आमचा P2V ट्रेक
कसय शीर्षक ??? P2V म्हंजे पन्हाळा ते विशालगड बर का…! लयीच Modern आणि short नाव दिलंय… त्याचप्रमाणे थोडक्यात लिहितोय… घड्याळाच्या काट्यावर चालणारा मी चाकरमानी माणूस… घ्या समजून… :P
तर जूनमधे या ट्रेकचा प्लान झाला… ऑगस्ट महिन्याची ९-११ तारीख ठरली. हा हा म्हणता दिवस उजाडला… मुंबई, पुणे, सातारा, चंद्रपूर, सोलापूर, तुळजापूर हून आलेली अशी ५९ जन सकाळी ९ च्या सुमारास गडावर दाखल झाले. अंघोळ, चहापाणी उरकून गडावर असणाऱ्या शाळेत सार्वजन हजर झाले.. पन्हाळ्यावर एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. ११ च्या सुमारास मान्यवरांचे जल्लोषात आगमन झाले…सत्कार झाला…. संभाषण झाले… उशिरा का होईना कार्यक्रम थाटामाटात उरकला…. Counting झाली…. सूचना झाल्या…. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी भगवा दाखवला आणि ट्रेकला सुरुवात झाली…
पन्हाळा ते विशालगड तब्बल ६५ ते ७० किमीचे अंतर दोन दिवसात पार करायचे होते. त्यातला अर्धा दिवस सरला होता… मुक्कामाचे गाव पन्हाळ्यापासून अदमासे २८-३० किमी वर होते.…रस्त्यात जेवणाच्या पिशव्यांचे वाटप झाले… पवनकुमार निपाणीकर यांनी आघाडी घेतली…. आणि पुसाटी बुरुजाच्या दिशेने सर्वांची पावले वेग धरू लागली…. रमत गमत रस्त्याला लागलो…. थोड्या वेळात मसाई पठारावर आलो. आपापली शिदोरी काढून दुपारचा पोटोबा उरकला… जेवण उरकेल तस एकेकजण वाटेला लागला…. ऊन पावसाचा खेळ अंगावर झेलत, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहत, तो आपल्या नजरेने कॅमेऱ्यात बंदिस्त करत मसाई देवीच्या मंदिरास हात जोडून चालतच नमस्कार करत ४ ते ४.३० च्या सुमारास मसाई पठार उतरलो.…. कुंभारवाडा आला… चिखलाने भरलेला रस्ता पायी तुडवत, धडपडत, घसरत चाफेवाडी आली. खूप जन चांगलेच थकले होते… मागे पुढे पांगले होते… पण कोणी थांबत नव्हता… दिवस मावळतिला आला होता. हिरव्याकंच झाडीने आणि सूर्याच्या भगव्या लकीरीमुळे जोश मावळला नव्हता… तेवढ्यात खोतवाडी आली… मागे राहिलेल्या मंडळीची वाट पाहत रस्त्यावर बस्तान बसवले…. रस्त्याकडेच्या घरात चहाची ओर्डर दिली… सर्वजन आले… चहा झाला…. ७ ते ७.३० च्या सुमारास खोतवाडी सोडली… अंधार पडला होता… आता torch चा प्रकाश सुरु झाला होता. काहींनी torch आणले नव्हते त्यांना आधार देत, पुढच्या व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवत चालला होता… मांडलाईवाडी आली… थोडे विसावलो व पुन्हा रपेटीस सुरुवात झाली… १० ते ११ च्या दरम्यान करपेवाडीस पोचते झालो…मुक्कामच्या घरातले वाट पाहून कंटाळले होते… खांद्यावरचे वजन टाकले… ताबडतोब जेवण उरकले…. आणि सर्वजन झोपेच्या आहारी गेले….
सकाळ झाली…. सर्वांचे वाघ मारून झाले… चहापाणी नाश्ता झाला….५९ मधले ५ जणांनी माघार घेतली… त्यांना निरोप दिला… आणि ९ वाजता करपेवाडी सोडली…. निलगिरी च्या झाडांनी आच्छादलेलं जंगल पार केल… आंबेवाडी आली…. पुन्हा चिखलाने माखलेला रस्ता लागला…. कळकवाडी आली… माळेवाडी मागे टाकत थोडा डांबरी रस्ता लागला व पुन्हा पाटेवाडी चा कच्चा रस्ता पकडला…कळकवाडी आली… रिंगेवाडी, माळेवाडी मागे टाकत थोडा डांबरी रस्ता लागला व पुन्हा पाटेवाडी चा कच्चा रस्ता पकडला… कालपासून किती चालतोय याचा कोणालाच हिशोब नव्हता… बस… फक्त चालत होते…. रक्तपिपासू जळू, विंचू, मच्छर अशांचा त्रास सोसत सुकामाचा धनगरवाडा, म्हसवडे मागे टाकत पुन्हा एकदा डांबरी रस्ता पकडून २ ते ३ च्या दरम्यान पांढरपाणी गाव गाठले. इथे असलेल्या पडक्या शाळेत सर्वांनी जेवण उरकले… आणि हळू हळू एक कुजबुज सुरु झाली…. "दादा आता यापुढे चालू शकणार नाही" असे शेवटी एकजण म्हणाला… खरच सगळे चांगलेच दमले होते… मग सर्वानुमते निर्णय झाला कि आता वाट पाहीन पण ST किंवा कशानेही जाईन… विशालगडला जाणारी शेवटची गाडी ४ ची होती. अजून पावनखिंडीचे दर्शन बाकी होते. पांढरपाणी पासून पावनखिंड ६ किमी अंतर होते. ४ वाजता ST पकडली… गाडी आधीच माणसांनी भरली होती. आणि आम्ही ५४ जन… सर्वजन कसेबसे रेटून चढले… Conductor ला विशालगडाहून खासे आमच्यासाठी गाडी परत पावनखिंड फाट्यावर आणण्याची विनंती केली… आणि ती मान्यहि झाली… ST ने सर्वजन पावनखिंडीच्या फाट्यावर उतरले. यथाचीत पावनखिंड दर्शन झाले… थोडी ऐतिहासिक चर्चा झाली.… येथे होणाऱ्या सुशोभीकरणाचे बांधकाम पाहून मन थोडे खिन्न झाले… असो…
पुन्हा पावनखिंड फाट्यावर येवून गाडीची वाट पाहत सगळे रिफ्रेश झाले… तासाभरात ६.३० वाजता गाडी आली आणि ७.३० ला विशालगडावर दाखल झालो. विनायक जंगम यांच्या घरी आमचा मुक्काम पडला… चहापान झाले… जेवण उरकले… करणराजे बांदल यांचे इतिहासावर चर्चात्मक व्याख्यान झाले.… तब्बल २ दिवस चालणारे सर्वांचे पाय चांगलेच क्षीण झाले होते. कोण मालिश करीत कोण वोलिनी स्प्रे चा फवारा उडवीत पायांचा दाह शांत करत, तर कोणी गप्पागोष्टी, थट्टा मस्करी करीत झोपी गेला…. मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा दिवस उगवला…. आता विशालगड भ्रमंती बाकी होती… सकाळ दिनक्रम उरकून नाश्तापाणी करून विनायक जंगम यांचे आभार मानत निरोप दिला…. २ ते ३ तासात गडभ्रमंती उरकली… गडाची सद्य परिस्थिती मी इथे कथन करू इच्छित नाही…. दुपारी १२ च्या ठोक्याला गड उतरलो…. महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या गडवाटकरयांना निरोप दिला आणि परतीच्या वाटेला लागलो…
P2V ट्रेकचे तीन सुखद दिवस खूप काही शिकवून गेले… नवनवीन मित्र भेटले…. सह्याद्रीतला उनपावसाचा धुक्यांचा खेळ पाहिला… जळू, विंचू आणि मच्छरांचा सामना केला…. जिद्द, ध्येय, सहनशीलतेचे धडे सर्वांनी चालताना गिरवलेच असणार…
एक प्रवास संघर्षमय इतिहासाचे साक्षीदार असलेली शक्तीस्थळे पाहण्याचा …. एक प्रवास उघड्या डोळ्यांनी तो अनुभवण्याचा…. एक प्रवास चित्तथरारक ऐतिहासिक वाटेवरील पदभ्रमंतीचा….
आता इथेच थांबतो… _/\_
या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे..
शेवटी तो माझा गुरु आहे."
ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.
।। जय शिवराय ।।
- जातिवंत भटका
Comments
Post a Comment