Skip to main content

विकट वाटेने विकटगड (पेब) भाग-२

मालडूंगे गावातून अर्ध्या तासातच कोंबलटेकडीत पोचते झालो. बाळूला सोबत घेतला आणि पुन्हा मार्गी लागलो. गड स्पष्ट दिसत होता. एका डोंगराला वळसा मारून पेबच्या किल्ल्यावर जाण्याचा येथून सोपा तसाच कठीण मार्ग आहे. पावसाने पुन्हा वर्दी दिली. भिजत भिजत जंगलात शिरलो. वाटेत २ धबधबे लागले. आमची वाट त्यावरूनच जात होती. एकमेकांना आधार देत सर्वांनी धबधबे मागे सारले. तजेलदार वातावरण, फेसबुकवरले विनोदी स्टेटस, ट्रेकच्या गप्पा तर काही इतिहासाच्या गप्पा मारत जंगलातील वाट तुडवत चालत होता. मधेच कोणी तरी दमायचा आणि मागे राहायचा. मग आले रे जवळ चाल पटपट करत एकेकाला पुढे ठेवायचो. विशाल, रवींद्र आणि दिनेशमधला फोटोग्राफर जागा झाला होता. आडवेतिडवे भन्नाट फोटू काढत तेही चालत होते. एका तासात गडावर पोचते झालो. गुहेच्या अलीकडेच म्हणजेच शिडीच्या तोंडावर हि वाट आणून सोडते. पाऊस आणि वर काय शांत झाला नव्हता. नेरळहून आलेले ट्रेकर्सनी शिडीच्या बाजूला चांगलीच गर्दी केली होती. कसेबसे वाट काढत गडवाट फर्स्ट करत आमच्या पोरांनी शिडीवर ताबा मिळवला. शिडी चढताना गडाच्या भिंतीवरून पडणाऱ्या पाण्याने आणि भन्नाट वाऱ्याने फवारे तयार झाले होते. शिडी चढताना चेहऱ्यावर पाण्याचा चांगलाच मार बसत होता. डोळे झाकून एकेकजन वर आला. मध्यवर्ती भागात आल्यावर सगळ्यांना गडाची माहिती देण्यात आली. कोणी चुकले तर नाही ना म्हणून पुन्हा मोजणी झाली आणि पेबी देवीच्या मंदिराकडे चालते झालो. गडावर धुक्याचे साम्राज्य पसरले होते. किल्ल्यावर येणाऱ्यांचा रोजचा राबता असल्याने वाट मळलेली होती. १० ते १५ मिनिटातच मंदिराजवळ आलो. मंदिरात गडप्रेमी मुलांचे छोटेसे हॉटेल आहे. जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांची जेवणा नाश्ताची सोय व्हावी. आबाने चहाची ओर्डर दिली. तोपर्यंत भुकेने व्याकूळ झालेलो आम्ही सर्वांनी Sack मधला ऐवज (बिस्कीट, फरसाण) बाहेर काढून फस्त करायला सुरुवात केली. १५-२० मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर चहा आला. घश्यात चहा गेल्यानंतर मला कुठे तरतरी आली. मस्तपैकी पुन्हा एकदा चहा फराळ झाला. तेथील हॉटेल चालविणाऱ्या गडमित्रांनी विकटगड संवर्धन बाबत थोडीशी माहिती दिली. संपर्क क्रमांकाची देवाण घेवाण झाली आणि फुटक्या बुरुजाकडे वळलो. 

वाटेत असणारे शिवमंदिराचे दर्शन घेवून बुरुजाजवळ पोहोचलो. माथेरानचा panorama point येथून दिसतो आणि माथेरानकडे जाणारी वाट देखील याच बाजूने आहे. हळूहळू निसर्गाचे फोटो काढत बुरुजाजवळ येवून थोडावेळ सर्व विसावले. पावसाने साथ सोडली होती पण रानवारा तसाच वाहत होता. विक्रांतने खनक्या आवाजात मोठी गारद दिली आणि हर हर महादेव चा आवाजाने सर्वांनी लवून मुजरा केला. मग मस्तपैकी ग्रुप फोटू काढून उरलेला किल्ला पाहायला गडावर सर्वात उंचीवर असणाऱ्या दत्तमंदिराकडे चालत सुटलो. मंदिराच्या अलीकडे एक शिडी लावली आहे. आधारासाठी असणारे रेलिंग काही कामाचे नव्हते म्हणून जरा जपत विना आधारे सगळीजण आता गडमाथ्यावर आली होती. ३ वर्षापूर्वी मी आलो होतो तेव्हा छोटेसे मंदिर होते. आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे. दिसायला सुंदर असे हे मंदिर जीर्णोद्धार झाल्यानंतर आणखीनच शोभून दिसेल. पण याच वेळी एक प्रश्न उदभवतो कि भविष्यकाळात याचे तीर्थस्थळ तर होणार नाही ना ? असो… 
धुक्याची दाटी असल्याने आजूबाजूचा परिसर नीट न्याहाळता येत नव्हता. निरभ्र चंदेरी, मलंगगड, प्रबळगड, कलावंतीण आणि इरशाळगड येथून स्पष्ट दिसतो. गडावर धुके आणि पाऊस अधून मधून येत होता तसेच वेळेचे बंधन असल्याने गडफेरी लवकर उरकायची ठरवले. बाळू पावसात भिजल्यामुळे कुडकुडत होता (गड्याने छत्री आणली होती). तसेच त्यालाही घरी जायचे होते. पुन्हा विठ्ठल आणि बापूला लीड देवून पुढे चलायला सांगितले. आता आम्ही सॉटकट मार्गाने जाणार होतो. सगळेजण सावकाश काही धडपडत खाली उतरले. आम्ही शिडीजवळ येतो तोवर जवळपास ३००-३५० कॉलेजवीर मुलांची फौज शिडीच्या खाली दाखल झाली होती. १५ ते १७ वयोगटातील मुलांना अश्या पावसात घेवून येणाऱ्या त्या सरांचा चांगलाच राग आला होता. कारण ती मुले ३ वाजता गडावर पोहोचली होती. एवढ्या मुलांच्या सुरक्षेसाठी फक्त २-३ सर आले होते. पेब सारख्या किल्ल्यावर एवढी मुले घेवून येणे आश्चर्य होते खरे… पण भर पावसात ती मुले थंडीने चांगलीच गारठली होती. विठ्ठलने त्या सराचा चांगलाच समाचार घेतला. त्यात काही मुले अनवाणी चालत होती. एखादा घसरल्यावर, अपघात झाल्यावर काय करणार होते देव जाणे. असो… आम्ही कसेबसे ती शिडी उतरून गुहेजवळ आलो. त्या शिडीपासून गुहेपर्यंत या मुलांची रांग लागली होती… तोंडात शिव्या येत होत्या पण आतल्या आत दिल्या. गुहा चांगलीच मोठी आहे. स्वामी समर्थांचे शिष्य येथे येत असतात असे गुहेत लावलेल्या फोटोवरून दिसून येते. याच गुहेच्या उजव्या बाजूला महाराजांची मूर्ती आहे. रवींद्र शेडगे यांनी गारद देवून महाराजांना मानवंदना दिली. आता वेळ होती घरातून आणलेली शिदोरी खायची. सर्वाना चांगलीच भूक लागली होती. एकमेकांचे डब्यातील जेवण चिवडा बिस्किटे खात पोटोबा झाला. आता उशीर करून चालणार नव्हते. पुन्हा सर्वाना मार्गस्थ लावले. बाळूला निरोप दिला आणि नेरळच्या वाटेला लागलो. या वाटेत येणाऱ्या rockpatch ला रोप लावून सर्वाना सुरक्षित उतरवले आणि गडाचा निरोप घेत घरचा रस्ता पकडला. 
मधेच चिंब भिजवून जाणारा पाऊस आणि भन्नाट रानवाऱ्यासोबत फिरताना वेळ कशी निघून गेली कळलेच नाही. या ट्रेकला सगळीच ताजीतवानी दिसत होती. आमचा पद्धतशीर आणि आटोपता ट्रेक झाला होता.  गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर पुढच्या ट्रेकची माहिती झाली. इतिहासाच्या गप्पा,  चेष्टा मस्करी करत गाडीने नेरळमध्ये दाखल झालो. त्यात एका गाडीवाल्याचा किस्सा चांगलाच रंगला (आता सांगू शकत नाही लय मोठी स्टोरी आहे). नेरळमध्ये पोहोचायला आम्हास ६ वाजले. पुन्हा एकदा पेटपूजा करण्यासाठी स्टेशनबाहेरील हॉटेलात मिसळपाव वर सर्वांनी ताव मारला. ट्रेनच्या तिकीटा काढल्या. तासभर ट्रेनची वाट पाहत पुन्हा गप्पा मारल्या आणि मुक्काम पोस्ट होमकडे निघालो.  
 
या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे..
शेवटी तो माझा गुरु आहे."

ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.

।। जय शिवराय ।।

- जातिवंत भटका

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...