त्रिंगलवाडी ट्रेक भाग- १
त्रिंगलवाडी… नाव ऐकूनच काही नवे ट्रेकर्स अचाट पडतात. पण गुगल, पुस्तके आणि इतर मित्रांकडून हा एक किल्ला आहे अशी माहिती त्यांना मिळत जाते. येथे कधी जायचे कोणत्या मार्गाने जायचे आणि कोणत्या हंगामात जायचे हे ठरवत एकदाचा तो ट्रेकर जावून येतोच. धुक्यांची नगरी इगतपुरीपासून १०-१५ किमी अंतरावर हा किल्ला आहे. पावसाळ्यात इथला निसर्ग या शहरावर भरगोस कृपादृष्टी दाखवतो. आपला हिरवाकंच शालू सह्याद्रीवर पांघरतो आणि धुक्यांनी ओढून लोकांची नजर चुकवितो.
इगतपुरी शहरालगत खूप गडकिल्ले पाहण्यासारखे आहेत त्यातलाच एक त्रिंगलवाडीचा किल्ला.
सुशांत भाऊ, विलासराव घाटगे, दीपक, राहुल, हर्षदा, किरण, बापू, रुपेश, देवेंद्र आणि कल्पेश सर्व जन एकत्र आले. राजेश आणि वहिनी आल्या व सगळ्यात शेवटी आला तो योगेश आलेकारी (आरोहीचा जनक). हा without तिकीट होता बर का… सकाळी ६.२३ मिनिटांनी असलेल्या तपोवन एक्सप्रेसने आमचा प्रवास सुरु झाला. संदीप दादा नेरूळहून बसने ठाण्यात येत होते. तर ठाण्यातून संदीप दादासोबत आबा, राम, विक्रांत, रोहिणी, पुनम, चिन्मयी,अक्षय, संतोष, निलेश, रवींद्र सावंत,प्रशांत, स्वप्नील, संकेत, योगेश हांडे, सुरज… कल्याण वरून विठ्ठल, अनिकेत वाघ, विशाल सुर्वे, विनायक, हर्षल, शैलेश… कासाराहून दत्तू भवारी सर, भगवान नागपुरे काका, संदीप ठिगळे आदि सर्वजण गाडीत चढले. कसारा घाट सुरु होताच पावूस सुरु झाला होता. दादरहून सुरु झालेली धमाल इगतपुरी पर्यंत चालूच होती.
९ वाजता आम्ही इगतपुरी स्थानकात उतरलो. आम्हाला त्रिंगलवाडीस नेण्यासाठी येणारे पिकअप चे चालक वेळेत हजर होते. ठरल्याप्रमाणे राहुलने उडपीच्या हॉटेलात नाश्त्याची ओर्डर देवून ठेवली होती. सर्वांचा यथेछ नाश्ता चहापाणी झाला. नाशिकचा अमित कानडे सर्वांची खास भेट घेण्यासाठी आला होता. औरंगाबादकर १० वाजता वेळेवर आले. (प्रतिक <3 ). आम्ही एकूण ४६ जन होतो आणि २ गाड्या होत्या. ST योग्य सोय नसल्याने पर्याय नव्हता तरीही सर्वांची धमाल होणार होती त्या गाडीतून सैर करून. कोणी driver च्या बाजूला, कोणी मधे, कोण मागे, कोणी गाडीच्या टपावर, तर कोणी गाडीमागे लटकण्यासाठी जागा पकडली आणि आमचा प्रवास सुरु झाला. राहिलेली बाकीची मंडळी थेट गावातच भेटणार होती. वाघोली खिंडीच्या खडतर, ओबडधोबड घाटातून, निसर्ग, धबधबे न्याहाळीत सफर सुरु झाली. कॅमेऱ्याचा क्लिकक्लीकाट सुरु झाला होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जमिनीत शेतकरी नांगरत होता, पोर खेळत होती आणि तर कुठे एका तालात गावातील महिलांची भातलावणी सुरु होती. हिरवेगार वातावरण, थंडगार सुटलेला वारा, मधेच भिजवून जाणारा पाऊस आणि पावसाला मागे सारून पडणारे उन सुखावत होते. १०-१५ किमीच्या प्रवासानंतर आम्ही त्रिंगलवाडी गावात पोहोचलो. तिथेच ईश्वर सहाने आणि त्यांचे मित्र यांची भेट झाली. गावातल्या शाळेजवळ सर्वांची ओळखपरेड झाली. ईश्वर बंधूनी गडवाटचा नाशिक जिल्ह्यातला पहिलाच ट्रेक म्हणून सत्कार केला. मुलीना शिवप्रतिमा भेट दिल्या. भवारी सर त्यांच्या सहकुटुंबासोबत गडाच्या पायथ्याला असलेल्या पत्र्याचीवाडी गावात वाट पाहत होते. त्यांनी थेट तिथेच गाडीने या म्हणून सांगितले तसे सगळे पुन्हा गाडीत बसले. जाता जाता लक्षात आले कि मल्हार(शिवकवी अक्षर) मागे राहिला होता. हा गाडी आदल्या दिवशीच घोटीत आला होता तरीही मागेच राहिला. शेवटी आबाला गाडीवरून त्यास आणायला पाठवले व आम्ही पुढच्या मार्गावर निघालो.
त्रिंगलवाडीतून गडाचा पायथा गाठायला ३-४ किमी चा पल्ला गाठावा लागतो. काही वेळातच पत्र्याचीवाडी गावात आम्ही पोचते झालो. किल्ला स्पष्ट दिसत होता. थोडे ऊन पडले होते. जवळच कावनई किल्ला दिसत होता तर त्रिंगलवाडी किल्ला साद देत होता. भवारी सरांची भेट झाली. घड्याळात ११ वाजले होते. उशीर न करता आम्ही गड सर करायला सुरुवात केली… विठ्ठल व बापूला लीड करायला सांगून मी आबा आणि मल्हारची वाट पाहत हळू हळू पुढे चालत होतो…
क्रमश:
Comments
Post a Comment