त्रिंगलवाडी ट्रेक भाग-२ गडाच्या दिशेने चालायला लागलो तसा ढगोजीरावांनी एकत्र येवून बरसायला सुरुवात केली. मस्त पावसात भिजत रानातून असलेल्या वाटेवर चालत एकेकजण पुढे पुढे जात होता. वाटेच्या कडेने भाताची पिके हिरवळीने सजली होती तर कुठे शेतकऱ्यांची बैलजोडीसोबत नांगरट चालू होती. साखरेच्या वासाने मुंग्या जश्या एकामागे एक चालत वाट काढत त्या साखरेला भिडतात तसे आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. किल्ल्याचा इतिहास एवढाच वाचनात येतो कि किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ऐकिवात नाही. पण १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडाच्या पायथ्याशी दहाव्या शतकात खोदलेली जैनधर्मीय गुहा लागली सध्या तिला पांडवलेणी असे म्हणतात. गुहेच्या गाभाऱ्यात भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे (यवनी सत्तांनी केलेल्या आक्रमणात याही मूर्तीची विटंबना झाली आहे). गुहेत असलेल्या चार खाम्बापैकी ३ खांब पडले किंवा पाडले आहेत. एकाच खांब सध्या सुस्थितीत आहे. हि गुहा प्रशस्त असून येथील म...