सफर K2 ची भाग-१
शीर्षक नाव पाहूनच हडबडला असाल ना ? K२ म्हणजे माउंट ऐवरेस्ट च्या खालोखालचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उंच गिरी शिखर. विचार करत असाल कि हा कधी जावून आला इथे... नाही नाही अजून गेलो नाही तिथे पण महत्वाकांक्षा बाळगून आहे हो... पण त्याआधी महाराष्ट्रातील या सह्याद्रीतील सर्व गडकिल्ले व गिरीशिखरे पादाक्रांत केल्यानंतरच.. हि इच्छा कधी पूर्ण होईल ते देव जाने.. या विविधतेने नटलेल्या समृद्ध महाराष्ट्रात (सध्या दुष्काळात होरपळत आहे) पर्यटन क्षेत्र खूप आहे. पण आजकालच्या अडाणी(सुशिक्षित) लोकांना त्याचे मोल नाही. बोलतात ना जिथे पिकते तिथे विकत नाही. आणि हे अडाणी(सुशिक्षित) जिथे पिकवायला(फिरायला) जातात तिथे यांना कोणी इचारत नाही पण पैसा मात्र विकून येतात.(Tours&travels व इतर संस्थेने दुर्लक्ष करावे )
आमची लोक राजस्थानात जातात म्हणे. आणि महाराष्ट्रात परतल्यावर एक विधान करतात. "बघा बघा त्या किल्ल्यांकडे आजही किती चांगल्या अवस्थेत आहेत. काय त्या किल्ल्यावरील नक्षीकाम, काय त्या किल्ल्याचे बुरुज, काय त्यांच्या तोफा असे अजून काही...
ज्या राजस्थानाचे राजे (अपवाद पृथ्वीराज चौहान आणि महाराणा प्रताप) शेकडो वर्षे मोघलांचे मांडलिक राहिले.. आपल्या आयाबहिणी देवून ज्यांनी त्यांचे किल्ले आणि राजेपण जपले.. ज्यांनी अन्यायाविरुध्द कधी युद्धाच केले नाही.. अशा राजस्थानमधील गडकिल्ले चांगल्याच अवस्थेत राहणार.. (हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच ४-५ किल्ले झुंजले असतील)
अशा किल्ल्यांवरील नक्षीकाम , किल्ल्यांचे बुरुज आणि तोफा शाबूत राहणे यात प्रश्नच नाही..
असो...
सह्याद्रीतील डोंगरी गडकिल्ल्याप्रमाणे सागरी किल्ल्यानाही तितकेच महत्व.. छत्रपती शिवरायांना सागराचे महत्व कळले होते. त्यात सिद्द्यांनी किनाऱ्यावरील गावात दहशत निर्माण करून स्वताचे स्वतंत्र राज्य तयार केले होते. तसेच डच, पोर्तुगीज आणि इंग्रज होतेच. म्हणून शिवरायांनी अलिबाग पासून कर्नाटकापर्यंत आपले आरमार दल उभारले होते व त्यांच्या संरक्षणासाठी जलदुर्ग उभारले. बळकट केले. मायनाक भंडारी, इब्राहीम खान, दर्यासारंग यासारखे बुलंद मावळे जे सागराशी झुंज देतील अशांची नियुक्ती केली. शिवकालापासून पेशवाईपर्यंत या जलदुर्गांनी अमुलाग्र साथ दिली.. स्वराज्य रक्षणासाठी मावळ्यासोबत प्रत्येक किल्ल्याचे बुरुज झुंजले.. तोफा कडाडल्या... आजही ते त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.
उन्हाळा म्हटला कि बहुतांशी गडावर पिण्याच्या पाण्याची बोंब.. तसेच जंगलात अचानक लागणारे वनवे.. यामुळे खूप ट्रेकर मंडळीचे पाय या अनगड दुर्गवाटांवरून वळतात ते या सागरी किल्ल्यांकडे.. मग प्रत्येकाची लिस्ट बाहेर पडते.. ती म्हणजे अगदी अर्नाळा पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत..
गडवाटसोबत मी नुकताच चंदेरी ट्रेक केला होता. चंदेरीवर आलेला अनुभव लक्षात घेता सर्वांनी यापुढचा ट्रेक एखादा सागरी किल्ला करायचा असे ठरले. हो नाही म्हणता म्हणता शेवटी अलिबागचा कुलाबा किल्ला आणि कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळाला भेट द्यायचे ठरले. तारीख ठरली.. वार आणि वेळ ठरली.. ट्रेकला येणाऱ्यांची नावेही पटापट आली.. मुंबईतून ३४ जण आणि पुणेहून ५ जन आणि अलिबागहून १ जन असे मिळून ४० जणांची फौज तयार झाली. अलिबागमध्ये अनिरुद्धच्या घरी रहायची सोय झाली होती म्हणून शनिवारी रात्रीच अलिबागकडे रवाना व्हायचे ठरले होते.
हा हा म्हणता शनिवारचा दिवस उजाडला. माझी सेकंड शिफ्ट होती. मुंबईहून गाडी सुटण्याची वेळ होती १०.३० मिनिटे. हाफिसातल्या मित्राला उद्या लवकर जाणार हे आदल्या दिवशीच सांगून ठेवले होते. त्यानुसार सर्व तयारी करून trekking sack खांद्याला लटकवून हाफिसात हजर झालो. ऑफिसच्या गेटवरील security पासून मला विचारायला सुरुवात " सरजी गाव जा रहे हो क्या ?" तसे जो दिसेल तो हाच प्रश्न विचारु लागला. प्रत्येकाला उत्तर देत वर येवून Sack ठेवली आणि घड्याळाच्या काट्याकडे तासातासाला पाहत कधी निघेल अस झाल होत. काम उरकत ९ वाजलेले कळलेच नाही. तसाच घाईत ऑफिसच्या बाहेर पडलो.
तोवर दीपक त्याच्या मित्रासोबत स्टेशनला हजर झाला होता. ९.२५ ची पनवेल पकडून कुर्ल्याला पोहोचायचे होते. रुपेश अंधेरीहून सांताक्रूझ स्टेशनात उतरला. बापू त्याला टांग देवून बसने कुर्ल्याला रवाना झाला होता. आमची पनवेल ट्रेन हुकली आणि चर्चगेट पकडून दादरमार्गे कुर्ल्यात आलो. विशाल सुर्वे, जितु, योगेश स्टेशनात भेटले आणि पायाची रपेट करत नेहरूनगर ST stand गाठले (private गाडी केली होती). बाकीची मंडळी आधीच येवून गाडीत बसली होती. गाडी निघाली (१०.४५ मिनिटे). नेरूळ आणि पनवेल येथून येणाऱ्यासाठी गाडी stop घेणार होती. नेरूळला संदीप दादा, कौस्तुभ, विनायक, छोटा बापू आणि रामदास गाडीत चढले व गाडी पनवेलकडे रवाना झाली. कुर्ल्यापासून सुरु झालेला कल्ला आता वाढत होता. त्यात मल्हार का निलेशचा फोन आला कि गाडी पनवेल डेपोपाशी न थांबवता पंचमुखी मंदिर येथे थांबवा. त्यानुसार गाडी पंचमुखीजवळ थांबली. पण यांचा काहीच पत्ता नाही शेवटी कळले कि हे पनवेल डेपोजवळ आहेत.. मल्हारने पुन्हा Kandsss केला होता (या अगोदर चंदेरी ट्रेकला).. आम्ही सगळेजण यांची वाट पाहत थांबलो.. तोवर अजून एक बातमी येवून पोहोचली कि आबा आणि मोठा बापू नेरूळहून गाडीने येत आहेत आणि वेळ होईल.. तसा एकेकजण खाली उतरला आणि बाहेरच याची वाट पाहत गप्पागोष्टी सुरु झाल्या.. सुशांतभावने बर्फाची गोष्ट सांगितली त्यात सगळी पोर पोट धरून हसत होती. बोलता बोलता हे दोन गडी पोहोचले. पुण्याची मंडळी अनिरुद्धच्या घरी पोहोचली होती. रात्री १ वाजता गाडी पनवेलहून निघाली.. गाडीत पुन्हा धमाल सुरु झाली.. एके ठिकाणी चहा पिण्यासाठी गाडी थांबली...
तीन साडेतीन वाजता आम्ही अलिबागमध्ये दाखल झालो. अनिरुद्ध अलिबागच्या stand ला घेण्यासाठी आला त्याच्या सोबत त्याच्या घराच्या दिशेने गाडी वळवली.. एकदाचे पोहोचलो आम्ही शेवटी अनिरुद्धच्या घरी... प्रशस्त बंगला, घराचे सुंदर इन्तेरिअर मस्त बंगला आहे त्याचा.. आम्ही ३०-४० जन आरामशीर झोपलो एवढा मोठा त्या घराचा hall आहे.. तसे प्रत्येकाने जागा हेरली आणि काहीजण झोपले सुद्धा...आम्ही ४-५ जन त्याच्या किचनमध्ये बोलत बसलो. विशालने काही पुस्तके दाखवायला आणली होती. ती पडताळत आमच्या काही जुन्या ट्रेकचे विषय निघाले. मग पुढचे ट्रेकचे विषय.. तसे या बहाद्दराने आम्ही येण्याआधी झोप काढली होती. पण हे बेण मला झोपू देत नव्हत... कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी भरती आणि ओहोटीच्या वेळा पाहाव्या लागतात. त्यादिवशी भरतीची वेळ ९.३० मिनिटांची होती आणि त्यामुळे आम्हाला सकाळी ७ लाच किल्ल्यावर जाने भाग होते. शेवटी विशाल, जितु आणि संतोष सोबत बोलता बोलता ५.३० वाजले. तसे सर्वाना उठवायला सुरुवात झाली.. कोण दात घासतय कोण तोंड धुतय कोण xxxx जातंय.. असे करता करता सगळ्यांचे आवरले. घडयाळात ६.३० वाजले होते.
तसे सगळे घराबाहेर पडले आणि गाडीत बसले....सूर्याजीराव उगवायला सुरुवात झाली होती. थोडी हलकीशी गार हवा सुखावत होती.. आकाश लालमय झाले होते.. पक्षांचा किलबिलाट सुरु झाला होता..अतिशय प्रसन्न वातावरण तयार झाल होत आणि सर्वांचे मन त्या कुलाबा किल्ल्याच्या दिशेला लागले होते..
क्रमश:
Comments
Post a Comment