Skip to main content

सफर सप्तदुर्गांची भाग-२



सकाळपासून आभाळ दाटलेलं होत. ढगोजीचे सैनिकांनी सुर्याजीरावास वेढा दिला होता त्यामुळे हवेत थोडासा गारवा निर्माण झाला होता. पण दुपारी १२.३० नंतर ढगोजीरावांच्या सैनिकांना नेस्तनाबूत करून सुर्याजीरावांनी लढाई जिंकली. जोरदार उन लागायला सुरुवात झाली होती. बोइसर ते शिरगावचे अंतर ११ किमी इतके आहे. बोइसर रोडवरून पालघर गावाच्या चौकात पोहोचल्यावर उजवीकडे वळावे. तो रोड थेट माहीम - केळवे- दांडा या गावांकडे जातो. २-३ किमी पुढे गेल्यानंतर पुन्हा एक फाटा लागतो तो शिरगावला जातो. त्या दिशेने वाट धरावी.. बोइसरहून शिरगावात पोहोचायला आम्हास ३० मिनिटे लागली. गावात गेल्यावर किल्ल्यावर जाणारा रस्ता विचारत आम्ही एकदाशी किल्ल्याजवळ पोहोचलो. समुद्र किनाऱ्याला लागुनच शिरगावचा किल्ला आहे.. गेल्या क्षणीच किल्ल्याच्या मुख्यद्वारावर असलेल्या दोन कमानी/मनोरे लक्ष वेधून घेतात. मी अजूनपर्यंत इतर किल्ल्यांवर अश्या कमानी पहिल्या नव्हत्या. टेहळणी साठी यांचा वापर केला जात असे.. किल्ल्यात प्रवेश करायच्या आधी भिंतीवर एक माहिती लिहिली होती ती म्हणजे "किल्ल्यात शौचालयास बसणाऱ्याकडून १००० रुपये दंड आकारला जाईल" हसावं का चिडाव तेच कळेना.. त्यावर दुर्लक्ष करीत किल्ल्याच्या महाद्वाराजवळ आलो.  

गडाला २ प्रवेशद्वार आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकाम केलेले आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर काटकोनात दूसरे प्रवेशद्वार आहे. या दोन प्रवेशद्वारांच्या मध्ये पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. दोन प्रवेशद्वारांमधील भागात पूर्वीच्याकाळी दोन मजले असावेत. या ठिकाणी वाश्यांसाठी केलेल्या खाचा, भिंतीतील नक्षीदार कोनाडे नजरेस पडतात.दुसर्‍या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजवीकडील भिंतीच्या तळाच्या दगडावर पुसट झालेल्या आकृत्या कोरलेल्या दिसतात; तसेच एका दगडावर १७१४ हे साल कोरलेले दिसते. किल्ल्याच्या पूर्नबांधणीत हे जुन्या काळातील दगड किल्ल्याच्या भिंतीच्या पायात गेले असावेत.किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या हाताला कोठीचे अवशेष व जिना आहे. उजव्या हाताला एक वास्तूचे अवशेष व जिना आहे. या जिन्याने बुरुजावर जाता येते. या बुरुजावर एक तोफ आहे. किल्ल्याला एकूण ५ बुरुज आहेत. चार टोकाला अष्टकोनी बुरुज असून, पाचवा बुरुज प्रवेशद्वाराजवळ असून तो अर्धगोलाकार आहे. किल्ला २०० फूट लांब व १५० फूट रुंद असून किल्ल्याची तटबंदी ३५ फूट उंच व १० फूट रुंद आहे किल्ल्याच्या फांजीवरुन किल्ल्याची प्रदक्षिणा करता येते.प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्यासाठी बांधलेला मोठा हौद आहे. त्याच्या बाजूला असलेल्या जिन्यावरुन प्रवेशद्वारा समोरील बुरुजावर जाता येते. या बुरुजाच्यावर टेहाळणी मनोरा आहे. एका वेळी एक माणूस जाऊ शकेल अशा वर्तुळाकार जिन्याने दोन मजली मनोर्‍यात जाता येते. या मनोर्‍यातून प्रवेशद्वार व आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. मनोर्‍यातून उतरुन प्रवेशद्वारा जवळील बुरुजावरच्या मनोर्‍यात जाता येते.किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूस चोर दरवाजा आहे. त्याच्या उजव्या बाजूस तटबंदीत दुमजली खोल्या असून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आत मधूनच काढलेला जिना आहे. चोर दरवाज्याच्या उजव्या बाजूस धान्य कोठाराचे अवशेष आहेत.शिरगाव किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला अनेक फांद्या फुटलेले वैषिष्ट्यपूर्ण ताडाचे झाड किंवा "रावणमाड" पाहायला मिळतात. या झाडाच्या प्रत्येक फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत. त्यामुळे हे ताडाचे झाड एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे दिसते. अशी अजून काही झाडे किल्ल्याच्या बाहेर आहेत.

किल्ल्याचा आकार छोटुसा असल्याने काही तासातच किल्ला पाहून झाला. या किल्ल्याचा इतिहास एवढाच कि नोव्हेंबर १७३७ मध्ये मराठ्यांनी पोर्तुगिजांच्या ताब्यातील या किल्ल्याला वेढा घातला. महिना झाला तरी किल्ला सर होत नव्हता म्हणून मराठ्यांनी डिसेंबर अखेर वेढा उठवला.जानेवारी १७३९ रोजी मराठ्यांनी हा किल्ला डहाणू, केळवे, तारापूर या किल्ल्याबरोबर जिंकून घेतला व दिनांक २२ जानेवारी १७३९ रोजी गड मराठ्यांच्या ताब्यात आला. १७७२ मध्ये मराठ्यांनी किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १८१८ मध्ये शिरगावचा ताबा इंग्रजांकडे गेला. 
किल्ल्यावर एक अनमोल गोष्ट पहावयास मिळाली ती म्हणजे किल्ल्याच्या आतील भिंतीवरील एका देवळीत महाराजांची प्रतिमा असेलेले छोटेसे मंदिर व त्यापुढे असलेले जुने तुळशीवृंदावन. महाराजांना मुजरा करून किल्ल्याचा निरोप घेतला. 
सदर किल्ल्याचे बांधकाम उत्कृष्ट असल्याने तसेच लोकांचे येणेजाणे कमी असल्याने बुरुज तटबंदी अजूनही शाबूत आहे. तटबंदीवरून दिसणारा समुद्रकिनारा मन मोहून घेतो.  घड्याळात २.४५ मिनिटे झाली होती. आता पुढचा किल्ला होता माहीमचा… 
आल्या रस्त्याने पुन्हा शिरगाव फाट्यावरून उजवीकडे वळलो. विक्रांतराव जाम चेकाळले होते. गाडी काय दम घेत नव्हती.. ९०-१०० च्या खाली काय काटा येत नव्हता. मागे मी कसाबसा जीव हातात घेवून गपचूप पुढून येणाऱ्या गाड्या बघायचो. तसा आमचा गडी गाडी चालवण्यात हुशार आहे म्हणा.. 
शिरगाव ते माहीम हे अंतर ५ किमी चे आहे. गावात गेल्यावर पोलिस चौकी ला गाडी थांबवून एका २०-२२ वर्षीय मुलाला किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग विचारला. हे बेन भामट निघाल. आम्हाला चुकीचा रस्ता दाखवला जो महिकावती मंदिराकडे जातो अर्ध्यात गेल्यावर एक गाव लागले तिथे विचारून त्यांनी बरोबर मार्ग सांगितला. मग पुन्हा माघारी आलो. माहीम मध्ये आलात कि शासकीय दवाखाना कुठे आहे हे विचारावे. या दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला आहे. 
झाडाखाली गाडी लावली. एक दृश्य दिसले ते म्हणजे बियरच्या बाटल्यांचा किल्ल्याबाहेर पडलेला खच. किल्ल्याच्या दरवाजाजवळ आलो. सध्याचा किल्ला हा बालेकिल्ला असून इतकेच काय ते अवशेष सध्या उरले आहेत. पूर्वाभिमूख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्याबाजूस उध्वस्त वास्तूचे अवशेष असून, उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहिर आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते.जिन्याच्या टोकाला दूसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे. किल्ल्याच्या बाहेर भवानी मंदिर आहे. १५-२० मिनिटात किल्ला पाहून होतो. 
किल्ल्याच्या इतिहासाबद्दल नेटवरून घेतलेली माहिती अशी कि, केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळूकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनार्‍यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात माहिमचा मुळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भिमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला. इ.स १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडूजी करुन त्यास मजबूती आणली. छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता; पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही. इ.स १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगिज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली त्यात अनेक मराठे ठार झाले. ९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्‍याचा बंगला होता.

आता घड्याळात ३.४५ मिनिटे झाली होती. पुढचे लक्ष होते केळवे किल्ला आणि केळवे पाणकोट. ४ च्या सुमारास केळवे बीचवर दाखल झालो. घस्याला कोरड पडली होती. पाव भाजी नंतर पोटात फक्त पाणी जात होते. थोडासा बदल  म्हणून थंड उसाचा रस प्यायलो. ऊसवाल्याला किल्लाकडे जाणारा रस्ता विचारला आणि किल्ल्याकडे निघालो. माहीम ते केळवे अंतर फक्त ३ किमी आहे. केळवे चा समुद्रकिनारा खूप प्रसिद्ध असल्याने येथे लोकांची वर्दळ कायमची असते. किनार्यालगत असणारी सुरुचीची उंचच उंच झाडे आणि त्याखालील गर्द सावली आणि सोबत समुद्राच्या लाटांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी काहीजन कुटुंबासोबत तर काहीजण होणाऱ्या कुटुंबासोबत येथे मजा करायला येतात. हॉटेल तसेच रिसोर्ट यांची येथे कमी नाही. बीचवर जाणाऱ्या दिशेने उजवीकडे थोड्या अंतरावर चालत गेल्यास केळव्याचा चौकीवजा किल्ला तुम्हास दिसतो.  सध्या किल्ला हा अर्धवट वाळूत गाडला गेला आहे. त्यामुळे त्याच्या प्रवेशद्वारात प्रवेश करताना वाकूनच शिरावे लागते. किल्ल्याच्या चार टोकांना चार वैशिष्ट्यपूर्ण त्रिकोणाकृती बुरुज आहेत. या बुरुजांमध्ये तोफा ठेवण्यासाठी झरोके व जंग्या आहेत.
हा किल्ला गतकाळी मोठा असावा तसेच लष्करीदृष्ट्याहि त्याला खूप महत्व असावे हे दिसून येते. 
किल्ल्याचा इतिहास फक्त एवढाच कि इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर जानेवारी १७३९ केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. थोडक्यात सांगायचे झाल्यास मराठ्यांनी पोर्तुगीजांकडील उत्तरेकडील गड कमी दिवसात जिंकून घेतल्याचे दिसून येते. 
१०-१५ मिनिटात गड पाहून होतो. सध्या या गडाचा उपयोग इष्कबाजी आणि नको त्या वापरासाठी होतोय हे प्रकर्षाने दिसून येते. गड पाहून मी आणि विक्रांतने बीचवर थोडावेळ फेरपटका दरवेळी प्रमाणे कॅमेऱ्याचा  क्लीकक्लीकाट करून झाला. किनाऱ्यावरूनच केळवेचा पाणकोट दिसत होता. पण समुद्राला भरती असल्याने आम्हाला तो दुरूनच पाहून समाधान मानावे लागणार होते. पण तरीही मन राहवले नाही. थोडे का होईना पण पाणकोट जर तरी जवळून पाहायचा  असे ठरले आणि गाडीला किक मारली. केलवेपासून २ किमी अंतरावर असलेल्या बंदराजवळून पाणकोट पाहिला. दांडा खाडीच्या बरोबर मध्यभागी हा पाणकोट किल्ला पोर्तुगीजांनी जकात वसुलीसाठी तसेच टेहळणीसाठी बांधला होता. केळवे किल्ल्यासोबत हा पाणकोट किल्लादेखील मराठ्यांनी फेब्रुवारी १७३९ मध्ये जिंकून घेतला असा उल्लेख आढळतो . 
किल्ला आतून कसा आहे हे आता सांगू शकत नाही परंतु मी पुन्हा एकदा एकदम सुमडीत या किल्ल्याला भेट देवून जाणार आहे. मला नि विक्रांतला लय वाईट वाटले.. शेवटी हम हरनेवालो मे से नही अग्ली बाजी हमारी होगी अस मनातल्या मनात म्हणून स्वारी वळवली ती दांडा किल्ल्याकडे.. 

कोळीवाडा सोडल्यावर लगेच एक पूल लागतो त्यापलीकडेच दांडा गाव वसले आहे. आगरी-कोळी-मुसलमान लोकांची वस्ती असलेले हे गाव दिसायला छोटे पण लोकसंख्येने मोठे आहे. आम्ही गावात प्रवेश केल्यावर डावीकडे एक घर लागले त्या घरातल्या बाईला किल्ल्याचा मार्ग विचारला तर म्हणे इथ किल्ला वैगेरे काही नाही.. च्यामारी अस असूच शकत नाही अस म्हणत विक्रांतला गाडी गावात न्यायला लावली. तिथेपण तेच ऐकिवात आले. या गावातल्याच लोकांना या किल्ल्याची माहिती नाही. शेवटी एकाने गावातील बहारवाड्यात चौकशी करायला सांगितली. त्याप्रमाणे तेथील एका सुशिक्षित व्यक्तीने(तुम्ही तुमचा अंदाज लावा) आम्हास किल्ल्याची वाट सांगितली. 
त्या वाटेने गेल्यानंतर एक म्हण आठवली "काखेत कळसा आणि गावाला वळसा" खरच या म्हणीला आम्ही सार्थ ठरलो. कारण हा किल्ला गावाच्या रस्त्यावरच होता आणि आम्ही खुळी सर्व गावात डंका वाजवत फिरतोय " ओ इथे किल्ला आहे.. ओ इथे किल्ला आहे का.. "
सध्या या किल्ल्याचे फारच थोडे अवशेष उरले आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सदर किल्ल्याच्या बाजूला/ जागेत सार्वजनिक संडास बांधले आहेत. किल्ला पूर्णपणे वडाच्या झाडाच्या फांद्यांनी आणि मुळांनी गिळंकृत केला आहे. समोर एक पोर्तुगीजकालीन चौकोनी विहीर आहे. प्रवेशद्वाराच्या बाजूच्या देवडी प्रमाणे दिसणारा भाग ओळखता येतो. यावरून किल्ला संपूर्ण गावभर असावा असे दिसून येते. सध्या एवढेच अवशेष आपणास पाहायला मिळतात. काही वर्षातच केल्वेचा किल्ला आणि दांडा किल्ला येथे होता असे म्हणावयास लागणार आहे हे नक्की… 
आम्ही पुन्हा घोडयावर  बसलो…  विक्रांतने खाटकन टाच मारली…  घोड्याने जोरात किंकाळी मारली…  लगाम खेचला…  अन दौडत दौडत आमचा घोडा निघाला शेवटच्या किल्ल्याकडे किल्ले भवानगडाकडे… 
दांडा गावापासून भवानगड दीड किमी च्या अंतरावर आहे. दांडा गाव सोडल्यावर पुढे दोन फाटे फुटतात. तेथून डावीकडे जाणारा रस्ता भवानगडाकडे जातो. दोनचाकी गाड्या थेट गडापर्यंत जातात. मला वाटले होते हा गड उंचावर असावा पण तो आहे एका टेकडीवर. टेकडीवजा उंचीवर गर्द झाडीत हा गड दिसून येत नाही. विक्रांतने थेट गडापर्यंत गाडी नेली. आम्ही गेलो तेव्हा गडावर पूर्णपणे शांतता अगदी निर्जन स्थळी आल्यासारखा भास होता. आजूबाजूला घनदाट जंगलाने हा गड झाकून गेला आहे. गडावर असलेल्या शिवमंदिरावरून गडाचे नामकरण "श्री भवानीगडेश्वर शिव मंदिर" असे करण्यात आले आहे. गडाचे प्रवेशद्वार आता भग्नावस्थेत आहे. माचीची तटबंदी मोठ मोठे दगड एकमेकांवर रचुन केलेली आहे.किल्ल्याची ऊभारणी युध्द पातळीवर केल्यामुळे या बांधकामात चून्याचा वापर केलेला आढळत नाही.गडाच्या बालेकिल्ल्याचे पश्चिमाभिमूख प्रवेशद्वार गोमुखी पध्दतीचे आहे. याची कमान ढासळलेली आहे. परंतू बाजूचे बुरुज व तटबंदी शाबूत आहेत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराच्या बांधकामात चुन्याचा वापर केलेला आढळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर दुसर्‍या उध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. समोरच पाण्याचे चौकोनी आकाराचे खडकात बांधलेले टाक दिसते. त्याच्या बाजूने गावकर्‍यांनी सिमेंटचा कट्टा बांधलेला आहे. टाक्यात भरपूर पाणी साठा आहे पण लोकांनी त्यात चांगलीच घाण करून ठेवली आहे. गडावरून दांडाखाडी, केळवे आणि भोवतालचा प्रदेश दिसतो.
नेटवरून मिळालेल्या माहितीनुसार गडाचा इतिहास असा कि, इ.स. १५२६ साली पोर्तुगिजांनी वसई किल्ल्याची उभारणी सुरु केली. त्याच बरोबर या भागावर वर्चस्व ठेवण्यासाठी शिरगाव, माहीम, केळवे या परिसरात किल्ल्यांची साखळीच तयार केली. पोर्तुगिजांनी स्थानिक जनतेवर धर्मांतरासाठी अत्याचार केले. या जुलमाच्या तक्रारी पेशव्यांकडे गेल्यावर, इ.स १७३७ मध्ये नरवीर चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली गंगाजी नाइक, शंकराजी फडके, बाजी रेठरेकर इ मातब्बर सरदार पोर्तुगिजांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पुढे सरसावले.वसई मोहिमेत १७३७ च्या ऐन पावसाळ्यात २००० मजूरांकडून भवानगडाची उभारणी करण्यात आली. दांडाखाडीच्या रक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वसई मोहिमेत या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली.  
अर्ध्या तासात गडफेरी पूर्ण करून झाली. मंदिरातील महादेवाचे दुरूनच दर्शन घेतले, कारण मंदिराला तला होता तसेच मंदिराबाहेर असलेल्या मारुती, गणपती आणि कार्तिकेय यांची मूर्ती कपड्याने झाकली होती. मंदिराच्या बाजूला असलेल्या चाफ्याच्या झाडाखाली मी आणि विक्रांत थोड्यावेळ बसलो. इतिहासावर थोड्याबहुत गप्पा मारल्या. पुढच्या भटकंतीचे प्लान ठरवले आणि घराच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. 
॥ इति सप्तदुर्गभ्रमंती संपूर्णम ॥ 
@@ तारापूर किल्ला - शिरगाव किल्ला - माहीम किल्ला - केळवे किल्ला - केळवे पाणकोट - दांडा किल्ला - भवानगड @@ 
खूप दिवसापासून रखडलेली उत्तर कोकणातल्या सात किल्ल्याची सफर विक्रांतसोबत पूर्ण झाली. अजून बरेचसे गडकिल्ले या भागात आहेत ते लवकरच पूर्ण होतील हि अपेक्षा मनात बाळगून आहे. 
कोकणातले किल्ले फिरताना महत्वाची गोष्ट दिसून येते कि कोकण किनारपट्टीतल्या लोकांनी खूप अन्याय हालअपेष्टा झेलल्या आहेत. यवन, पोर्तुगीज आणि इंग्रजांनी गावेच्या गावे जाळली होती, लोकांना गुलाम करून इतर देशात पाठवले गेले होते, बायाबापड्यावर अत्याचार केले होते आणि त्यांचे बळजबरीने धर्मांतर करून बाटविले होते. उत्तर कोकणपट्टीतल्या लोकांचा सारा इतिहास रक्तरंजित होता असे म्हणायला हरकत नाही. संभाजी महाराज आणि चिमाजी अप्पांच्या काळातच थोड्या वर्षासाठी ते सुखात राहिले असावेत. आजही वसईपासून डहाणूपर्यंतची लोकवस्ती पाहता याचा प्रत्यय येईल. 
या सह्याद्रीत मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप काही साठवून घेवून जातो.. मग तो थरार असो.. सह्याद्रीचे सुंदर किंवा रांगडे रूप असो.. माना टाकलेल्या कमानी असो.. पडलेल्या बुरुजांचे दगड असो...माणसांचे स्वभाव असो.. सर्वकाही अनुभव या फाटक्या झोळीत घेवून जात असतो.. आणि झोळी फाटकी असल्याने पुन्हा सह्याद्रीत येत असतो तोच अनुभव पुन्हा घ्यायला...

या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे..
शेवटी तो माझा गुरु आहे."

ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा.. 
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.

।। जय शिवराय ।।

- जातिवंत भटका

Comments

Popular posts from this blog

मेळघाट व्याघ्र प्रकल्प - Melghat Tiger Reserve

बापू -  विलास दादा -  मी -  रूपेश  आणि सुहास सह्याद्री आणि सातपुडा या महाराष्ट्रातील दोन मुख्य पर्वतरांगा आहेत. यातील सह्याद्री पर्वतरांगेच्या अंगाखांद्यावर मी नेहमीच बागडत असतो. यातील गड, लेणी, पर्वत, शिखरे आणि निसर्गसौंदर्यातून माझे जीवन सर्वांगसुंदर करण्याचा प्रयत्न करत असतो.....परंतु यावेळेस ‘कुछ हटके करेंगे’ असाच मनोमन निर्धार केला होता...म्हणून ‘मेळघाट’ हे नाव सातत्याने माझ्या मनात दौडत होते. मनातील भावना कृतीत उतरविण्यासाठी मेळघाटात जाण्याचा विचार नियोजनात बदलण्यात आला. एकेकाळी सह्याद्री व सातपुडा या दोन्ही पर्वत रांगांमध्ये घनदाट अरण्य होतं....परंतु कोळसा भट्ट्या आणि झटपट अतिरेकी विकासासाठी सह्याद्रीतील जंगलाचा महाविनाश झाला. मावळ आणि कोकणातील उघडाबोडका सह्याद्री पाहताना नेहमीच माझे मन अस्वस्थ होते. परंतु विदर्भातल्या सातपुडा पर्वतरांगेने आपल्या कुशीतील वन व वन्य वैभव जपून ठेवले आहे. भारतीय वन्य जीवांचा वारसा जतन करणा-या या निसर्गालंकृत भूमीला भेट द्यायची हा विचार मनात निसर्गवैभवाची अनेक पाने उलगडत होता. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल...

केंजळगड रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर Kenjalgad Raireshwar Koleshwar Mahabaleshwar

खूप वर्षापासून  केंजळगड   रायरेश्वर कोळेश्वर महाबळेश्वर  हा रेंज ट्रेक करायची मनात खूप इच्छा होती पण वेळ काही मिळत नव्हता. फायनली रुप्या आणि विश्राम जवळ शब्द टाकला, जायचं का ह्या रेंज ट्रेकला लागलीच दोघांनी होकार दिला. AMK ला राकेश मला बोलला होता दादा तुम्ही एकटे फिरता आम्हाला पण घेऊन चला माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडं चलबिचल होत होती. राकेश चालेल कि नाही शिवाय मोठी तंगडतोड होती पण बोललो घेऊच बघू पुढचं पुढे जे काही होईल ते. रुप्या  आणि विश्राम ला तशी कल्पना दिली कि राकेश येतोय त्या गोष्टीवर थोडी चर्चा हि झाली आणि शेवटी राकेश आमच्या तुकडीत सामील झाला. ट्रेकची तारीख ठरली ६ आणि ७ जानेवारी नवीन वर्षाचा श्री गणेशा मोठ्या रेंज ट्रेकने होणार होती . नवीन वर्षाचा श्री गणेशा  आम्ही सगळे रात्री १० वाजता एकत्र होऊन सानपाडा ब्रिज खाली ट्रॅव्हल्स पकडून वाई गाठायचं ठरवलं होत पण थोडा उशीरच झाला १०च्या ऐवजी ११:३० ला आम्ही तिघे मी ( दीपक )  राकेश आणि रुपेश सानपाडाला पोचलो होतो. विश्राम पहिलाच सानपाडाला पोचला होता इतक्यात वाईची ट्रॅव्हल्स आली आणि आमची ...

शिवकालीन लिंगाणा - भाग १

भटकंतीचा भस्म्या लागलेल्याला आपली भटकायची भूक भागवण्याकरिता एखांद्या मुहुर्ताची गरज नसती. समोर आलेल्या हिंडायच्या प्रस्तावाप्रमाणं सारं काही manage करणं त्याला आपसुकच जमत असतं. माझ्या बाबतीत सांगायच तर २०१४ मध्ये अगदी  action trekking shoes फाटुस्तोवर फिरलो. घराकडं साहजिकच कमी लक्ष दिलं गेलं. म्हणून मग ठरिवलं या वर्षी जरा समतोल राखायचा आणि घराकडं जरा जास्त लक्ष द्यायचं. पण ते काय हाय समोरून जशी एखांदी सुंदर मुलगी जात असली तर कितीही पण केलेल्या माणसाचं तिच्याकडे आपोआपच लक्ष वेधलं जातं अगदी तसच एखाद्या भटक्याच लक्ष त्याच्या डोळ्यासमोर plan होत असणार्या भटकंतीकडं आपोआपच वेधलं जातं. २०१५ सुरू झालं होतं. समोरून लय प्रस्ताव येत होते. पण कसाबसा स्वत: ला आवरून मोह टाळला होता. जानेवारी संपायच्या मार्गावर होता. महिनाभर कुठं भटकायला न गल्यानं घरातले तसे खुष होते मात्र जवळच्या मित्रांचे टोमणे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. २४,२५,२६ तीन दिवस सुट्टी जोडून आल्यानं मनाची चलबिचल सुरू झाली होती. whatsapp वर सर्वांचे message यायला सुरवात झाली होती. "कुठं जाणार असशीला तर कळीव लेका", असे बरेचसे mes...