प्रवास चंदेरीचा भाग-२
आता ठरलेल्या वेळेनुसार एकेकजण येत होते.. पुण्याहून राहुल, व्यंक्या , पंक्या अशी मिळून ७ जन येवून हॉटेलात जेवायला गेली होती.. हा हा म्हणता ३०- ४० जन आली.. तोपर्यंत travels पनवेलच्या ब्रिजखाली येवून उभी राहिली... मंचर येथून कोकणे बंधू डेपोत दाखल झाले.. मंग्याची आणि राजेशची मित्रमंडळी आली.. त्यात काही अनधिकृत मित्र सुद्धा हजर झाले.. पराग, ओमकार सारखे.. सर्वांना घेवून travels मध्ये बसवले. त्यात नेरूळहून संदीप दादां छोटा हत्ती घेवून निघाले.. सगळे जमायला १०.३० वाजले. काही सदस्य नवे असल्याने त्यांची घाई चालली होती. कितीला निघणार.. वेळ होतोय..
त्यात नाश्ताची सोय रामला करायला लावली होती. तो आणि विक्रांत खरेदीसाठी गेले होते. आणि हो एक सांगायचं राहिलच माझ्या अनधिकृत यादीतल्या विठ्ठल गोरे यांचा फोन १० वाजता आला होता कि तोही येतोय. गडी स्टुडीओतून नुकताच निघाला होता व त्याला तसेच आबासाहेब आणि बापूला पनवेल मध्ये येण्यासाठी ११.३० तरी वाजणार हे निश्चित होते. येथूनच वेळेचे नियोजन फिसकटायला सुरुवात झाली. मी तर अगदी भैसातून गेलो होतो. ही मंडळी त्यात प्रामुख्याने नाव घ्यायचे झाल्यास राम आणि संदीप दादा कधीच वेळेवर येत नाहीत. त्यामुळे आधी आलेल्या ट्रेकर्सना पुढे घेवून जाने भाग होते. कारण खूप जन लांबचा प्रवास करून आले होते. पनवेलहून तामसई गावाचे अंतर १७ किमी असल्याने ३०-४० जणांना गावात घेवून जाणे व बाकीचे येईपर्यंत वाट पाहायचे ठरले. आम्ही निघतोच तोवर संदीप दादा छोटा हत्ती घेवून आले. पण अजून ३-४ जन यायचे असल्याने त्यांनी आम्हाला पुढे जाण्याचे सांगितले व त्यानुसार आम्ही १०.४५ वाजता तामसई गावची वाट धरली. १५-२० मिनिटात आम्ही गावात पोहोचलो. सार्वजन पटापट उतरले आणि Sack टाकून निवांत बाकीच्यांची वाट पाहत व काही जन आराम करत जमिनीवर पडले. गाव अगदी शांत होत. फक्त कुत्रे आणि आमच्या गलबलाटाचा आवाज सोडून सर्व काही शांत होत.
दोन तीन दिवसापूर्वी नुकतीच पोर्णिमा झाल्यामुळे चंद्राचा प्रकाश चांगलाच पसरला होता. एकीकडे चंद्र आणि एकीकडे चंदेरी अगदी वेगळंच वातावरण तयार झाल होत. फोटोग्राफर मंडळीनी आपापले कॅमेरे बाहेर काढून तो क्षण टिपायला सुरुवात केली. थोड्या वेळात पाठून येणार्यांची विचारपूस करायला फोनाफोनी सुरु झाली. त्यात कळल कि ती रस्ता चुकली होती. मल्हारला रस्ता माहित होता म्हणून त्याला मागे ठेवले होते परंतु ह्या गड्याने भलतीकडेच गाडी नेली होती. बघता बघता १२ वाजले होते आणि मागे राहिलेल्यांचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात २ मोटारसायकली वरून राम, विक्रांत, दीपक, शंकर बापू आणि विठ्ठल गावात आले. संदीप दादांची गाडी यांच्या पाठोपाठ होती. परंतु गाडी चालविणारे जॉन अब्राहम होती. त्यामुळे हे कुठे गेले ते संदीप दादाला कळलेच नाही. पुन्हा फोनाफोनी सुरु झाली आणि कळल कि ते गावापासून जवळच २ किमी च्या अंतरावर आहेत आणि गाडीला धक्का मारत येत आहेत. झाल.. कपाळावर हात मारून घेण्यापेक्षा काहीच करू शकत नव्हतो. गाडी बंद पडली होती.. लांबूनच गाडीला धक्का देत येणाऱ्या मंडळींचा आवाज येत होता..
घड्याळात १.१५ मिनिटे झाली होती. गावाच्या हद्दीवर बाजूला गाडी लावून एकदाचे सर्वेजन आले आणि सुटकेचा श्वास घेतला. सर्वाना insrtruction देवून झाल्यानंतर Count घेण्यात आला. आता ट्रेकला येणाऱ्या मुलांची एकूण संख्या ६८ झाली होती आणि माझ्या काळजात धडकी भरली होती. चंदेरीचा ट्रेक हा साधासोपा मुळीच नाही. त्यानुसार राम, आबा , विक्रांत , मोठा बापू , छोटा बापू , संदीप दादा , रुपेश, विठ्ठल आणि मी आपापली कामे वाटून घेतली. ट्रेक किंवा कोणतेही कार्य म्हटले कि जबाबदारी आलीच आणि एकटा माणूस हि जबाबदारी पेलू शकत नाही. ती सर्वांनी घ्यावी लागते आणि पेलावी लागते. मुळात हा एक जंगल ट्रेक होता. रस्ते भरकटणे अपघात होणे याची शक्यता खूप असते. त्यामुळे प्रत्येकाला योग्य ती माहिती दिली.
सर्वांची नावे लिहिण्यात आणि माहिती देण्यात रात्रीचे २ वाजले होते. Lead करायला विक्रांत आणि विठ्ठल यांना पुढे केले. आणि या भटक्यांचा चंदेरीचा प्रवास सुरु झाला. ( वेळ २.३० मिनिटे)
एका मागोमाग एक असे शिस्तीने सर्वांनी गडवाट धरली आणि लगबगीण चालू लागले. नागमोडी वळणात असलेल्या या रानवाटेत अर्धा एक किमी पर्यंत थोड्या थोड्या अंतरावर गडवाटकरयाची रांग लागली होती. बहुदा सर्वांकडे torch असल्याने व त्यात ओमकार ने तर दुबईवरून imported torch आणल्याने १ मैलापर्यंत फक्त torch चा लखलखता प्रकाश, चंद्राचा प्रकाश आणि त्या लखलखत्या प्रकाशात लांबूनच दिसणारा चंदेरी असा अदभूत मिलाप घडून आला होता.
"लख लख चंदेरी " असा इवेन्टवर दिलेल्या नावानुसार आमचा सह्याद्रीचा प्रवास सुरु झाला होता..
क्रमश:
Comments
Post a Comment