तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग -४
तोरणा गडाहून सकाळी ९ वाजता निघालेली आम्हा ४४ जनांची फौज आता संजीवनी माचीखाली येवून बिलगली होती. संजीवनी माचीचा भव्य बुरुज खालून विलक्षण दिसत होता. व त्यावरील भगवा ध्वजामुळे त्याला वेगळाच साज चढला होता. पुणे मुंबईहून आम्हास थेट राजगडावर भेटायला आलेले वैभव धोपट , जयदीपराव, नितीश, महेश दादा, शेखर आणि संदीप दादा माचीवरून मोठ मोठ्याने हाक मारत होते. ह्यांची वरूनच थट्टा मस्करी चालू झाली होती. चालून चालून थकलेलो आम्ही आता पुन्हा ताजेतवाने झालो होतो. मोठ्या बापूला चांगलाच चेव आला होता. हे गडी सगळ्यात पुढे होते (त्यांचे प्रिय मित्र संदीप दादा आले होते ना.. कधी भेटतोय अस झाल असाव).
संजीवनी माचीला वळसा मारून आम्ही उजव्या बाजूने अळू दरवाज्याकडे निघालो. घड्याळात ३.३० वाजले होते. सगळ्यांच्या पोटात कावळे ओरडायला लागले होते. काहींच्या पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झाल्याने खूप तहानही लागली होती. जवळ पास साडे सहा तास आम्ही मंडळी चालतच होतो. आता अळू दरवाजा दिसू लागला होता. काही जन पोहोचले पण होते. काही जनांची चाल धीमी झाली होती ते सावकाश येत होते. थोड्याच वेळात आम्ही अळू दरवाज्याच्या उंबरठ्यावर येवून पोहोचलो. दरवाजा न्याहाळला आणि वेळ कमी होता म्हणून लगोलग संजीवनी माचीकडे वळलो. महाराजांच्या देखरेखीखाली केलेले संजीवनी माचीचे बांधकाम पाहण्याजोगे आहे. माचीची दुहेरी तटबंदी मोहून टाकते. अजूनही ती चांगल्या अवस्थेत आहे. इतरत्र पांगलेले सगळेजण एकदाशी संजीवनी वर एकत्र आले. थोडेसे फोटो सेशन झाले. सगळ्यांना पुढील कार्यक्रम सांगितला. एकतर भूक लागली होती आणि आमचे जेवण पाली गावातून १.३० वाजताच येवून पोहोचले होते. त्या गावाचे दोन गावकरी आमची वाट पाहत पद्मावती जवळील सदरेवर थांबले होते. आता सगळ्यांनी पटापट चालायला सुरुवात केली.
पाली खुर्द गावाचे नानासाहेब धुमाळ यांच्या ओळखीने तुषार भोसले यांनी आमची गडावर जेवणाची व्यवस्था केली होती. आमची जेवणाची उत्तम सोय झाली होती. आजचा दुपारचा मेनू होता झुणका भाकरी , झणझणीत खर्डा (ठेचा ) आणि लोणचे. आता आम्ही पद्मावतीच्या सदरेजवळ आलो. महाराज ज्या ठिकाणी बसत असत त्या जागेला मुजरा केला. आधीच आम्ही सगळी भुकेलेली पोर. सदरेखाली सर्वाची पद्धतशीर पंगत बसवली आणि झुणका भाकरीवर आडवा हात मारायला सुरुवात केली. सगळे पोटभर जेवले. ३१ डिसेंबर म्हंटले कि आमच्या सारखे खूप जन किल्ल्यावर येणार. मंदिरात जागा पकडणार. मग आम्हाला कडाक्याच्या थंडीत बाहेर झोपावे लागणार असे विचार मनात येत होते. लगेच सगळ्यांना ओर्डर सोडली. आधी मंदिरात जावून जागा पकडायची आणि मग बाकीची गडफेरी करायची. माझा घसा बसला होता. आता सगळी जबाबदारी राहुलकडे सोपवली होती. सगळेजण लगोलग पद्मावती देवीच्या मंदिरात आलो. सर्वांनी sack ठेवल्या आणि सगळ्यांना मंदिराबाहेर जमायला सांगितले. फौजेची मोजणी केली. आता आमची संख्या बरोबर ५० जनांची झाली होती. राहुलला गारद द्यायला सांगितली. तसा सारा राजगड शिवगर्जनेणे निनादून गेला. महेश दादा आणि नितीश आम्हास खास राजगडास भेटण्यास आले होते. त्यांना निरोप दिला. हा नितीश तर खास कॉलेजला जातो म्हणून घरात सांगून पुण्याहून राजगडी आला होता.
त्यादिवशी शिव प्रतिष्टान चा १० जणांचा ग्रुप राजगडावर आला होता. चौकशी केल्यावर ती मुले माझ्याच जवळच्या गावातली होती. इकडची तिकडची ओळख झाली. त्यावेळेस कळेल कि ते राजगडावरिल पद्मावती मंदिर, महादेव मंदिर आणि सईबाई समाधी चे रंगकाम करायला आले आहेत. ऐकून आनंद झाला. त्यांना आम्ही तुम्हास मदत करू शकतो का विचारले. त्यांनी होकार हि दिला. हि बातमी आमच्या मंडळीना कळवली आणि सगळी मुले हे शिवकार्य करायला तयार झाली. मंदिराच्या भिंतीवर शेवाळ साचले होते. लगोलग सगळीजण भिंती घासायला लागले. कोण पाणी आणतय कोण रंग मारतोय. आता सर्वजण कार्यात सहभागी झाले होते. आम्ही काहीजणांनी त्या परिसरातील पाण्याच्या टाक्यांची साफसफाई सुरु केली. काहींनी मंदिराच्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली. हा हा म्हणता ६ वाजले. दिवस मावळतीला चालला होता. काही कामे आटोपली होती. काही कामे बाकी होती. आता सगळे सूर्यास्त पाहायला मंदिराच्या मागे एकत्र आली. काहींची इतिहासावरील चर्चा रंगत होती. तर काही जन कचरा पेटवून शेकोटीची मज घेत होती. सूर्यास्त झाला आता रात्र झाली होती. मंदिरात राहणाऱ्या मावशींना चहाची ओर्डर दिली. सर्वांचा चहा झाला. जेवण ८ वाजता येणार होते म्हणून सात सव्वा सात च्या दरम्यान सगळ्यांना पुन्हा मंदिरासमोर एकत्र यायला सांगितले. मंदिरासमोर मोठी शेकोटी पेटवली आणि आजूबाजूने सगळेजण बसले. मी बोलायला सुरुवात केली " ह्या ट्रेक दरम्यान आलेला अनुभव किंवा आतापर्यंत हा ट्रेक कसा वाटला तो प्रत्येकाने Share करावा ". तसे एकेक जन आपला अनुभव सांगू लागला. काहींचे अनुभव ऐकून हसून हसून डोळ्यात पाणी यायचे. सर्वांचे मजेशीर अनुभव होते. त्यातल्या त्यात वैभव खेडेकर यांचा अनुभव वेगळाच होता. ह्या महाशयांचे गेल्या महिन्यात छातीचे operation झाले होते. त्यांच्या छातीला जवळपास ४५ टाके पडले होते. तरीही सह्याद्रीच्या आणि गडवाटवर असलेल्या प्रेमापोटी ते आले होते. सर्वांचा अनुभव कथन करून झाला. गप्पा रंगात आल्या तोच तुषार भोसले जेवण घेवून दाखल झाले. देवीच्या मंदिरातच आमच्या जेवण्याच्या पंक्ती उठल्या. सगळे भरपेट जेवले आणि पुन्हा शेकोटीजवळ येवून आमच्या गप्पा चालू झाल्या (वेळ ९ वाजता). काही नवीन ग्रुप आता पद्मावती मंदिराजवळ दाखल झाले होते. आमच्या फौजेने ३-४ व्यक्ती सोडल्यास पूर्ण मंदिर काबीज केले होते(आमचे नशीब कि आम्हाला मेंगाई देवीच्या आणि पद्मावती देवीच्या मंदिरात रहायची सोय झाली नाहीतर गडावरील थंडी तुम्हाला माहीतच असेल). तोरणा ते राजगडच्या पायी प्रवासामुळे सगळेच थकले होते. त्यात जेवण झाल्याने काहींच्या डोळ्यावर पेंग येत होती. शेकोटीजवळ रंगलेल्या गप्पातून हळू हळू एकेकजण कमी होत होता आणि हळूच मंदिरात पकडलेल्या जागेवर जावून झोपत होता. १२ ते १२.३० च्या दरम्यान आम्ही सुद्धा आमच्या अंथरुणात विसावलो. आता १ जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचा प्रारंभ झाला होता. काहीजण झोपलेल्या सवंगड्याना उठवून नवीन वर्ष्याच्या शुभेच्छा देत होते. काही क्षणात सगळेच झोपी गेले. माझेही पाय चांगलेच दुखत होते. मला झोप कधी लागली हे कळलंच नाही. आमच्या कोलाहलाने गजबजलेला पद्मावती माचीवरचा परिसर आता शांत झाला होता. मंदिरात फक्त घोरण्याचा आवाज येत होता. आता राहिली होती सुवेळा माची आणि राजगडचा बालेकिल्ला.
क्रमश:
Comments
Post a Comment