त्रिंगलवाडी ट्रेक भाग-२
गडाच्या दिशेने चालायला लागलो तसा ढगोजीरावांनी एकत्र येवून बरसायला सुरुवात केली. मस्त पावसात भिजत रानातून असलेल्या वाटेवर चालत एकेकजण पुढे पुढे जात होता. वाटेच्या कडेने भाताची पिके हिरवळीने सजली होती तर कुठे शेतकऱ्यांची बैलजोडीसोबत नांगरट चालू होती. साखरेच्या वासाने मुंग्या जश्या एकामागे एक चालत वाट काढत त्या साखरेला भिडतात तसे आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. किल्ल्याचा इतिहास एवढाच वाचनात येतो कि किल्ल्याच्या पायथ्याशी असणाया जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण १०व्या शतकात झाली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ऐकिवात नाही. पण १६८८ च्या शेवटी मुघलांनी फितुरीने हा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला. गडाच्या पायथ्याशी दहाव्या शतकात खोदलेली जैनधर्मीय गुहा लागली सध्या तिला पांडवलेणी असे म्हणतात. गुहेच्या गाभाऱ्यात भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती आहे (यवनी सत्तांनी केलेल्या आक्रमणात याही मूर्तीची विटंबना झाली आहे). गुहेत असलेल्या चार खाम्बापैकी ३ खांब पडले किंवा पाडले आहेत. एकाच खांब सध्या सुस्थितीत आहे. हि गुहा प्रशस्त असून येथील मानवाकृती कोरीव नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. सद्यस्थितीला या गुहेचा उपयोग जनावर बांधण्यासाठी होतोय असे दिसून येते. लेण्यासमोर असलेल्या झाडाखाली शिर नसलेली एका स्त्री ची सुंदर मूर्ती आहे. या लेण्यांच्या अंगावरच त्रिंगलवाडी किल्ला वसला आहे.
लेण्यांच्या डाव्या बाजूने किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. इथपासून आमची चढाईला सुरुवात झाली. वाट जास्त दमछाक करणारी नसली तरी अभिनव, प्रतिक, संदीप दादा दमा दमान चालायला लागली होती. तोवर आबा आणि मल्हारने आम्हाला गाठले. विक्रांत आणि बापूने वेगळीच वाट धरली होती. भवारी सर, नागपुरे काका आम्हा पोरांना मागे टाकत सर्वांच्या पुढे होते. नागपुरे काकांचा जोश पाहून बाकीचेही त्याच जोशात चालत होते. आता पहिला टप्पा पार झाला होता. थोडे वर गेल्यावर एक पठार लागते तिथे भातलावणी चालू होती. त्यांनी संपूर्ण रानाला काट्यांची कुंपणे घातली होती. त्या बाजूने चालत पुन्हा एक टेकडी लागली. आमची काही जोशिले मंडळी तिथे आधीच जावून विसावली होती. आम्ही गडाच्या मध्यवर्ती भागात असल्याने जोराचा वारा लागत होता. तिथपर्यंत आल्यावर सर्वांचा थकवा निघून गेला. मागे राहिलेल्याची वाट बघत थोडावेळ थांबलो आणि उजव्या बाजूला असलेल्या दरवाजा मार्गे किल्ल्यात प्रवेश केला.
गडाच्या पायऱ्या कातळात कोरल्या आहेत. संपूर्ण गडावर तटबंदी तुरळक प्रमाणात दिसून येते. पण गडाचा कातळकडा हाच बुरुजाची जबाबदारी निभावत असावा असे दिसून येते. दरवाजाच्या बाजूलाच वाड्याचे पडके अवशेष आढळतात. गडावर ३ पाण्याची टाकी आहेत. उजवीकडून सरळ गेलेली वाट भवानी मंदिराकडे घेवून जाते. ती वाट आम्ही धरली. तर काही जणांनी टेकडीवरून भवानी मंदिराकडे जाणारी वाट धरली. सार्वजन भवानी मंदिराकडे आले. मंदिरासमोर एक मोठा त्रिशूल रोवला आहे. मंदिर साधे असून आत ३ मुर्त्या आहेत व बाहेर एक शिवलिंग आहे. या भवानी कड्यावरून त्र्यंबकरांग, कळसुबाई रांग, जवळ असलेले कावनई,बसगड पुसटसे दिसत होते. सगळेजन पुन्हा एकत्र आले, पुन्हा क्लिकक्लीकाट सुरु झाला. विशाल फोटो काढून काढून दमला होता. बघता बघता घडयाळात २ वाजले होते. आता गडावरून उतरण्यासाठी आणि पाहण्यासारखी राहिलेली ती म्हणजे चोरवाट. सर्वाना वेळेचा अंदाज सांगितला. सर्वांचा पोटोबा देव नैवेद्यासाठी भुकेला होता. मग एका मागोमाग एक अशी आम्ही सर्व मंडळी टेकडीवरून खाली उतरावयास लागलो. टेकडीचा उतार तीव्र असल्याने सर्वांची जाम गंमत झाली. सगळेजन धडपडत पण safely खाली उतरले. चोर दरवाजापाशी सर्वजण एकत्र आलो. हा चोरदरवाजा कातळात खोदला आहे. द्वारावर सुबक नक्षीकाम अजूनही दिसून येते. बाजूलाच हनुमानाची मोठी मूर्ती आहे. मारुतीच्या पायाखाली राक्षस असलेली हि मूर्ती.( अशा मारुतीच्या काय म्हणतात ते विशाल सांगेल आता मला आठवत नाही. अशीच मूर्ती तिकोना किल्ल्यावर पहावयास मिळते). मारुतीला हार घालून सुशांत भाऊंनी मोठी गारद दिली आणि आम्हा सर्वांच्या हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय गर्जनेचा आवाज किल्ल्यावर घुमला. चोरवाट अरुंद असून पायऱ्या कातळात कोरल्या आहेत. येथे तब्बल ५२ पायऱ्या असून एक एक पायरी दीड फुट उंच आहे. उतरताना काहीच वाटले नाही परंतु चढताना मात्र चांगलीच दमछाक झाली असती हे नक्की. सर्वांनी सावकाशपणे गड उतरायला सुरुवात केली.
हा हा म्हणता काही मिनिटातच किल्ल्यावर दाट धुके पसरले आणि पावसाला जोरदार सुरुवात झाली. जवळपास १५-२० फुट अंतरापलीकडे काहीच दिसत नव्हते. आता सर्वजण लगबगीने गड उतरत होते, तर काहीजण पावसात भिजून तर काहीजण धबधब्यात न्हात पुढे पुढे चालत होते. अर्ध्या तासात आम्ही पत्र्याचीवाडी गावात आलो. सर्वांचा Count घेण्यात आला. काही वेळात त्रिंगलवाडीतून गाडीचे driver आले.
सर्वजण पुन्हा होते त्या जागेवर गाडीत बसले आणि त्रिंगलवाडीत आलो. आमच्या जेवणाची सोय इथल्या गावातील शाळेत झाली होती. जेवणात तांदळाची भाकरी, बटाटा मटकीची भाजी, वरण-भात, पापड-लोणचे आदि पदार्थ होते (आता जीभ चाटत बसू नका) धमाल मस्ती करत शाळेतल्या आठवणी काढत सर्वांनी मनसोक्त जेवण उरकले. घड्याळात ५ वाजले होते. त्यामुळे वेळ न घालवता इगतपुरीला जावून ट्रेन पकडून आपापले घर गाठायचे होते. एकेकजण गाडीत बसु लागला होता. सगळेजण गाडीत बसले आणि अचानक विक्रांतचा गायब झाला होता (टंबरयाल घेवून नदीकाठी गेला होता). काही वेळाने तो आला. जाता जाता भवारी सर, ईश्वर सहाने सर यांचे आभार मानले आणि परतीचा प्रवास सुरु झाला.
मुंबईत परतताना गाडीत गाण्याच्या भेंड्या चांगल्याच रंगल्या होत्या. जो जोश सकाळी होता तोच जोश अजूनपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. हसत खिदळत एकमेकांची चेष्टामस्करी करत सर्वांनी परतीचा प्रवास केला. या ट्रेकला आरोही च्या नावाने चांगभल करत योगेशने मोठाच kandsss करून टाकला होता.
या सह्याद्रीत मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूप काही साठवून घेवून जातो.. मग तो थरार असो.. सह्याद्रीचे सुंदर किंवा रांगडे रूप असो.. माना टाकलेल्या कमानी असो.. पडलेल्या बुरुजांचे दगड असो...माणसांचे स्वभाव असो.. सर्वकाही अनुभव या फाटक्या झोळीत घेवून जात असतो.. आणि झोळी फाटकी असल्याने पुन्हा सह्याद्रीत येत असतो तोच अनुभव पुन्हा घ्यायला...
या सह्याद्रीत येताना खालील ओळी नक्की लक्षात ठेवा.
"हा सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच रौद्र आहे.
तो आधीच जाणवून देतो काय करावे नि काय न करावे.
मी तर एक शून्य त्यापुढे..
शेवटी तो माझा गुरु आहे."
ह्या लेखाच्या माध्यमातून गड किल्ल्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा माझा उद्देश. जेणेकरून गडकिल्ल्यांविषयी लोकामध्ये आवड निर्माण व्हावी. ट्रेकिंगच्या माध्यमातून का होईना त्यांना भेट देत चला.
तुम्हाला इतिहास ऐकायचा असेल तर त्या त्या गडांच्या चिरेबंदी बुरुजाला कान लावून ऐका.
"तुम्हाला आवाज येईल त्या आर्त किंकाळीचा. ..
तुम्हाला आवाज येईल खनाननाऱ्या तलवारीचा...
तुम्हाला आवाज येईल बुरुजावरून धडाडनाऱ्या तोफांचा..
तुम्हाला आवाज येईल त्या शूर मावळ्यांचा "हर हर महादेव..हर हर महादेव.. हर हर महादेव.. "
यासाठीच हा लेखनप्रपंच.
।। जय शिवराय ।।
- जातिवंत भटका
Comments
Post a Comment