तोरणा ते राजगड प्रवास सह्याद्रीचा भाग-३
३१ डिसेंबर चा दिवस उजाडला. पहाटेचे सहा ते साडे सहा वाजले होते. मला जाग आली तसे अंथरुणातच सगळ्यांना "उठा" म्हणून आवाज दिला आणि मीच पुन्हा झोपलो. आदल्या दिवशीचा प्रवास करून सगळेच थकले होते. काही वेळातच एकेक करून उठायला सुरुवात झाली. तरीही काहीजण झोपलेच होते. त्यात पंक्याने का कोणीतरी मेंगाईदेवीच्या मंदिरातली घंटा जोरजोरात वाजवायला सुरु केली. त्या आवाजाने शेवटी सगळेच उठले. सर्वाना नैसर्गिक विधीसाठी जायला रात्रीच जागा दाखवली होती. प्रत्येकाच्या हातातील पाण्याच्या बाटल्या त्या दिशेने वळत होत्या. सगळे जन झोपेतून उठायला ७.३० वाजले. त्यात काहीजण सूर्योदय पाहायला आधीच गेले होते. आता लवकरात लवकर बुधला माची उतरायची होती. ८.१५ वाजता सगळ्यांना pack up करायला सांगितले. चिवडा-बिस्कीट यांवर सगळ्यांनी ताव मारला. पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि बुधला माचीच्या दिशेने आमची फौज निघाली.
आता सगळेजण पद्धतशिरपणे एका मागोमाग एक असे चालत होते. वाटेत एक कठीण patch होता. तो cross करताना अर्ध्या जणांची चांगलीच xxx होती. माझ्याकडे रोप होता पण तो १० फुट एवढाच. मी , मोठा बापू (शंकर सापते ), छोटा बापू (बापू पवार ), नंद्या त्या patch वर सगळ्यांना सावरत पुढे जायला मदत केली. बस..
आता सगळे सुराला लागले होते. बुधला माची जवळ आली. सगळ्यांनी तिचे दर्शन घेतले आणि खाली येवून शिडी उतरायला सुरुवात केली.
आम्ही पटापट उतरून चालायला सुरुवात केली. आता खूप लांबचा पल्ला गाठायचा होता. सूर्य डोक्यावर यायला लागला होता. ९ वाजता तोरणा सोडला होता. उन्हाची झळ लागायला सुरुवात झाली होती. पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत होत्या. २ ते २.३० तासांच्या रपेटीनंतर धारदेव वाडीतल्या एका घराजवळ पोहोचलो. सगळ्यांनी घरासमोर असलेल्या झाडाखाली sack टाकल्या आणि उताणे झाले. आबाने त्या वाड्यातील काकूला चहा करायला सांगितले. इकडे सगळ्यांना करकचून भूक लागली होती. आमच्या फौजेतील पैलवान गडी अमित कदमच विचारूच नका. वाटेत येताना ह्याने खेकडा पकडला. त्याच्या दोन्ही नांग्या तोडल्या आणि त्या नांग्या दातात घालून तो खेकडा कच्चा खायला देखील सुरुवात केली. कुरकुरे खाताना कसा आवाज येतो अगदी तसा आवाज येत होता. काहीजण त्याच्याकडे डोळे आ वासून पाहत होती अन काहीची तोंडे कशीबशी झाली होती. एवढ्यावर त्याच भागल नाही. त्या वाड्यातील काकूला हा गाडी कसा विचारतो " मावशी काय शिळ-पाक हाय का ? लय भूक लागलीय " त्या मावशीला त्याची दया आली आणि तिने चक्क चार शिळ्या भाकऱ्या आणि भात आणून त्याला खायला दिला. ह्या महाशयाने ताकात भाकऱ्या कुस्कारून आडवा हात मारायला सुरुवात केली आणि त्याच्या जोडीला ४-५ जन सुद्धा सहभागी झाले. काहींनी बिस्कीट सोबत टोमाटो सॉस खायला सुरुवात केली. काहींनी कच्ची Maggi खायला सुरुवात केली. नुसता राडा चालला होता. सर्वांचा चहा नाश्ता पाणी झाले. अर्धा पावून तासात सगळ्यांना बोळा-बिस्तरा हलवायला सांगितले. रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या पुन्हा भरून घेतल्या आणि मार्गी लागलो.
वाटेत थोडावेळ रस्ता चुकलो पण मळलेली वाट सापडली. आता संजीवनी माची बर्यापैकी जवळ दिसत होती. मधेच कोणना कोण तरी यायचे नि प्रश्न विचारायचे सुहास अजून किती वेळ ?? माझेही उत्तर ठरलेले होते " हे काय आता ५- १० मिनिटात पोहोचतोयच.. त्यामुळे मुले सुद्धा बिगीबिगी चालत होती. आता तोरणा सोडून ४.३० तास झाले होते. तोरणा गड बराच लांब दिसत होता. कोणालाच विश्वास बसत नव्हता कि आपण इतके चाललो आहे. थोड्याच वेळात वाटेत डांबरी रस्ता आडवा आला. काही मंडळी पुढे तर काही मंडळी मागे राहिले होते पण टप्प्यात होते. त्यामुळे चिंता नव्हती. आता आळू दरवाजाचे अंतर फक्त ४ किमी राहिले होते. संजीवनी माची खूपच जवळ दिसत होती. माचीवारचा भगवा ध्वज स्पष्ट दिसू लागला होता. गडावर आलेले काहीजण वरून आमच्याकडे पाहून जोरजोरात घोषणा देत होते.. "हर हर महादेव.. जय भवानी.. जय शिवराय.." तेवढाच आम्हा सगळ्यांना हुरूप आला होता. थोड्या थकवा देणाऱ्या चढाई नंतर संजीवनी माचीच्या बुरुजाखाली आम्ही पोहोचलो. आता माचीला वळसा घेत पुढे आळू दरवाजाच्या दिशेने आम्ही निघालो होतो. जवळ पास २०-२५ किमी चे अंतर आम्ही पार केले होते. ह्या प्रवासात अन्न, पाणी आणि निवारा ह्या माणसांच्या गरजा किती महत्वाच्या असतात हे कळून चुकले होते. शहरात राहणारे आम्ही ह्या डोंगर दर्यात राहणारे लोक कसे जगत असतील याचा विचार प्रत्येकांनी केला असावा व अनुभवला सुद्धा. आता सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता.
३१ डिसेंबरला कुठल्या डिस्को थेक मध्ये , बार मध्ये , पार्टीमध्ये वेळ न घालवता सह्याद्रीच्या कुशीत ही सगळी लेकरे भटकत फिरत होती. हा प्रवास सगळ्यांच्या सार्थकी लागला होता."याचसाठी केला होता अट्टहास". सगळे भरून पावले होते.
आता लक्ष होते आळू दरवाजा संजीवनी माची आणि संपूर्ण राजगड.
क्रमश:
Comments
Post a Comment