हि भुते तोरणा गडावर जागरण करणार होती. रात्री २ ला मला अचानक जाग आली तसे सगळेजण गाढ झोपले होते कोण घोरत होत तर कोण झोपेतच बडबडत होत. माझा ताप उतरला होता सर्दी कमी झाली होती. रात्री अंथरुणातून उठून एकटाच बाहेर जावून आलो आणि पुन्हा झोपलो. आता वेध लागले होते बुधला माची आणि राजगडच्या संजीवनी माचीपर्यंतच्या प्रवासाचे..
क्रमश:
Comments
Post a Comment